३१ डिसें, २०१०

नववर्ष २०११



प्रिय मायबोलीकर,


काही क्षणात आपल्या हिंदुस्तानात ईंग्रजी कॅलेंडर नुसार नववर्षाची सुरुवात होणार आहे.हे कॅलेंडर आपल्या ईतके अंगवळणी पडले आहे की आपल्या नविन वर्षाची सुरुवात चैत्र महीन्यातील गुढीपाडव्याला होत असते याची जाणिवच नसते.आपली पुढची पिढी तर जागतीकीकरणाच्या झंझावाटात आपली संस्कृती व आपली मायबोली या पासुन तुटत चालली आहे.वास्तव जगापेक्षा भासमय जगात ही पिढी जास्त रमते. संवादांपेक्षा एसएमएस , पत्रांपेक्षा ई-पत्र, मत व्यक्त करण्यासाठी फेसबुक,ऑर्कुट या सारख्या कम्युनिटी साईट्स आणि मन व्यक्त करण्यासाठी याहू सारखे निरॊपे ( Messengers) यांचा वापर सहजकत्या करणार्‍या या पिढीला पत्रातील ह्स्ताक्षरावरुन भावना समजुन घेण्यातली संवेदनशिलता व गंम्मत कशी बर कळणार. अर्थात सर्वच दोष त्यांचा नाही तर आपल्या पिढीचा आहे जी आज पंचेचाळीस ते पन्नास दरम्यानच्या वयोगटात आहे. आपल्या मुलांपर्यंत आपली संस्कृती पोहचवण्यात आपण कमी पडलो आहोत.कॉस्पॊपॉलीटीन संस्कृतीची भलावण करण म्हणजेच पुरोगामीपणा अशी आपण आपलीच समजुत घेउन घेतली आहे. मॅकडोनाल्ड मध्ये आपल्या मुलांना घेवुन जाण आणि बिसलेरीची पाण्याची बाटली देवुन आपल्या आजुबाजुच्या सर्वसामान्य माणसां पेक्षा आपण उच्च आहोत अशी त्यांची समजुत होण्यात आपलाही वाटा आहेच ना?
आपला देश हा आज तरुणाईचा देश म्हणुन ओळखला जातो.ही तरुणाई या ना त्या कारणाने घरापासुन दुरावत चालली आहे.अनेक घरात आई-वडिल एकटे तर कर्ती मुले परदेशात किंवा परगावात आहेत. अशी अनेक घरटी डोळे उघडे असतील तर आजुबाजुला सहज नजरेला पडतील. या ताटातुटीला नातेसंबधातला दुरावा हे कारण नसुन व्यवहारीक अगतीकता जास्त आहे हे ही मान्यच करायला हवं. मुल दुर गेलेल्या अश्या एकाकी वृध्द मंडळीना पैशाची गरज कमी तर सोबतीची गरज जास्त आहे.मनात असुनही किंवा शक्य असुनही अश्या मंडळींना मदत करणे अनेक कारणास्तव शक्य होत नाही. कारण काहीही असोत पण जग जवळ येत आहे अस म्हणताना जगा पासुन तुटत चाललेल्या माणसांची संख्या वाढतच चालली आहे.अश्या वेळी समुहने एकत्र येवून काही करण्याची गरज भासते.त्या दॄष्टीने काही संस्था प्रयत्न करीत आहेत ही आशेचीच किनार म्हणायला हवी. नुकताच पुण्याला काही कारणाने गेलो असता अश्याच एका संस्थाची माहिती मिळाली.ती संस्था म्हणजे " NRI Parent's Organisation, Pune ". या संस्थेच वैशिष्ट म्हणजे ज्या पालकांची मुल परदेशात आहेत अशी मंडळी या संस्थेची सदस्य आहेत.एकटे पणा कसा असतो ते प्रत्यक्षात अनुभवणारी माणसच दुसर्‍या समदु:खी माणसांना जास्त चांगल्या प्रकारे समजुन घेवु शकतात नाही का?या संस्थेतील व या प्रकारचे काम करणार्‍या प्रत्यकाच ..मग ती संस्था असो की व्यक्ती यांच कौतुक करायला हवच.
समाजा पासुन तुटत जाणारी दुसरी माणस म्हणजे आजुबाजुला काय चालल आहे त्याच भान नसलेली माणसं. समाजातील वाईट प्रवृत्ती विरुध्द प्रत्यक्ष काम करण ही सहज शक्य गोष्ट नाही हे मला देखिल स्वानुभवातुन कळतच की. पण आजुबाजुच सगळच आलबेल नाही किंवा खर सांगायच तर दिसत त्याहुन फारच फारच वाईट आहे हे कळुन न घेण म्हणजे असंवेदशीलताच नाही का?. नुकत्याच ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे म्हणतात "समाजा पुढचे प्रश्न मांडण्या साठी साहित्यीकांनी समाजातल्या प्रश्नांसंबंधी निश्चीत भुमिका घेण्याची गरज आहे". तेव्हा फक्त साहित्यीकांनी नव्हे तर आपल्या पैकी प्रत्येकानेच निश्चीत अशी भुमिका घेण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.
टाटा हे आपल्या देशात आदराने घेतल जाणार नाव आहे.हे नाव फक्त एका उद्योग संस्थेचच प्रतिनिधित्व करत नाही तर संस्कृतीच प्रतिक आहे. पण निता राडीया टेप प्रकरणातुन आलेल सत्य या संस्कृतीची काळी बाजु दाखवत तेव्हा आपल्या पुढचे आदर्श अधिक डोळस पणे पारखुन घेण आवश्यक आहे हेच अधोरेखीत करत. अर्थात आदर्श या शब्दाचा अर्थ आता आपल्या महाराष्ट्रात फार वेगळा झालेला आहे.त्यामुळे शब्दकोशाच्या पुढील आवृत्यांमध्ये आदर्श या शब्दा समोर हे नविन संदर्भ देण्यात आले तर आश्चर्य वाटायच कारण नसाव.
अश्या परिस्थितीत भांबाहुन गेल्या सारख सर्व सामान्य माणसांना झाल आहे.आशेन पहाव असे समोर काही दिसत नसताना उमेद टिकवुन ठेवण्याची कसरत करण्याची वेळ नविन वर्षाला सामोरे जाताना आली आहे.अंधार असला तरि प्रकाशाची तिरीप नक्कीच दिसणार आहे हा दरवर्षीचा आशावादच आपल्याला या वर्षाला अलविदा करताना मनात नक्कीच असणार आहे.
आपल्या मनातील या आशावादाच सर्वांच समर्पक शब्दरुप खालील गझलेतुन व्यक्त होत .....चित्रा सिंग यांनी ही गझल गायली आहे.


इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये
सुबह होने को है माहौल बनाके रखिये
जीनके हाथोंसे हमे जख्मे नीहॉं पहुंचे है
वो भी कहते है के जखमोंको छुपाये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये...........
कौन जाने के वो किस राह गुजर से गुजरे
हर गुजर गाह को फुलोंसे सजांये रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये ..........
दामने यार की झीनत ना बने आंसु
अपनी पलकॊं के लिये कुछ तो बचाकें रखिये
इक ना इक शम्मा अंधेरेमे जलाये रखिये .......
तेव्हा नविन वर्ष आपल्या सर्वांच्या मनोकामना पुर्ण करणार आणि आपल्या देशातील सर्व माणसांच जीवन समाधानाच करणार असु दे या माझ्या मनपुर्वक शुभेच्छा.

 
जय महाराष्ट्र जय मराठी


आपला

मैत्रेय१९६४

२८ डिसें, २०१०

नव्या इतिहासाचा शोध

                                                    लेखक- डॉक्टर सुनिल भुमकर


पुण्यातील लाल महालातुन दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्याने पुणे महानगर पालीकेत झालेल्या सव पक्षीय खेळोमेळीच्या (?) चर्चेची सविस्तर माहिती आजच्या मराठी वर्तमानपत्रात आलेली आहे. या चर्चेत शिवसेना-भाजप आणि मनसे एका बाजुला तर दुसर्‍या बाजुला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसर्‍या बाजुला होती.तर चर्चेचे परिक्षक म्हणुन श्री.मोहनसिंग राजपाल,सन्माननीय़ महापौर,पुणे महानगरपालीका यांनी काम पाहीले .महानगर पालिकेतील तमाम मराठी नगरसेवकांची आपसाआपसात झालेली ही खेळोमेळीची चर्चा पाहाताना व अनुभवताना "मराठा तितुका मेळवावा" याची याच देही याच डोळा प्रचिती परिक्षकांना आली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रुच आले असही काहीसे वाचनात आल आहे.
या घटनेतुन तसेच इतिहास संशोधक संभाजी ब्रिगेड संस्था यांच्या इतिहास संशोधनातुन उघडकीस आलेल्या काही नव्या शोधांमुळे आणि सर्व धर्म समभाव या संकल्पनेने माझे परम मित्र डॉक्टर सुनिल भुमकर हे फारच प्रेरीत झालेले दिसतात. त्यामुळे डॉ. भुमकर यांनी,त्यांना त्यांच्या प्रदिर्घ इतिहास संशोधनाच्या अभ्यासातुन नव्याने गावलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहा्सातील काही भाग त्यांच्या ब्लॉगवर काहीश्या घाईघाईने प्रकाशीत केलेला आहे.डॉ.भुमकर यांनी प्रकाशीत केलेल्या भागातील मौत्तिके खालील प्रमाणे:
१. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले.
२. शिवाजीमहाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी (हिंदवी नव्हे) स्वराज्याची’ स्थापना केली.
३.शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते व त्यांनी त्याची प्रेरणा महात्मा गांधीं कडून घेतली होती.
४.आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. कारण अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते.
५.अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीत अफझल खानला छातीत हार्टअटॅक’ ची अचानक जोरात कळ येवुन तो मेला. त्या वेळी महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले.
माझ्या मित्राने या शिवाय बरच काही नव महत्वाचे संशोधन मांडल आहे ते त्याच्याच प्रेमळ शब्दात वाचणेच योग्य ठरेल.
हे सर्व लिहिताना महाराष्ट्रातील जातीय सलोखा टीकुन राहावा म्हणुन माझ्या मित्राने अफझल खान आणि शिवाजी महाराज या दोघा मित्रांच्या भेटीच्या प्रसंगातील एक सत्य नमुद केलेले नाही.ते म्हणजे महाराजांचे डॉक्टर हे ब्राम्हण असल्याने खानाच्या औषध उपचारा साठी जाणुनबुजुन वेळेवर पोहोचले नाहीत हे ते सत्य.पण एकवेळ जातिय सलोखा तुटला तरी चालेल पण त्यांनी हे सत्य लपवुन ठेवु नये व पुढील भाग लिहीताना हा ब्राम्हणी कावा जरुर उघडकीस आणावा.
तेव्हा माझ्या मित्राने अभ्यासातुन परिश्रम पुर्वक संशोधीत केलेला इतिहास आपण जरुर वाचावा व त्याच्या अभ्यासास दाद द्यावी जेणेकरुन पुढील भाग लवकारात प्रकाशीत करण्याची त्याला प्रेरणा मिळेल हे नम्र आवाहन.

डॉ.भुमकर यांच्या ब्लॉगचा दुवा http://raamprahar.blogspot.com/2010/12/blog-post_27.html

आपला
मैत्रेय१९६४

१४ डिसें, २०१०

आधुनीक ब्लॉग-चौर्यकर्म

महाजालावर भटकत असताना हेरंब यांच्या "पुन्हा चोरशील" या ब्लॉगवरचा आधुनीक ब्लॉग-चौर्यकर्मा वरचा लेख वाचण्यात आला.या लेखात त्यांनी इतरांच्या ब्लॉगवरचे लेख ईत्यादी ढापणार्‍यांच्या चोरीचा पाठपुरवा कसा व का करायला हवा याच छान विवेचन केल आहे. त्यांची कल्पना छान पण त्याहुन जास्त महत्वाच पाठपुरावा करण्यातली त्यांची चिकाटी. म्हणुनच यावर तब्बल ५३ टीपण्या आल्यात. पण एक लक्षात येत की शेवटची टीपणी आहे ती २ ऑगष्ट २०१० ची. याचे दोन अर्थ निघतात -
(१) हा ब्लॉग जास्त जणां पर्यंत पोहोचला नाही किंवा
(२) ब्लॉग लिहीणार्‍या बहुतेकांचे अर्थाजन ब्लॉगवरील लिखाणावर अवलंबुन नसल्याने आपला लेख किंवा लिखाण दुसर्‍या कोणी चोरल्याची तितकीशी ची्ड ये्त नसावी.
या मुळे हेरंब यांचा उपक्रम कमी महत्वाचा ठरत नाही. अश्या चोर्‍या करणार्‍यांवर सामुदायीक रीत्या हल्ले चढवले नाहीत तर ते सोकावतील. तेव्हा हा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचुन चोरी करणार्‍या विरुध्दचा समुह कट्टा बनावा ही गरज आहे अस मला प्रामाणीकपणे वाटत. त्या मुळे मी माझ्या ब्लॉगवर हेरंब यांच्या ब्लॉगची लिंक देत आहे. ज्या ज्या कोणाला अश्या चोर्‍या आढ्ळतील किंवा या बाबत काही करायची इच्छा असेल त्यांनी या ब्लॉगला जरुर भेट द्यावी हे आवाहन.

हेरंब यांच्या ब्लॉगचा दुवा - http://punha-chorashil.blogspot.com

आपला

मैत्रेय१९६४





१२ डिसें, २०१०

मिशन काश्मीर

                           मिशन काश्मीर
                                         लेखक : रविंद्र दाणी
                                    प्रकाशक : अमेय प्रकाशन
                                       प्रथमावृत्ती : २३ जून २०१०
श्री. रविंद्र दाणी यांच्या सारख्या अभ्यासु पत्रकाराने लिहिलेले हे पुस्तक काश्मीर प्रश्नाची सर्वातोपरी माहीती तर करुन देतच पण त्याच बरोबर तेथील सद्यपरीस्थितीची भेदक जाणीव करुन देत.या पुस्तकाला अत्यंत समर्पक प्रस्तावना लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) एस.के.सिन्हा, माजी राज्यपाल जम्मु-काश्मीर व आसाम यांची आहे. पुस्तक संपुर्ण वाचल की प्रस्तावना लिहीण्यास श्री.सिन्हा यांच्या ईतकी अधिकारी व्यक्ती दुसरी कोणी नव्हती हे आपल्यालाही पटत. श्री. सिन्हा यांची लष्करी पार्श्वभुमी व माजी राज्यपाल जम्मु-काश्मीर ही ओळखच पुस्तकाची प्रस्तावना किती अभ्यासपुर्ण व परखड असेल याची कल्पना देते.
काश्मीर म्हणजे अव्दीतीय निसर्गसौंदर्य , चिनारचे वृक्ष,दाल सरोवर,शाही बागा, केशराची शेती,बर्फाच्छादीत हिमशिखरं व अनेक हिंदी चित्रपटातुन पाहीलेली मदनरती नायक-नायीकांची अंगमस्ती असे प्रणयरम्य चित्र डोळ्यापुढे उभ राहतं नाही का?पण या प्रणयरम्य चित्रामागच्या भेसुर वास्तविकतेच हे पुस्तक वाचल्या नंतर जे दर्शन होत त्यामुळे स्वप्न व सत्य यातील विरोधाभास मनावर ओरखडा काढुन जातॊ.
आजचा काश्मीर प्रश्न निर्माण झाला तो फाळणीच्या वेळी. फाळणीच्या वेळी हिंदुस्तानच्या ज्या ज्या भागात संस्थानांची सत्ता होती त्यांनी भारतात सामिल व्हायच की पाकीस्तानात याचा स्वयं निर्णय घेण्याचे अधिकार त्या संस्थानांना देण्यात आले होते. १५ ऑगष्ट १९४७ साली देश स्वतंत्र झाला पण त्यावेळी अनेक संस्थानांचा भारतात सामिल व्हायच की पाकीस्तानात याचा निर्णय झाला नव्हता. त्या पैकी दोन मोठी संस्थान म्हणजे हैद्राबाद व दुसर काश्मीर. भारतीय नेत्यांपैकी सरदार वल्लभभाई पटेल सोडले इतर भारतीय नेत्यांची, विशेषत: पंडीत. नेहरु यांची , काश्मीर प्रश्नी उदासीनताच होती.एकीकडॆ भारतीय नेत्यांची उदासिनता तर दुसरीकडॆ भारताचे तात्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंट्बॅटन व कायदेआझम जीना यांची काश्मीर पाकिस्तानात सामिल व्हाव या साठी धडपड सुरु होती. जीना यांनी राजे हरिसिंग यांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न केले.पण राजे हरिसिंग यांनी त्यांना दाद लागु दिली नाही.असे असले तरी काश्मीरचे राजे हरिसिंग यांची भारतात सामिल होण्याविषयी व्दीधा मनस्थीती होती.पण ज्या वेळी पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरवर चढाई केली त्या वेळी पर्यायच उरला नसल्याने राजे हरिसिंग यांनी दि. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे भारतात विलयीकरण करण्याच्या विलयपत्रावर स्वाक्षरी केली. मग सुरु झाल ते घुसखोरां विरुध्दच युध्द. या युध्दात सुरुवातीच्या पिछेहाटी नंतर भारतीय सैन्याने एका मागुन एक ठिकाण ताब्यात घेण्यास सुरुवात केली.त्या मुळे भारतीय सैन्य लवकरच सगळे काश्मीर खोरे परत मिळवेल असे चित्र होते. अश्या रितीने भारतीय सैन्याची विजयपथावर वाटचाल सुरु असतानाच माउंट्बॅटन यांच्या सल्यावरुन(? की बदसल्यावरुन) पं. नेहरुंनी दि. १ जानेवारी १९४८ रोजी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघा पुढे नेला. त्या मुळे शस्त्रसंधी होवुन पाकिस्तानी घुसखोरांच्या ताब्यातील भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला तो गेलाच. पाकिस्तान विरुध्दची दोन युध्द जिंकूनही तो आपण परत मिळवु शकलो नाही हे लक्षात घेतल तर काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघा पुढे नेण्यात किती घॊडचुक झाली हे दिसुन येत.
त्यातच पुढे दि. २८ ऑक्टोबर १९४८ रोजी आकाशवाणीवरुन भाषण करताना पं. नेहरुंनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखी खाली जनमत घेतले जाईल असे जाहीर केले. याचाच आधार भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्तान तसेच अतिरेक्यां कडुन घेतला जातो. काश्मीर बाबतची ही गुंतागुंत अजुनच वाढली ती घटनेत काश्मीरसाठी कलम ३७० ची तरतुद केल्याने. या कलमामुळे काश्मीरचे वेगळेपण अधिरेखीत होते असा स्वायत्ततेची मागणी करणार्‍या काश्मीरी नेत्यांचा आग्रह असतो . पण याच कलमा बद्द्ल पं. नेहरुंनी दि. २७ नोव्हेंबर १९६३ रोजी लोकसभेत केलेल्या निवेदनात कलम ३७० हे अस्थायी असल्याचे स्पष्ट केले होते ही बाब जनमत घेण्याची मागणी करणारे दहशदवादी असोत की काश्मीरचे तथाकथीत नेते असोत सोईस्कर रित्या विसरतात.
काश्मीरचे नेते स्वायत्तता देण्याची वारंवार मागणी करीत असले तरी राज्याची आर्थीक स्थीती अशी आहे की, स्वायत्तता दिल्यास तेथील राज्य सरकार आपल्या कर्मचार्‍यांना वेतन पण देवू शकणार नाही.राज्याचा बहुतांश आर्थीक केंद्र सरकार उचलत आहे.सर्व साधारण असा समज आहे की जम्मु- काश्मीर मध्ये सर्वत्र मुस्लीम बहुसंख्य आहेत.तथापी भौगोलीक दृष्ट्या विचार केला तर राज्याची काश्मीर खोरे,जम्मु व लडाख अशी तीन भागात विभागणी करता येईल. या तिनही भागातील समाज, भाषा व संस्कृती यात भिन्नता आहे काश्मीरमध्ये ३५% हिंदु आहेत. विशेषत: जम्मु भागात हिंदुंची संख्या जास्त आहे. एव्हडेच नव्हे तर पाकिस्तान मध्ये सुन्नी जास्त आहेत तर पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगीट- बाल्टीस्तान या भागा मध्ये शियांचे प्राबल्य आहे. त्या मुळे तेथेही शिया-सुन्नी संघर्ष सुरुच आहे. जम्मु -काश्मीरच्या २,२२,२३६ कि.मी. भुभागापैकी फक्त ४५.६२% भुभाग प्रत्यक्षामध्ये भारताच्या ताब्यात आहे. तर पाकीस्तानच्या ताब्यात ३५.१५% तर चीनच्या ताब्यात १६.९% भुभाग आहे. भारताच्या प्रत्यक्ष ताब्यातील भुभागा पैकी ४५% भाग जम्मुचा असुन त्या मधील लोकांचा कलम ३७० ला विरोध आहे.या बाबी लक्षात घेतल्या की काश्मीर प्रश्नाची गुंतागुंत ध्यानात येते.त्या मुळे फक्त धार्मीक अंगाने विचार करुन हा प्रश्न सुटेल असे म्हणने म्हणजे भाबडेपणा ठरेल.
भारताने या प्रश्नाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फार मोठी किंमत आजपावतो मोजली आहे.या प्रश्नातुन निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादा विरुध्दच्या छुप्या युध्दात भारताने प्रचंड आर्थीक किंमत भारताने मोजली आहे. गेल्या दोन दशकातच देशाचे काही हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. पाकिस्तानात दहशदवादी तयार होत असले तरि त्याची पाकिस्तानी लष्कराला फारशी किंमत मोजावी लागत नाही. तर पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगीट- बाल्टीस्तानचे लष्करी- भौगोलीक महत्वा बरोबरच आर्थीक महत्व फार मोठे आहे.या भागात एकंदर १४८० सोन्याच्या खाणी सापडल्या असुन तेथे युरेनियम, गंधक , लोखंड हे देखील मुबलक प्रमाणात आहे. सोन्याच्या १४८० खाणींपैकी फक्त ७० खाणींमधिल सोन्याची किंमत रुपये २५,००,००,००,००,००,००,००० ( २५ लाख अब्ज रुपये) आहे असा प्राथमीक अंदाज आहे.त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरच्या रुपाने भारताने फक्त जमीनच गमावली नसुन मोठ्या प्रमाणात मौल्यवान खनीज संपत्ती गमावली आहे हे या पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे.
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला.त्या नंतर ३-४ महीन्यात पाकीस्तानने घुसखोरी केली. त्यातुन झालेल्या पहील्या संघर्षात भारताने अधिकारी-जवान मिळुन ११०३ जण गमावले. १९६२ च्या चीन विरुध्दच्या युध्दात अधिकारी-जवान मिळुन १३७३ जण गमावले,१९६५ च्या पाकीस्तान विरुध्दच्या युध्दात अधिकारी-जवान मिळुन १५०० गमावले,१९७१ च्या बांगला मुक्ती संग्रामात अधिकारी-जवान मिळुन २००० हुन अधिक गमावले तर १९९९ च्या कारगील युध्दात अधिकारी-जवान मिळुन ५२७ जण गमावले.थोडक्यात काय ६२ वर्षातील ५ युध्दात भारताने एकुण ६५१३ अधिकारी-जवान गमावले.तर दहशतवाद्यां बरोबरच्या संघर्षात भारतीय सुरक्षा दळांची प्राणहानी आहे १०,००० हुन अधिक अधिकारी-जवानांची तर जखमींची संख्या आहे १२,००० हुन अधिक. याचाच अर्थ खुल्या युध्दापेक्षा छुप्या युध्दाची किंमत कितीतरी अधिक आहे हे या पुस्तकात सप्रमाण दाखवुन दिले आहे.
असे हे काश्मीर खोरं भारताच्या ताब्यात आहे ते केवळ सुरक्षा दळांच्या तैनातीमुळे. साधारणपणे साडे तीन लाख सुरक्षा जवान काश्मीर खोर्‍यात तैन्यात आहेत.या सुरक्षा दळांना तेथील स्थानीक जनता कोणतेच सहकार्य देत नाही ही वस्तुस्थिती आहे. काश्मीर खोर्‍यातील तैनात जवानांची संख्या लक्षात घेता तेथे युध्दजन्य परिस्थितीच आहे. पण हे युध्द उघड स्वरुपाचे नसुन छुपे आहे.हे युध्द केवळ सिमेवर लढले जात नसुन ते गावागावात, गल्लीबोळात आणि घराघरातुन लढले जात आहे हे लक्षात घेतले तर भारतीय सुरक्षा दळांना किती कठीन परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे याची कल्पना येईल. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या तक्त्यातील सरकारी आकडेवारी प्रमाणे :

कालावधी     अतिरेक्यांची संख्या            जवान-अधिकारी  संख्या

१९९० ते     ठार पकडलेले शरणागत             ठार        जखमी

२००९      २५१३५ २४१४६ १८८७                ४५६९        ६७०१

(टिप : अनधिकृत आकडेवारीनुसार ११००० हुन अधिक जवान-अधिकारी दहशतवाद्यां बरोबरच्या लढ्यात शहिद झालेले आहेत.)
त्या मुळे सहलीचा आनंद लुटण्या साठी आपल्या काश्मीरला जरुर जाव पण तेथील निसर्गसौंदर्य लुटताना आपल्या देशाने या साठी काय किंमत मोजली आहे त्याचा विचार पण मनात जरुर यायलाच हवा.
सर्वसाधारणपणे प्रकाशकाचे मनोगत पुस्तकात मांडण्याचा प्रघात नाही. पण काश्मीर प्रश्नाची संवेदनशिलता लक्षात घेवुन प्रकाशकाने आपले मनोगत मांडले आहे. पुस्तकाचे प्रकाशक श्री. उल्हास लाटकर ,अमेय प्रकाशन म्हणतात " काश्मीरचा भुतकाळ व वर्तमानकाळ अस्वस्थ करुन टाकतात. तिथे शांतता व स्थैर्य नांदाव या साठी अहोरात्र प्राणपणान लढणार्‍या तसेच बलिदान दिलेल्या भारतीय सुरक्षादळांतील शुरविरांच्या शौर्याला आदरांजली वाहुन मिशन काश्मीर हे पुस्तक वाचकांच्या हाती देत आहे.
हे पुस्तक वाचल्या नंतर भारतीय सुरक्षादळांच्या व वीरमरण आलेल्या सैनिकांच्या प्रती अभिमान व कृतज्ञता निर्माण झाल्या शिवाय राहात नाही व त्यातुन प्रकाशकाचा हे पुस्तक प्रसिध्द करण्या मागचा हेतु सिध्द होतो. आणि हेच लेखकाच लेखन सामर्थ व प्रकाशकाच यश आहे.



१० डिसें, २०१०

सन आठराशे सत्तावन्न (१८५७)

                      सन आठराशे सत्तावन्न (१८५७)


                                          लेखक - नारायण केशव बेहरे
                                       प्रकाशक - श्री विद्या प्रकाशन ,पुणे
                                          आवृत्ती - ३ री, दि. १० मे २००७

१८५७ चा विषय निघाला की,"१८५७चे स्वातंत्रसमर" हे स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांचे पुस्तक आठवते. आपल्या पैकी बहुतेकांनी हे पुस्तक वाचलेले असेलच. त्यामुळे हिंदुस्तानाच्या इतिहासातील या कालखंडा बद्दल एक निश्चित असे मत आपल्या मनात असत जे सावरकरांच्या पुस्तकावरुन तयार झालेल असत. त्या मतांना साधार छेद देण्याच आणि एका वेगळ्या अंगाने ’१८५७’ बद्दल विचार करण्यास प्रवृत्त करणार एक पुस्तक नुकतच माझ्या वाचनात आलं. पुस्तकाच नाव आहे " सन आठराशे सत्तावन्न " आणि त्याचे लेखक आहेत नारायण केशव बेहरे. १८५७ या कालखंडाच्या बाबत श्री. बेहरे यांनी लिहीलेल्या या अभ्यास पुर्ण पुस्तका बद्दल स्वत: वीर सावरकरांनी गौरवोद्गगार काढले आहेत ते असे:
" मी १९५७चे स्वातंत्रसमर हे पुस्तक इंग्लंड्मध्ये लिहिले. परंतू ते लिहीताना इतिहासाची सर्वच साधन उपलब्ध नव्हती. परंतू ते लिहीताना एकच उद्देश होता तो म्हणजे भारताचे स्वातंत्र मिळण्या करीता सर्व देशबांधवांच्या मनात स्वातंत्रतेची ज्योत पेटवावी.त्यामुळे त्या पुस्तकातले सर्वच प्रसंग इतिहासाला धरुन असतील असे नाही. खर्‍या इतिहासाशी प्रामाणीक राहून जर कोणी या विषयावर लिहीले असेल तर ते प्रा. नारायणराव बेहरे यांनी. तेव्हा त्यांचा सन आठराशे सत्तावन्न हा ग्रंथ त्या दृष्टीने पाहावा."
हे पुस्तक म्हणजे अभ्यासू ग्रंथ असल्याने सर्वच इतिहास प्रेमी लोकांनी जरुर वाचावा जेणेकरुन आपल्या इतिहासा कडे त्रयस्थ नजरेने पाहाण्याची दृष्टी निश्चितच तयार होईल.पुस्तकातले निकर्ष हे काहीसे कटु वाटले तरी अभ्यासाअंती काढलेले असल्याने मान्य करायलाच हवेत. ते खालीलप्रमाणे आहेत:
(१) श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या मराठी माणसांच्या राजसत्तेच्या रो्पट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले ते रणधुरंदर थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात. त्याचीच परिणीती मराठी सैन्याच्या अटकेपार जाण्यात झाली.त्यावेळी मराठी माणसांच्या शौर्याचा इतका दबदबा समस्त हिंदुस्थानात होता की अटकेपार जाताना मराठी सैन्याला सबंध हिंदुस्थानात कोठेही प्रतिकार झाला नाही.मोगल आणि राजपुतांनी मराठ्यांचे वर्चस्व जणू मनोमनी मान्यच केले होते.एकंदरीत काय मराठी माणसांचे शौर्य आणि राजकीय वर्चस्व समस्त हिंदुस्थानाने मान्यच केले होते.मोगल सत्ता इतकी दुबळी झाली हॊती की, मोगल बादशाहाच्या अंमलाखालील प्रांतातून चौथ व सरदेशमुखी मराठे सरदार वसुल करत असत.त्यामुळे इंग्रजांचा युनियन जॅक ज्या क्षणी शनिवार वाड्यावर फ़डकला त्याच क्षणी इंग्रजांचे साम्राज्य हिंदुस्तानावर स्थापीत झाले असे समजण्यात येते. त्या मुळे मुसलमानां पासून हिंदुस्तानची सत्ता इंग्रजांनी मिळवली हा अपसमज हिंदुस्तानी माणसांनी , विशेष करुन मराठी माणसांनी मनातून पार काढुन टाकला पाहीजे.इंग्रजांनी हिंदुस्तानची सत्ता ही मराठ्यांचा पराभव करुनच मिळवली हे सत्य नाकारताच येत नाही.
(२)इंग्रजांचे साम्राज्य हे इस्ट इंडीया कंपनीच्या रुपाने सुरुवातीला प्रस्थापीत झाले होते. व्यापार करण्याच्या हेतुने चंचुप्रवेश केलेल्या कंपनीने युक्ती प्रवॄत्तीने इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत केले.कंपनीचा हिंदुस्तानातील गव्हर्नर जनरल हा कंपनीच्या वतीने कार्यभार पाहात असे. एका अर्थी गव्हर्नरच्या हाती निरंकुश सत्ता होती.या कंपनीचे धोरण हे सुरुवातीला तरी व्यापारी म्हणुन नफ़ा कमवण्याचेच होते आणी त्या बद्दल दोष देण्यासारखे असे काही नाही. तथापि नंतर मात्र कंपनीने या देशाच्या राजकारणात ढवळा ढवळ करण्यास सुरुवात केली. त्या साठी तैनाती फ़ौजेच्या रुपाने कंपनीने स्वत:चे सैन्य उभारले. या फौजेचा खर्च तैनाती खर्च बाळगणारा राजा अथवा संस्थानीक करीत असला तरी ही फौज कंपनीच्या अधिकार्‍यांचेच हुकुम मानत असे.त्यामुळे कोणताही खर्च न करता कंपनीला सैन्याची उभारणी करता येणे शक्य झाले.इंग्रजांच्या या बुध्दी कौशल्याची तारीफच करायला हवी नाही का?
(३) सन १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन आला.त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत. या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली.त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रीक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती ( नीती कसली अनीती ) होती. या मुळे हिंदुस्तानातील राजे अथवा संस्थानीक यांच्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभुमीवर १८५७ च्या बंडाची बीजे रोवली गेली होती.
(३) त्यातच बंदुकीच्या काडतुसांना गाईच चरबी लावलेली असायची या धार्मिक कारणाची भर पडली.
(४) या बंडामागे हिंदुस्तान हे एक राष्ट्र आहे ही भावना कोठेच नव्हती. बंडात भाग घेणारे अथवा त्यास खतपाणी घालणारे हे राज्य गमावलेले भुतपुर्व राजे अथवा संस्थानिक होते.या बंडात भाग घेणारे बहुतांश लोक लुटालुट करीत ज्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या बंडाविषयी उदासिनता निर्माण झाली.सर्वसामान्य जनतेचा पाठींबा नसेल तर क्रांती यशस्वी होत नाही . त्यामुळे इंग्रजी सैन्य संख्येने कमी असुनही हे बंड मोडणे त्यांना शक्य झाले.
(५) बंडाचा प्रभाव हा उत्तर हिंदुस्थानातील मर्यादीत भागात होता. बादशाहाच्या नावाने सत्ता स्थापीत झाली तर मुसलमान परत शिरजोर होवुन अत्याचार करतील या साधार भितीने उत्तर हिंदुस्तानातील शिख, गुरखे यांनी इंग्रजांना बंड मोडण्यास मदत केली.
(६) दक्षिणेचा बहुतांश भागात शांतता होती. बराचश्या मद्राशी पलटणींनी तर बंड मोडण्यात भाग घेतला. या बंडात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे , राणी लक्ष्मीबाई आदी मराठी रणधुरंदरांनी बंडवाल्यांचे नेतृत्व केले असले तरी महाराष्ट्रातुन त्यांना कुठलाही पाठींबा मिळाला नाही हे सत्य आहे. किंबहुना या धामधुमीत मराठी मुलखात शांततात होती.
ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली तर हे बंड का अयशस्वी झाले ते कळुन येते. असे असले तरी या बंडामुळे काही गोष्टी निश्चितच घडुन आल्या. त्या म्हणजे-
(अ) हिंदुस्थानी जनतेतील असंतोष लक्षात घेवून इंग्लंडच्या राणीने इस्ट इंडीया कंपनीच्या हातुन हिंदुस्थानचा कार्यभार काढुन घेतला.
(ब) राणीने कार्यभार स्वत:कडे घेतल्यावर येथील जनतेसाठी जाहीरनामा जाहीर केला.
(क) त्यात राणीने दिलेली आश्वासने लक्षात घेतली तर अप्रत्यक्षरीत्या कंपनीचे हिंदुस्थानातील धोरण अन्यायकारक होते याचीच कबुली मिळते.
(ड) हा जाहीरनामा या पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे. तो मुळापासुन वाचण्या सारखा आहे. त्यातील अनेक बाबी या आपल्या घटनेच्या मुलतत्वांचा आधार आहेत असे लक्षात येते.
एकंदरीत काय अभ्यासातुन लिहिलेला इतिहास आणि अभिनिवेशातुन लिहिलेला इतिहास या पैकी कोणातुन किती व काय घ्यायच याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर तर येतेच पण त्याच बरोबर एखाद्या विशिष्ठ कालखंडातील घटनाक्रम इतिहासात काय निर्माण करु शकतो याची जाणिव होते.


२२ नोव्हें, २०१०

रविवार सकाळ

                             रविवार सकाळ

नेहमीचीच रविवार सकाळ......... आळसावलेली. अजुन थोडा वेळ झोपल पाहीजे अस वाटत होत पण पहिल्यांदा आलेला बायकोचा प्रत्यक्ष व नंतरचे मुलांमार्फत आलेले निर्वाणीचे निरोप लक्षात घेता अधिक काळ झोपण आरोग्यास हानीकारक ठरल असत.उठलो एकदाचा बापडा. मुलांची बाहेर हॉलमध्ये आईकडे संडे स्पेशल करण्याची लाडीगोडी सुरु होती.पण तिकडचा सुर काहीसा चढा असल्याच जाणवल. तेव्हा मी म्हणालो," चला, आज कोंबडी बनवूया.". चिकन येवजी कोंबडी कानाला जरा विचित्र वाटत नाही का? .पण काय करणार मनसे फ़ॅक्टरचा परीणाम ................ .यावर दोन्ही मुल एकदम खुष झाली. तिने मात्र माझ्या या वाक्यावर सुसंवादालाच सुरुवात केली. अश्या संवादाचा शेवट ,ज्या प्रमाणे तुमच्याही घरी होतॊ तसाच झाला. त्रिपुरी पौर्णीमेला घरात कोंबडी करण म्हणजे अब्रम्हण्यम हे मला मनोमनी पटलच.
थोड्या वेळाने तिच्याच बरोबर प्रभात फेरी करायला बाहेर पडलो.आम्ही राहातो तिथुन थोड्याच अंतरावर रेल्वे कॉलनी आहे.कॉलनीतली बैठी घर व त्याच बरोबर आवर्जुन जपलेली अनेक झाड-झुडप यामुळे शहराच्या मध्यभागात असुनही परिसर काहीसा निवांत असा आहे. कर्दळ,आळु,कोरफड, केळी, पपई या सारखी शहरात न दिसणारी पण गावातल्या घरच्या परसात हमखास आढळणारी झाड तिथे राहाणार्‍या लोकांनी लावलेली आहेत. एकंदरीत काय आजुबाजुला मोकळी जमिन मिळाली की माणसं घराच्या परसात आपल गाव रुजवायचा प्रयत्न करतात हेच खर...............
रविवारचा महत्वाचा एक कार्यक्रम म्हणजे निवांतपणे आलेली वर्तमानपत्र वाचण जे इतर दिवशी शक्य होत नाही.पहिल्याच पानावरची बातमी वाचुन स्वत:ला चिमटाच काढला.राज्याचे नविन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या वार्ताहर परिषदेत संपुर्णपणे मराठीतुनच बातचीत केली. एव्हडच नव्हेतर या पुढेही होणार्‍या वार्ताहार परिषदांत ते हिंदी व इंग्रजी प्रश्नांवरही फक्त मराठीतुनच उत्तर देतील अस ठणकाहुन सांगीतल. बापरे हा कॉंग्रेसचा मुख्यमंत्री आहे की मनसेचा............ थोडक्यात काय या पुढे मराठीच्या संबंधातील भावनीक मुद्द्यांवर आंदोलन करण्या ऎवजी मराठी तरुणांचे हृद्यसम्राट मा. राज ठाकरे यांना त्यांच्या पवित्र्यात बदल करावा लागणार आहे. अस केल नाहीतर शिवसेने सारखच मुख्यमंत्र्यांनी आमचे मुद्दे हायजॅक केले असे म्हणण्याची वेळ मनसेवर लवकरच आल्या शिवाय राहाणार नाही.
सगळ्यांना माहीत आहेच की, डिसेंबर मध्ये ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या ही संमेलना बाबत सुरुवाती पासुन वादविवाद झाले आहेत - पुढे ही करवले जाणार आहेत. त्या मुळे मराठी भाषेचा करमणुकपर उत्सव थाटामाटात पार पडेल यात शंका नसावी. भाषा ही फक्त व्यक्ती व्यक्तीं मधील संवादाच माध्यम नसुन ते ती भाषा बोलणार्‍या समाजाच्या राजकीय, सामाजीक व भाषीक मानसिकतेच्या अभिव्यक्तीच प्रगटीकरण आहे. पण हे लक्षात कोण घेतो. त्या मुळे मग मराठीच्या साहित्य दरबारात मा.अमिताब बच्चन हिंदीत बोलतात ,हिंदीत कविता म्हणतात आणि त्यालाच सगळ्यात जास्त दाद मिळते. याची ना खंत साहित्यीकांना ना दरबारात भक्तीभावाने उपस्थित असलेल्या तुम्हा-आम्हा साहित्य प्रेमींना......................
कालच्या वर्तमानपत्रात महाराष्ट्राच्या नविन मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाची माहीती आली आहे. किती समर्पक शब्द आहे खाते.....वाटप नाही का ?. असो. मा.श्री. राजेंद्र मुळक या मा. मुख्यमंत्रांच्या विश्वासातील राज्यमंत्रांकडे अनेक महत्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. ती अशी- वित्त व नियोजन व उर्जा (संबधीत कॅबिनेट मंत्री- मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ), जलसंपदा ( संबधीत कॅबिनेट मंत्री- मा. श्री.सुनिल तटकरे ), उत्पादन शुल्क (संबधीत कॅबिनेट मंत्री- मा.श्री. गणेश नाईक). हा योगायोग म्हणायचा की चेकमेट ......................................
श्रेष्ठ रशियन कादंबरीकर व थोर तत्वचिंतक लियो टॉलस्टॉय यांच्यावर आजच्याच लोकसत्तात एक छान लेख आला आहे.वॉर अ‍ॅन्ड पीस या कादंबरीच नाव घेतल की आपसुकच टॉलस्टॉय यांची आठवण होतेच.अश्या या महान लेखकाची आठवण आणि त्याच्या बद्दलची माहीती या लेखामुळे मिळाली. याच निमित्याने थोड्याच दिवसान पुर्वी वाचलेल्या गॉन विथ द विंड ( अनुवाद - मोनिका गजेंद्रगडकर) या कादंबरीची आठवण झाली. अमेरिकेतल्या राज्या-राज्यां मधिल झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी आपल्याला कितीशी आवडॆल अश्या साशंकतेनेच मी ती वाचायला सुरुवात केली. पण खरच सांगतो ती कादंबरी वाचून भारावुन गेलॊ. स्कार्लेट ओ हारा ही म्हटली तर कादंबरीची नायिका. तिच्या आयुष्यातील घटनां भोवती ही कादंबरी रचली आहे. नायिकेच्या आयुष्यात तिच्यावर येणार्‍या संकटांना ती धाडसाने समोरी जाते.पण ज्याच्यावर ती मनापासुन प्रेम करते त्याच प्रेम शेवटपणे तिला मिळत तर नाहीच पण तिच्यावर जो प्रेम करत असतो त्यालाही ती शेवटी गमावुन बसते. त्या कादंबरीत एक वाक्य आहे. स्कार्लेटची आई तिला सांगते " पुरुषांवर आपण कितीही प्रेम केल तरी त्यांच प्रेम असत ते जमिनीवर.तिच्या साठी ते लढतात आणि वेळ प्रसंगी सर्वस्व गमावतात.".कादंबरीतल हे वाक्य माझ्या मनात एक विचार निर्माण करुन गेल.महाभारतातल्या कौरव-पांडवा मधिल युध्दासाठी अनेक कारणं होती त्या पैकी सर्वात महत्वाच म्हणजे भर दरबारात द्रौपदीचा द्युतानंतर कौरवांनी केलेला अपमान.हे जर महत्वाच कारण होत तर फक्त पाच गाव स्विकारुन युध्द टाळण्याचा प्रस्ताव कौरवां पुढे ठेवताना त्या मध्ये द्रौपदीची पण क्षमा मागण्याची अट का बर पांडवांनी टाकली नव्हती.जर दुर्योधनाने पांडवांचा तो प्रस्ताव मान्य केला असता तर ..................
येत्या १४ जानेवारी २०११ ला मराठे व अब्दाली यांच्यात दि.१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे झालेल्या संग्रामाला २५० वर्षे पुर्ण होत आहेत.या युध्दात धारातिर्थी पडलेल्या लाखो मराठी विरांच स्मरण सगळ्यांनाच असायलाच हव. हा फक्त दोन सत्तांमधिल संघर्ष नव्हता. अब्दाली हा मोगलांच्या दरबारातील मुसलमान सरदारांच्या ,विषेशत: नजीबखान रोहिल्याच्या विनंतीवरुन भारतात आला होता. तर मराठे हे हिंदुस्थानचे रक्षणकर्ते म्हणुन लढणार होते थोडक्यात एक पक्ष धर्मासाठी तर दुसरा देशासाठी लढ्णार होता.वास्तवीक पाहाता मराठ्यांचे हे ध्येय लक्षात घेता सर्व जनतेने सहकार्य करायला हवे होते. पण तसे घडले नाही. पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांनी दिलेल्या झुंजीचे शत्रुने - प्रत्यक्ष अब्दालीने-केलेले कौतुक पाहाता समस्त मराठी माणसांनी या लढाईचा अत्यंत अभिमान बाळगायला पाहिजे.पण लढाईतल्या अपयशावर आपण आपल्या पुर्वजांनी हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतावर केलेल्या बलीदानाची किंमत करतो हे बरोबर नाही. जय-पराजय महत्वाचे नाहीत तर ज्या कारणांसाठी लढा दिला गेला ते कारण जास्त महत्वाच.पानिपतवर एकुण महत्वाच्या लढाया तिन झाल्या.पहिल्या दोन लढायातील विजयी पक्षाने दिल्लीवर राज्य केल तर तिसर्‍या लढाईत विजयी झालेला पक्ष-अब्दाली- मराठ्यांच्या शौर्याने दिपुन परत माघारी निघुन गेला. तेव्हा ध्येय उदात्त असेल तर हरणारी लढाई पण वेळप्रसंगी लढलीच पाहीजे. ............
तुमच्यापैकी बहुतेकांनी सिंदाबादच्या सफरी हे पुस्तक वाचल असेल.त्यातील एका सफरी मध्ये त्याला एक माणुस त्याच्या खांद्यावर एका म्हातार्‍याला घेवून चाललेला असलेला भेटतो.युक्तीने तो माणुस त्याच्या कडील म्हातार्‍याच ओझ सिंदाबादच्या खांद्यावर टाकतो आणि पळुन जातॊ. पळता पळता तो सिंदाबादला सांगतो या म्हातार्‍याच्या ओझ्या पासुन सुटका करुन घेण्याचा मार्ग एकच तो म्हणजे दुसर्‍या माणसाच्या खांद्यावर हे ओझ देण. तेव्हा मी ही तेच करायचा प्रयत्न करत आहे . तेच म्हणजे माझ्या मनात दिवसभरात घोळत असलेल्या विचारांच ओझ तुमच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न. कळुद्या मला यात मी यशस्वी झालो आहे का नाही ते.‘

६ नोव्हें, २०१०

दीपावली २०१०

                                                दीपावली २०१०


प्रिय मायबोलीकरांनो,

आपण जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असलात तरी आपले लक्ष महाराष्ट्रात घडणार्‍या छोट्या-मोठ्या, बर्‍या-वाईट घटनांकडे निश्चीतच असते. कोणाच अन्न कुठे वाढलेल असत ते सांगता येत नाही पण तरीही घरची ओढ मात्र सर्वांनाच असते. त्यामुळे तुम्ही कोठेही असलात तरी तुमच मन या महाराष्ट्राकडे असतच यात शंका नाही.त्याच प्रेमापोटी महाराष्ट्रात वेळोवेळी घडणार्‍या घटनांबाबतचा कानोसा वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्या , युनिकोडच्या प्रसारामुळे इंटरनेटवर उपलब्ध होत असलेली मराठी वर्तमानपत्रे आणि तुमच्या-माझ्यासारखे सारखे ब्लॉगवर लिहीणारे हौशी मायबोलीकर यांच्या मत-मतांतरावरुन आपण घेत असता. आपणास त्या वरुन सध्या महाराष्ट्रदेशी सर्वच काही आलबेल नाही हे देखिल ध्यानात नक्कीच ध्यानात आले असेल. त्या मुळे माझ्या प्रमाणेच आपणही काहीसे व्यथीत झाला असाल नाही का ?

उद्यॊगधंद्यात, शैक्षणीक क्षेत्रात आघाडीवर असलेला व तसेच सामाजीक दृष्टया पुरोगामी विचारसरणी असलेल्या आपल्या महाराष्ट्राची आजची अवस्था इकडे काहीसे वेगळे वातावरण असल्याची विदारक जाणिव करुन देते. आरक्षण मिळावे यासाठी सर्वच जातींमध्ये चाललेली चढाओढ , चालु असलेले उद्योग बंद करुन त्यांच्या मोक्याच्या जागी गर्भश्रीमंतासाठी बांधले जाणारे टोलेजंग टॉवर्स , गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्य़ा साठी करावा लागणारा दीर्घकालीन संघर्ष , धंदेवाईक दृष्टीकोन ठेवुन चालवल्या जाणार्‍या शिक्षणसंस्था व राजकारणासाठी या सर्व गोष्टींना खतपाणी घालणारे राजकारणी या सर्वांचा एकत्रीतपणे विचार केला तर आजचा महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे असा दावा कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी करता येत नाही.

मायबोली मराठी भाषेची अवहेलना महाराष्ट्रात जेव्हढी होते तेव्हडी परदेशातील माझ्या मायबोलीकरां कडुन अनवधानाने देखिल होत नसावी. त्यातच मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरातील परभाषीकांची वाढती संख्या आणि त्यांची सर्वच क्षेत्रातली जाणावणारी दादागिरी - पैशाची असो ,सांस्कॄतीक असो, वा संख्याबळाच्या ताकदीची - याचा विचार केला तर महाराष्ट्रचे राजकीय नेतृत्व अमराठी माणसाकडे जाण्याचा दिवस फ़ार दुर नाही हे जाणवत. महाराष्ट्र हे सर्वात जास्त वेगाने शहरीकरण होणार राज्य आहे. या बेलगाम वाढीसाठी मुख्यत: जबाबदार आहेत ते बाहेरुन येणार्‍या परभाषीकांचे लोंढे. ज्यामुळे फक्त शहरातील पायाभुत सुविधांवरच ताण पडतो अस नाही तर अप्रत्यक्षरीत्या त्याचा प्रतिकुल परिणाम छोट्या-मोठ्या गावांमधुन राहाणार्‍या सर्वसामान्य मराठी जनतेवर होत आहे. उदाहरणच द्यायच झाल तर मुंबईला अखंड २४ तास वीज मिळावी या करीता महाराष्ट्रातील अनेक खेडी १२ ते १५ तासांचे लोडशेडींग विनातक्रार सहन करीत आहेत किंवा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या आसपासची जनता त्यांची मुल्यवान जमिन देवून वर पाणीटंचाईला तोंड देत आहे ही वस्तुस्थीती आहे. या निरपेक्ष त्यागाची जाणिव असण तर सोडाच पण पोटापाण्यासाठी आलेल्या उपर्‍यांनी म्हणे महाराष्ट्राचा विकास केला असे तारे तोडले जात आहेत. त्यामुळे अश्या प्रवृत्तींना सडेतोडपणे प्रत्युतर देण्यार्‍या राजकीय नेतृत्वाची आज प्रकर्षाने गरज आहे. पण पुरोगामी विचारांचा व नवनवीन संकल्पनांचा तत्परतेने स्विकार करणारा हा समाज गटातटात विभागुन गेला असल्यामुळेच येथे समर्थ राजकीय नेतृत्व उभ राहु शकत नाही हे लक्षात घेण आवश्यक आहे. परिणाम: ज्या समाजाने कधिकाळी देशाच राजकीय व तसेच सामाजीक नेतृत्व केल त्या मराठी भाषीक समाजाची स्वत:च्या राज्यातील आजची अवस्था विश्वास बसणार नाही इतकी वाइट झालेली आहे.

असे हे नकारात्मक व निराशेचे विचार दिपावलीच्या मंगल प्रसंगी व्यक्त करण काहीस अप्रस्तुत आहे याची मला जाणिव नक्कीच आहे. पण आपण आपल्या माणसां समोरच मन मोकळ करतो ना? माझा ब्लॉग लिहायला सुरुवात करताना मी नक्की अस काहीच ठरवलेल नव्हत आणि आजही ते तसच आहे. पण तरीही माझ्या ब्लॉगवर सहज म्हणुन डोकावून जाणारी व माझ्या विषयीच्या आपुलकीने नियमीत पणे भेट देणारी काही मंडळी या सर्व मायबोलीकरांना मी आपलच समजतो. त्याचच दृष्य प्रगटन म्हणजे माझ वेडबागड पण मनातल हे लिहीण. आवडल तर कौतुक करा पण काही आवडल नाही किंवा काही मत पटली नाहीत तर मात्र तुमच मत जरुर जरुर व्यक्त करा हीच विनंती.असो.

आपण सारे उत्सव प्रिय माणस आहोत. श्री गणरायाच्या आगमना पासुन ते दीपावली पर्यंत अनेक सण आपण साजरे करत असतो. या ऊत्सव जत्रेची सांगता दीपावली साजरी करुन होते. हा सण धार्मिक कमी तर उत्सवी जास्त आहे. याच सुमारास आपल्या उष्णकटीबंधातील देशातल्या वातावरणात काहीसा गारवा जाणवु लागलेला असतो. परिक्षा संपल्यामुळे घरा-घरातील लहान मुले नेहमी पेक्षा जरा जास्तच आनंदात असतात. त्याचा परिणाम आपल्यावर सुध्दा झाल्या शिवाय राहात नाहीच.तेव्हा आजुबाजुची परिस्थिती कितीही बिकट असली तरी आशेचा गारवा मनाला उत्साहीत करतोच. अस म्हणतात की कुठल्याही नाटकाचा शेवट हा आशादायी असावा जेणेकरुन प्रेक्षकाला सगळच काही संपलेल नाही व जगण्यासाठी बरच काही शिल्लक आहे अस विश्वास वाटतो. तेव्हा मी सुध्दा या संवादाचा शेवट शुभेच्छा देवुन करतो.


तेव्हा ही दीपावली आपणा सर्वांच्या जिवनात सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य घेवुन येवो याच माझ्या आपणास शुभेच्छा

जय महाराष्ट्र, जय मराठी

मैत्रेय१९६४








१५ ऑक्टो, २०१०

अधर्मयुद्ध

अधर्मयुद्ध

लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पहिली आवृत्ती : मार्च २००९

                    दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्तीला प्रमुख कारण झाले ते अणुबॉम्ब,ज्यांनी हिरोशीमा आणि नागासकी ही दोन शहर पार उध्वस्त करून टाकल्याने जपानने शरणागती पत्करली. त्यामुळे आजही अणुबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब सारख्या संहारक अस्त्रांची चर्चा होत असते.पण त्या व्यतिरीक्त एक छुपा बॉम्ब असा आहे की ज्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे इतका संहार केला आहे की त्या पुढे अणुबॉम्ब,हैड्रोजन बॉम्ब म्हणजे किस झाड की पत्ती.कारण या दोनही बॉम्बच्या साखळी प्रक्रीयेला ( Chain Reaction) काही मर्यादा आहेत. पण या छुप्या बॉम्बच काय ?.हा छुपा बॉम्ब आहे " तेल बॉम्ब ".  दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्ती नंतर इंग्रजांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि त्या साम्राज्याची पोकळी भरुन काढण्या साठी ’अमेरिका’ नावाचा देश जगाच्या क्षितीजावर उद्यमान झाला. याच महायुध्दातुन एक गोष्ट नक्की लक्षात आली ती म्हणजे भविष्यात ज्याच्या हाती तेलाची विहीर तोच या पुढे जगाला नाचवी.त्या मुळे सुरुवातीला इंग्लंड आणि त्या नंतर अमेरिका यांनी पश्चिम आशिया- ज्या भागात तेल उत्पादक अरब देश आहेत - मध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी जे जे काही केल त्याचा श्री.गिरीश कुबेर यांनी त्यांच्या अभ्यासातुन मांडलेला लेखाजोखा म्हणजेच " अधर्मयुद्ध " हे पुस्तक. या पुर्वी श्री.गिरीश कुबेर यांनी " तेल" हा विषय मध्यवर्ती ठेवून "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने " ही दोन पुस्तक लिहीली आहेत ती वाचली असतील तर हे पुस्तक निश्चतच जास्त चांगल उमजेल.

                          दुसर्‍या महायुध्दाच्या समाप्ती नंतर मानवाच्या जीवनाला भोवंडुन टाकणारी गती प्राप्त झाली आहे त्या मध्ये तेलाचा मोठा वाटा आहे.त्यामुळे चाकाचा शोध ही मानवाच्या उत्कांतीतील एक टप्पा असेल तर दुसरा टप्पा हा तेलाचा शोध अस नक्कीच म्हणता येईल.विसाव्या शतकात जे अनेक शोध लागले त्याने तेल हे सर्वच देशांची अपरिहार्य गरज झाले आहे. तेल उत्पादीत करणारे देश फार थोडे असुन उर्वरीत देशांच्या विकासाची व अर्थकारणाची प्रगति ही तेल उत्पादक देशांनी ठरवलेल्या तेलाच्या भावांवर अवलंबुन आहे.

                        तेलाच हे महत्व लक्षात घेवून व आपल्या वाढीसाठी भविष्यात लागणारे उर्जास्त्रोत (तेल) पश्चिम आशियातुन मिळणार असल्याचे नक्की झाल्यावर अमेरिकेची वाटचाल ठरली. ती म्हणजे, या प्रदेशातल्या तेलावर जास्तीच जास्त मालकी मिळवायची, अशी मालकी मिळवु शकणार्‍या स्पर्धक देशांना ऎनकेन प्रकारे रोखायच.आपल्या राष्ट्राच हित कशात आहे हे लक्षात घेवुन घोरण आखण यात चुक आहे अस म्हणता येणार नाही पण ते करताना आपण भविष्यात कशाला खतपाणी घालत आहोत याचा सारासार विचार अमेरिकेने केलेला नाही. त्याचाच परिणाम अतिरेकी धर्मवादी दहशतवाद फोफावण्यात झाला असुन त्याची दाहकता सर्व जग, अगदी अमेरिका सुध्दा , आज अनुभवत आहे. तेल उत्पादक अरब देशांवर आपल वर्चस्व राहाव म्हणुन त्या देशांच्या राजकारणात आणि त्या पेक्षाही जास्त धर्मकारणात सुरुवातीला इंग्लंड आणि नंतर अमेरिका यांनी केलेली विधिशुन्य ढवळाढवळ यातुनच धर्माधारित ’जिहादी’ दहशतवाद निर्माण झालेला आहे. या दहशतवादातुन झालेल्या प्रचंड खुनखराबा याची झळ सर्वच जगाने छोट्या-मोठ्या प्रमाणात अनुभवली आहेच.हा दहशतवाद मोठ्या प्रमाणात अमेरिकेनेच कसा पोसला व वाढवला हे या पुस्तकातुन श्री.कुबेर यांनी सप्रमाण दाखवुन दिलेल आहे.हा दहशतवाद आता भस्मासुरा सारखा अमेरिकेवरच उलटला आहे.वर्ड ट्रेड सेंटरचे ते जगप्रसिध्द मनोरे उध्वस्त झाल्या नंतर आपण केलेल्या चुकांची जाणिव काही प्रमाणात अमेरिकेला निश्चितच झाली आहे पण अद्याप तरी ती स्वहितापुर्तीच मर्यादीत असल्या सारखी आहे.

                              अश्या या तेलाच्या इतिहासाचे व त्या मागच्या राजकारणाचे अभ्यासक असलेल्या श्री.कुबेर यांचे हे पुस्तक सर्वांनीच जरुर वाचलेच पाहीले.ते वाचल्यावर आजुबाजुच्या जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची जाणिव निर्माण होते. जगाच्या कोपर्‍यात घडण्यार्‍या गोष्टींकडे मला काय त्याच या नजरेन पाहाण्याची सवय किति घातक ठरु शकते याची जाणिव आपल्या सगळ्यांनाच असायला हवीच कारण तेलाच्या हव्यासातुन निर्माण झालेला अमेरिका पुरस्कृत दहशतवाद आपल्याही घराच्या उंबरठ्यावर आता येवू घातला आहे हे या पुस्तकाद्वारे लक्षात येत.पुस्तकातल शेवटच प्रकरण " ते,आपण आणि अधर्मयुध्द " हे तर खास आपणा भारतीयांसाठीच आहे. आपला शेजारी पाकिस्तान हाच तमाम दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचा जणु विश्वविद्यालयच झालेला आहे.अश्या या पाकिस्तान बरोबर देशातील तथाकथीत विचारवंत आणि प्रसिध्द माध्यम ( विषेश करून इंग्रजी ) हे " अमन की आशा "ची भाषा करीत आहेत. त्या सर्वांनी जर हे पुस्तक वाचल तर त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांच्या मनात " अमन की निराशा" निर्माण झाल्या शिवाय राहाणार नाही. तेव्हा सर्वांनीच जात, पात, धर्म बाजुला ठेवुन दहशतवादाला अत्यंत डोळस पणे समोर जाण्याची गरज आहे.

                      या पुस्तकाच्या समर्पक प्रस्तावनेच्या शेवटी श्री.कुबेर म्हणतात," वाचकहो,तुम्हाला जर अधर्मयुध्द भावलं, त्यान तुम्ही अस्वस्थ झालात तर श्रेय प्रस्तावनेत वर उल्लेख केलेल्या सर्वांच. त्यात जर कमी पडलो असेन, तर ते न्युन मात्र माझच.". या पुस्तकाच श्रेय नक्की कोणाच हे ठरवण्याचा अधिकार श्री.कुबेर यांचाच असला तरी वाचकांना अस्वस्थ करण्याच श्रेय मात्र त्यांचच हे मात्र निश्चित.

८ सप्टें, २०१०

डायरीच्या पानांमधुन

                                                                डायरीच्या पानांमधुन

रविवारचा काहीसा निवांत वेळ होता. गणपती बाप्पा पण लवकरच येणार आहेत. तेव्हा विचार केला घरात थोडीशी आवराआवर -साफसफाई करुन टाकुया.पण कुठुन सुरुवात करावी तेच उमजत नव्हत. माझी आवराआवर सुरु झाली की घरातल्या सगळ्यांचा कल्लोळ सुरु होतो. हे टाकु नकोस, त्याला मुळीच हात लावु नकोस या आणि अश्या बर्‍याच सुचनांचा माझ्यावर भडीमार सुरु होतो.म्युन्सिपाल्टीचे लोक दिसल्यावर ज्या प्रमाणे फेरीवाल्यांची धावपळ सुरु होते तसच घरातल वातावरण तंग होत.ईतर वेळा कितीही सांगीतल तरी आवराआवर न करणारी मुल सुध्दा त्यांना हव्या असणार्‍या त्यांच्या वस्तु पटापट आवरतात.त्यांना माहीत आहे की माझी साफसफाई मोहीम सुरु झाली की त्यांच्या बर्‍याच गोष्टी काही न विचारता अडगळ म्हणुन टाकल्या जावु शकतात.अर्थात त्याचा दुसराही फायदा घरातल्यांना होतोच तो म्हणजे पुढचा किमान एक महिना घरात कुठलीही गोष्ट सापडली नाही की त्याच श्रेय(?) मलाच दिल जात.
त्यामुळे मी घरातल्या सगळ्यांना दोन तासात त्यांच्या वस्तु आवरायला दोन तासांचा अल्टीमेटम दिला आणि तो पर्यंत माझाच कप्पा पहिल्यांदा आवरायला घेतला.कप्पा आवरताना अनेक गोष्टी माझ्या नजरेस पडल्या,ज्या शोधण्यासाठी मी माझा आणि घरातल्यांचा रक्तदाब कितीतरी वेळा वाढवला होता.तेव्हा मनाशीच खजील होवून ठरवल की आपला कप्पा आज काही केल्या संपुर्ण लावायचाच.
कप्पा आवरता आवरता हाताला लागल्या पार जुन्या पुराण्या छोट्या पॉकेट डायर्‍यांचा एकत्र बांधुन ठेवलेला गठ्ठा.आताशा अश्या डायर्‍या फारश्या कोणी वापरत नाहीत पण या डायर्‍यांमध्ये छोट्या छोट्या नोंदीतर चटकन करता यायच्याच पण शेवटच्या काही पानांवर फोन नंबर लिहीण्याची सोय असायची.अर्थातच २७-२८ वर्षांपुर्वी टेलीफोन हे फ़ारच कमी जणांकडे असल्याने ती शेवटची काही पान पण पुर्ण भरायची नाहीत.आता मोबाईलच्या जमान्यात डायरी हा प्रकारच आऊटडेटॆ्ड झाला आहे. कारण मोबाईल मध्ये सर्व काही सेव्ह करता येत.अगदी पत्ते, मिटींगच्या वेळा पासुन ते अगदी वाढदिवसच्या नोंदी पर्यंत.....
तेव्हा इतकी वर्ष आवर्जुन जपुन ठेवलेल्या या डायर्‍यांन मध्ये आपण काय काय लिहिल होत ते मी वाचायच ठरवल.या डायर्‍या साधारणपणे तारुण्यपिटीका येणे व गध्देपंचविशी पार करणे या दरम्यानच्या काळातील होत्या.साध्या सरळ शब्दात माझ्या वयाची १७-१८ ते २५ वर्षे या काळातील होत्या.
तो काळ आठवला की परत येकदा तारुण्यात गेल्याची गोड शिरशिरी मनात येतेच.पावलो पावली प्रेमात पडणे -हो पडणेच -आणि त्या पडण्याच्या जखमा पुरत्या भरण्या पुर्वीच परत परत प्रेमात पडणे असा रोमांचकारी व साहसपुर्ण असा तो काळ होता.मग अश्या घटनांच्या काही नोंदी या डायर्‍यां मध्ये नक्कीच असणार होत्या नाही का?
पहीलीच डायरी चाळताना जुन महिन्यात एक नोंद आढळली.ते कॉलेजच पहिलच वर्ष आणि जुनचा दुसराच आठवडा."आषाढ्यस्य प्रथम दिवसे"ला असाव असच पावसाळी व कुंद वातावरण. कॉलेजचा असा स्पॉट निवडला होता भिडु की गेट के अंदर आने वाली हर एक बाला ईस हिरोकी नजरसे बच नही पाये.गेटसे हसिना तो बहुत सारी आ रही थी मगर दीलके अंदरका तार छेडे ऎसी कोई नजर नही आ रही थी.बस पल गुजरते जा रहे थे इतक्यात ती आली.ती आली, तिने पाहील आणि दुसर-तिसर काही न होता मी परत येकदा प्रेमात पडलो.ती ऎतिहासीक नोंद मग डायरीत करण सहाजीकच होत नाही का ?
मग नेहमीचेच हातखंडे वापरुन ओळख करुन घेणे वैगरे प्रकार झाले.मग डायरीत अजुन एक नोंद होती तिच्या वाढदिवसाची..... सॉरी बर्थडेची. मुलींची बरेच वर्ष वाढ होत नसल्याने त्यांचा बर्थडे साजरा होत असतो,वाढदिवस नाही.प्रेमात अजुनही पडु पाहाणार्‍या सर्वांना माझ्या तर्फे महत्वाची टीप देत आहे.तेव्हा हे जरुर लक्षात असुद्या.मी सुरुवातीलाच कबुल करुन टाकल्या प्रमाणे या प्रेमातही मी पडलोच.पण हे पडण जरा जास्तच जोराच असल्याने त्या वर्षी असल्या दुसर्‍या नोंदी डायरीत नाहीत.
मला एक दुसरी सवय होती ती म्हणजे मित्रांचे पत्ते त्यांचा वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या तारखेलाच नोंदवून ठेवायचे.म्हणजे पत्ता ही राहातो आणि ते पान न विसरता त्या दिवशी मित्राच्या वाढदिवसाची आपसुन आठवण करुन देत असे.त्याचे फायदे काय हे हॉस्टेल लाईफ अनुभवलेल्यांना सांगायला हवच का ?.मित्राचा वाढदिवस साजरा करण म्हणजे त्याचा खिसा चांगलाच हलका करण हीच तर मोठी चैन करायची संधी असायची.ईतर वेळला पैसे द्यायला टाळाटाळ करणारे मित्र सुध्दा या वेळी आवर्जून पैसे खर्च करत असत.घरापासुन दुर असणारे आम्ही त्या दिवशी फारच सेंटी होत असल्याने किमान त्या दिवशी कोणालाच नाराज करु नये अशीच भावना सर्वांची असायची.
मग प्रत्येक डायरी चाळत गेलो.त्या वेळी अस लक्षात आल की फार कमी पत्ते पुढच्या वर्षीच्या डायर्‍यांमध्ये रिपीट झाले आहेत.याचाच दुसरा अर्थ असा की बरेचसे मित्र हे त्या त्या वर्षां नंतर दुरावले किंवा काही इतर कारणाने दुर निघुन गेले.
या सात ते आठ वर्षांच्या डायर्‍या चाळल्या नंतर अस लक्षात आल की फक्त चार मित्रांचेच पत्ते शेवटच्या डायरीत रिपीट झाले आहेत.आयुष्यातील त्या मोलाच्या वर्षांत माझ्या मैत्रीच्या अ‍ॅसेट बाजुला होते फक्त चार मित्र.आणि त्या वर्षांतील लॉस होता तो मोजण्या पलीकडचा. याच काळात प्रेमात वारंवार पडत होतो आणि बरेचदा भयंकर दुखावलेला देखील होतो त्या वेळी सावरले ते माझ्या या अ‍ॅसेट बाजुनेच.आज आम्ही मित्र एकमेकां पासुन अंतराच्या दृष्टीने फार दुर गेलेलो आहोत. मोबाईलच्या सोईमुळे क्वचित कधिकाळी बोलण-एसएमएस होत नाही असं नाही .पण भेटी जवळपास दुरापास्त झाल्या आहेत.पण तरीही मनात पुर्ण खात्री आहे आजही आमच्यातली ती आपुलकी डायरीच्याच पानांवर नव्हे तर मनामनात कायम आहे.पण या धावपळीच्या आणि यशस्वी होण्याच्या जिवघेण्या स्पर्धेत तिची आठवण जपायला वेळ तो कोणाला.
तेव्हा मला तर अस वाटत की आपण जसा कपाटातला कप्पा जसा मधुन मधुन आवरतो अगदी तसच आधुन मधुन वेळ काढुन मनाचा कप्पा जरा आवरला पाहीजे.न जाणो त्यातुनही काही अ‍ॅसेट्स जरुर सापडतील.तुम्हाला काय वाटत ?
त्यामुळे मी तरी वेळात वेळ काढुन मनाचा कप्पा आवरुन बघण्याचा जरुर प्रयत्न करणार आहे कारण त्यातुन मनाच्या अडगळीत लपलेले काही अ‍ॅसेट्स माझ्या हाती लागतील याची मला खात्री आहे.आशा करतो तुम्हीहि जरुर असाच प्रयत्न कराल आणि तुम्हालाही लक्षात येईल की वाढत्या वयासोबत गमावलेल खुपच आहे पण जे कमावलेल आहे ते पण कमी नक्कीच नाही.

६ सप्टें, २०१०

एका गोड मुलीची गोष्ट

               एका गोड मुलीची गोष्ट

परवा परवाचीच गोष्ट. माझी मुलगी टी.व्ही. वर एक चित्रपट पाहात होती. एक जागरुक बाप (?) म्हणुन ती नक्की काय पाहात आहे हे मी उत्सुकतेने डोकावून बघीतलं. आणि बघता बघता मी पण त्या चित्रपटात गुंगून गेलो.चित्रपटाची गोष्ट साधी सोपी होती.चित्रपटाची नायिका आहे एक लहान मुलगी जी एक प्रसि्ध्द गायिका आहे. लहानपणीच आई गेलेल्या या मुलीच् स्वत:च एक भावविश्व आहे ज्यात आहेत , तिचे बाबा, भाउ एक जीवलग मैत्रीण आणि भाबडा मित्र.तिच्या बिनमुखवट्याच्या जगातले हे सर्व तिच्यावर तिच्या गुण दोषांसकट प्रेम करत असतात आणि ती पण ........
तरीही लहान वयातल्या प्रसिध्दी मुळे तिच बालपण कुठेतरी हरवून गेल असल्याने तिच्यातल निरागस मन कंटाळून गेल आहे.त्या मुळे ही मुलगी तिच्या शहरापासुन दुर जायच ठरवते. त्यानुसार ती तिच्या आपल्या माणसां सोबत तिच्या दिवंगत आईच्या माहेरी जाते. तिच्या आजीच या आईविना मुलीवर अतिशय प्रेम आहे. ती आजी आपल्या अकाली देवाघरी गेलेल्या मुलीच प्रतिबिंबच जणु या नाती मध्ये पाहात असावी.त्या मुळे आजी कडुन कॊडकौतुक करुन घेण्यात या मुलीचा वेळ मजेत चालला आहे.पण अचानक काही घटना अश्या घडत जातात की ज्या मुळे ह्या मुलीच गुपीत उघड होत.सगळ्या गावाला कळत की ही लहान मुलगी एक प्रसिध्द गायिका आहे.आपले गुपीत सगळ्या गावाला कळल आहे हे लक्षात आल्यावर ती मुलगी परत एकदा आपल्या मुळ शहरी जीवनाकडे नाईलाजाने परत येते.
पाहा ना ही गोष्ट किती साधी सरळ आहे.पण त्या मध्ये दाखवलेल्या काही गोष्टी बरच काही सांगून जातात.प्रसिध्दी मुळे अकाली बालपण हरवून बसलेली ती मुलगी,वडीलांचे व त्या मुलीचे आपसातील भावबंध ,आजीची निरपेक्ष प्रेमळ माया,त्या मुलीचे एखाद्या सर्वसामान्य मुली सारखे आपल्या मैत्रीणी बरॊबर होणारे रुसवेफूगवे हे सर्व अतिशय सहज व सुंदर पणॆ त्या सिनेमात मांडले आहे.
हे सगळ वाचल्यावर तुम्हाला आपल्या देशात वर्षाला शेकडोवारी निर्माण होणार्‍या एखाद्या कौटुंबीक सिनेमाची कथा मी सांगत आहे अस वाटल असेल नाही का ?पण ही कथा आहे हॅना मोंटानाच्या एका चित्रपटाची. हॅना मोंटानाचा चित्रपट असो वा टीव्हीवर नियमित पणे सादर होणारी सिरीयल त्या मध्ये जी जीवनमुल्ये दाखवली आहेत ती पाहीली की अमेरीका असो वा आपला देश दोन्ही कडे आदर्श मानली गेलेली जीवनमुल्ये यातील साम्य प्रकर्षाने जाणवत.यातुन हेच सिध्द होत की माणूस कुठलाही असो मुलभुत भावना सारख्याच असतात.
हॅना मोंटानाच्या सिरीयलच्या एका भागात तिच्या वडीलांच्या आईच एक पात्र दाखवल आहे.त्या भागात अस दाखवल आहे की सारखी सारखी बंद पडणारी या आजीची जुनी पुराणी खटारा मोटार भंगारात देवून मायली व तिचे वडिल नविन गाडी तिला भेट देतात........... त्यांना अस वाटत की नविन गाडी पाहुन आजी खुष होईल. पण होत भलतचं. या आजीच आपल्या जुन्या पुराण्या खटारा मोटार गाडीवर खुप प्रेम आहे कारण त्या गाडी सोबत जुळल्या आहेत तिच्या तरुण पणातल्या गॊड आठवणी.त्यामुळे आजी जेव्हा तिच्या जुन्या गाडी बाबतच्या भावना जेव्हा व्यक्त करते तेव्हा मायली व तिच्या वडिलांना आपली चुक उमजते. वापरा आणि फेका ( Use & throw ) या असल्या जमान्यातील ही अमेरीकन आजी आपल्याला पण आपल्या आजीची आठवण करुन देत नाही का?.मग आठवते ती आपल्या आजीने तिच्या जुन्या पान्या नऊवारी पातळ्यां पासुन बनललेल्या गोधड्यांची उब. आज ती मायेची उब कोठेतरी हरवली आहे.
हॅना मोंटाना ही भुमिका करणारी मायली सायरस आणि हॅना हे पात्र यांना वेगळ करताच येत नाही.ही भुमिका मायली जणु जगतेच आहे असच वाटत कारण मायलीने हॅनाची भुमिका तिच्यातली निरपेक्ष प्रेमाला असुसलेली छोटी मुलगी जाणुन घेवून साकारली आहे. आणि महणूनच हया लहान गोड मुलीची गोष्ट मला पाहाताना खुप आनंद वाटतो.

३० ऑग, २०१०

दहीहंडी- एक दुसरी बाजु

                                         दहीहंडी- एक दुसरी बाजु


         गेल्याच आठवड्यात २-४ दिवसांच्या अंतराने "दहीहंडी" बाबत दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी अशी होती की मुंबईतल्या जुन्या व नामवंत दहीहंडी मंडळांनी या वर्षी थर लावण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.तर दुसरी बातमी अशी होती की,उपनगरातल्या दहीहंडी मंडळांच्या संख्येत वाढ झाली असुन त्यातील एक मंडळ या वर्षी थरांचा नविन विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे.एकीकडे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेत असताना नव्याने तयार झालेली दहीहंडी मंडळे अधिक अधिक थर लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत हा विरोधाभास दिसुन येत आहे.दहीहंडी मध्ये भाग घेणारी बहुतांश कार्यकर्ते मंडळी मराठीच मग शहरातल्या व उपनगरातल्या मंडळांच्या दृष्टीकोनात व विचारात विरोधाभास का बर दिसुन येत असावा?
              मुंबईतला दहीहंडी उत्सव अनेक वर्षां पासून साजरा होत आहे. तथापी गेल्या ८-१० वर्षात तो साजरा करण्याच्या पध्दती मध्ये जाणवण्याजोगा फ़रक झालेला आहे.८-१० वर्षांपुर्वी दहीहंडीत भाग घेणे यात निव्वळ हौस व रग होती तर आता मात्र यात स्पर्धा व व्यवसायीकपणा आला आहे.जुन्या काळी ४-५ थर रचणे यात गंमत होती तर आता ७-८-९ थर लावण्यात एक थरार निश्चित तर आहेच पण त्याही पेक्षा मंडळा मंडळा मधिल जाणवणारी सुप्त स्पर्धा आहे.पाण्याच्या टंचाईमुळॆ म्हणा किंवा चाळीचाळीतुन राहाणारा मराठी कामगार वर्ग व पांढरपेशा समाज आता शहरामधुन उपनगरांमध्ये स्थलांतरीत झालेला आहे म्हणुन म्हणा,दहीहंडीतल्या गोपाळांवर पाणी टाकणॆ किंवा गॅलरीत सहकुटुंब उभे राहुन थर रचणार्‍यांच कौतुक करण हे आताशा दिसत नाही. एकंदरीतच काय हा उत्सव सामान्यांचा राहीलेला नाही.आता दहीहंडी उत्सव म्हणजे राजकीय पक्षांनी व नेत्यांनी प्रायोजीत केलेला उत्सव ( इव्हेंट) झालेला आहे. एखाद्या क्षेत्रात राजकीय मंडळी आली की जे काही बरेवाईट त्याच्या बरोबर येत ते सर्व या उत्सवात आलेल आहे.सर्वसामान्यांचा हा उत्सव हा आता पुर्णत: व्यावसायीक झाला आहे. दोन वर्षापुर्वी मंडळा मंडळातील याच स्पर्धेतुन ठाण्या मध्ये दोन मंडळांच्या तरुणांमध्ये मारामारी झाली होती.अर्थात या मागे स्पर्धे बरोबरच पारितोषीकाची भरभक्कम रक्कम हेही एक कारण होतच. असे प्रकार घडण म्हणजे दहीहंडी उत्सवाला गालबोट लावण्या सारखच आहे.
वास्तवीक पाहाता दहीहंडी असो वा गणेशोत्सव या मधुन सर्वांनी एकत्र याव आणि एकमेकांच्या सहकार्याने काही विधायक कार्यक्रम हाती घ्यावेत ही अपेक्षा आहे.पण आज होत काय आहे की या मधुन मराठी माणुस एक होण्याऎवजी एकमेकांचीच डोकी फ़ोडू लागला आहे.
त्यातच गिरणी कामगारांच्या संपा नंतर संपुर्ण कामगार वर्गच शहरातुन पार नाहीसा झालेला आहे तर पांढरपेशा मराठी समाज परिस्थीतीच्या रेट्यापुढे हतबल होवुन प्रथमत: उपनगरां मध्ये आणि हळूहळू बोरीवली-ठाण्या पलीकडे फ़ेकला जात आहे.हे सर्व असच चालू राहील तर अजुन ८-१० वर्षांनी पालघर-बदलापुर किंबहूना त्या पेक्षाही पुढेच दहीहंडी साजरी होईल अशीच बिकट परिस्थीती दिसते आहे.मोठ्या प्रमाणात मुंबईतुन बाहेर फ़ेकल्या जाणार्‍या मराठी माणसांच वास्तव हे कटू असल तरी नाकारता येणार नाही.जशी जशी ही मराठी माणस दुरदुर फेकली जातील तस तस दहीहंडी-गणेशोत्सव हे मराठमोळे सण मुंबईत साजरे हॊण कमी कमी होत जाणार आहे.त्या मुळे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे जेव्हा थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतात त्यावेळी तो त्यांनी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेपोटी घेतलेला निर्णय नसुन कार्यकर्त्यांच्या अभावी घेतला गेलेला आहे की काय अशी रास्त शंका मनात उभी राहाते.
हे सगळ पाहील की भविष्या मध्ये मुंबई शहरात मराठी माणसांना भवितव्य व जागा राहील की नाही याच काहुर मनात उमटत.तेव्हा देव न करो अन मराठी माणसांच्या अभावी दहीहंडी व गणेशोत्सव हे उत्सव मुंबईत बंद न पडोत अशी येत्या गणेशोत्सवात श्री गणराया पुढे मन:पुर्वक प्रार्थना करण्या शिवाय दुसर आपल्या हाती तरी काय़?

                                                    जय महाराष्ट्र जय मराठी

२ ऑग, २०१०

ट्रेकवाली

                                                                    ट्रेकवाली


सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात,तिही मुंबई सारख्या धावपळीच्या जीवनातली.त्या मुळे घरातून ऑफ़ीससाठी बाहेर पडताना जिवावर आल होत. त्यातच बाहेर रपारपा पाऊस पडत हॊता. पाउस असा अंगावर झेपावत असताना कामावर जाव अस मनाला पटत नव्हत. म्हणुन नेहमीच्या मित्रांना फ़ोन केले.म्हटल ऑफ़ीसला दांडी मारुन जाऊया भिजायला कोठेतरी.पण कोणीच तयार नव्हत म्हणुन चरफ़डत गाडी पकडली.मन मात्र बैचैन होत.छान पाऊस पडत असताना मला ऑफ़ीसला जाव लागतय याच दुख:होत होत. नेहमीप्रमाणे खिडकीत बसायला जागा मिळूनही मुड नसल्याने गप्पा न मारता डोळॆ मिटून स्वस्थ बसलो.आजुबाजुला मित्रांची भंकस चालू असली तरी मन दुसरीकडेच होत.मिटलेल्या डोळ्यांसमोर अचानक तिची आठवण आली.............
तो ८७ सालचा जुलै महिना होता.त्या दिवशी सकाळ पासुनच पावसाने चांगलाच जोर पकडला होता.मधला वार असल्याने ऑफ़ीस होत.पण वय तरुण असल्याने मनासारखे वागायचेच ते दिवस होते.तेव्हा ऑफ़िसला दांडी मारुन पावसात भिजायला जाव अस ठरवल.सॅक भरली आणि निघालो.आईला माझ्या अश्या वागण्याची सवयच होती त्यामूळे तिलाही त्याच काहीच वाटल नाही. "संभाळुन जा रे" ईतकच ती म्हणाली.
कल्याणहून लोकल,मग कर्जतहून बस अस करत राजमाचीचा ट्रेक करण्यासाठी कोंडीवड्याला गेलो.एकटयाने जात असलोतरी ट्रेक दरम्यान एखादा ग्रुप नक्कीच भेटेल अशी खात्री होती.झालही तसच.अगदी माझ्याच बसमधुन ती दोघ उतरली होती.या स्टॉपवर उतरली होती म्हणजे ती दोघही नक्कीच राजमाचीला जाणार होती यात शंकाच नव्हती. म्हणुन थोड थांबून त्यांच्या मागेमागे जाण्याचा निर्णय घेवून टाकला.विचार केला तेव्हडीच सोबत होईल.
हळूहळू गाव मागे पडल. सुरुवातीला ती जोडी बरोबर चालत होती. नंतर त्यांच्यात काहीतरी बोलाचाली झाली व तिला सोडुन तो झपाझप चालत पुढे निघुन गेला. मी मात्र थोडस अंतर राखुन तिच्याच गतीने शांतपणॆ मागेमागे चालत होतो.त्या निरव शांततेत काही वेळाने तिलाही मी मागे आहे याची जाणिव नक्कीच झाली होती. पण तिही एकटी असल्याने माझी सोबत तिला हवीशी वाटत असावी. पावसाळ्यातला राजमाची ट्रेक मनाला भु्लवणारा असतो. त्या निवांत आणि नैसर्गीक वातावरणात मन शांत होत असल तरी काही वेळाने दुसर्‍या कोणाशी बोलून मन व्यक्त करण्याची अनिवार उर्मी मनात येतेच. तिलाही माझ्या सारखच वाटत असाव.पण ही अबोल्याची कोंडी कशी दुर करावी हे मला कळत नव्हत.
ती निसर्गवेडी होती हे तिच्या छोट्या छोट्या हालचालीतून दिसत होत.रस्त्यात मधोमध फ़ुललेली रानफ़ुल असोत की मधे मधे येण्यार्‍या फ़ांद्या-झुडुपांना ती चालताना टाळत होती वा हळुवार पणे बाजुला सारत होती.चालता चालता मधेच एका झाडावर फ़ुललेल गर्द जांभळ्या रंगाच रानफ़ूल तिला दिसल.ते तोडुन घेण्याचा स्त्रि सुलभ मोह तिलाही आवरला नाही.पण दोन-चार उड्या मारुनही ते काही तिला जमल नाही.तेव्हा निराशेने तिने मागे वळुन माझ्याकडे पाहील.ती नजर ईतकी बोलकी होती की मी झटकन पुढे झालो अन तिला ते फ़ुल तोडुन दिल.त्या क्षणी पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकमेकांकडे निरखुन पाहील. रुढार्थाने सुंदर म्हणावी अशी ती नक्कीच नव्ह्ती . पण तरीही कोणाचही लक्ष वेधुन घेतील तिचे डॊळे जरुर होते. ती ह्ळूच थॅंक्स म्हणाली आणि चालू लागली. मी पण मग मुकाट्याने तिच्या मागोमाग चालू लागलो.सोबत असण्याचा आधार दोघांनाही वाटत होता.निसर्ग कितीही सुंदर असला तरी एकटेपणात तो अंगावर येतो.त्याचा पुर्णपणे अनुभव घ्यायचा असेल तर सोबत ही हवीच.
थोड्या वेळाने तिच्या मागोमाग चालण्याचा मला कंटाळा आला.म्हणुन संधी साधुन मी एका वळणावर तिला ओलांडुन पुढे चालू लागलॊ.तिला ते जाणवल की नाही कोण जाणे पण ती ईतकच बोलली " संभाळुन रे. आता पुढे ओढे आहेत बर कां". मग मात्र माझ्या पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचली. मनात म्हटल " आली मोठी ट्रेकवाली.स्वत:ला काय समजते कोण जाणे.".
असच काही वेळ चालल्यावर खरच एक ओढा आला.डोंगरात पावसाळ्यात तयार झालेल्या ओढयांना नैसर्गीक उतार असल्याने ओढ ही असतेच. त्या मुळे हा ओढा ओलांडताना तिला माझी मदत मागावी लागणार असा मी अंदाज केला.ट्रेकवालीची गंमत करण्यासाठी एकट्याने ओढा ओलांडायचा मी ठरवल. त्या प्रमाणे मी पटकन पुढे जाऊन ओढ्यात पाय टाकला.पण पाण्याच्या तिव्र ओढीने माझा पाय सटकला आणि पाण्यात आडवा झालो.अचानक काय झाल ते माझ मलाच कळलच नाही.पाण्याला अपेक्षेपेक्षा चांगलीच जास्त ओढ होती जीचा अंदाज काठावरुन पाहाताना जाणवला नव्हता.त्या मुळे मी स्वत:ला सावरायच्या आत सात-आठ फ़ुट खाली घसरलो.घसरता घसरता माझ्या हाताला एक कपार लागली.तिला पकडुन मी स्वत;ला थोडस सावरल.पण माझ्या दुसर्‍याच क्षणी लक्षात आल हे काही खर नाहीपाण्याला ओढ ईतकी जास्त होती की हा आधार जास्त वेळ मला पुरणार नव्हता.उतार असल्याने मान वर ठेवण्याचा प्रयत्न करुनही नाकातोंडात पाणी जातच होत.काय कराव तेच समजत नव्हत. तेव्हड्यात एक हात समोर आला. ती म्हणाली" अरे, पटकन हात पकड.". मी विचार केला की ही एव्हडी किरकोळ. माझ वजन पेलवेल का हीला. मी हात पकडायला का घुटमळतो आहे हे तिच्याही लक्षात आलं.ती म्हणाली,"माझी काळजी करु नकोस. पटकन हात पकड."  अर्थात मलाही दुसरा पर्याय नव्हताच.कारण एकट्याने मला बाहेर पडता येणार याची मलाही एव्हाना कल्पना आली होतीच.मग काय बुडत्याला काडीचा आधार.मी तिचा हात पकडला.तिच्या अंगात माझ वजन पेलण्याच बळ असेल का ही माझी शंका लवकरच दुर झाली.तिने शांतपणे पण हळुहळु मला ओढत बाहेर खेचुन काढल.बाहेर पडल्यावर मी पण तिला म्हणालो"थॅंक्स".ती फ़क्त हसली आणि बाकीच सर्व बोलले ते डोळे. त्यात फ़क्त होती काळजी ना कुठला अभिमान वा कुचेष्टा.
पाण्याच्या आवाजा वरुन ओढ्याच पाणी जवळच कुठेतरी खुप खाली पडत असल्याच माझ्या लक्षात आल होत.संकटातुन बाहेर पडल्यावर आपल्या वरच संकट नक्की किती मोठ होत हे जाणुन घ्यावस मला वाटल.मी त्या आवाजाच्या दिशेने उतरु लागलो.ती पण काही न बोलता माझ्या मागे मागे चालत होती. चाळीस- पन्नास पाऊल आम्ही खाली उतारलो असेल ना असेल आणि समोरच ते दृश्य पाहुन मला छातीत धडकीच बसली. ते पाणी तेथून प्रचंड वेगाने दरीत कोसळत होत. मी जर ओढ्यात आजुन पाच-सहा मीटर खाली घसरलो असतो तर.................
मग मात्र आम्ही दोघही काहीच न बोलता वर परत आलो.खर म्हणजे मला मनातून खुप काही सांगायच होत पण तोंडातून शब्दच फ़ुटत नव्हते.समोर मरण पाहील्यावर दुसर काय होणार म्हणा.नंतरचा ट्रेक मात्र व्यवस्थित पार पडला.राजमाची खालच्या गावात तिचा मित्र वाट पाहातच होता.एव्हना दोघां मधला तणाव कमी झाला होता.बोलता बोलता त्याच्या बोलण्यातून तिने हिमालयीन माऊंटरींग असोशियनचा अ‍ॅडव्हान्स माऊंटरींग कोर्स केल्याची माहीती तर मिळाचीच पण त्याच बरोबर तिने आत्ता पर्यंत राजमाचीचे बावीस ट्रेक केल्याच पण कळल.
मग माझ्या लक्षात एक एक गोष्टी यायला लागल्या.त्या ओढ्याची कल्पना असल्याने तीच संभाळुन जा अस आपुलकीने सांगण.तसच माऊंटरींगच्या प्रशिक्षणातून आलेला आत्मविश्वास.मला ओढ्यातुन बाहेर काढताना तिने स्वत:च्या शरिराला दिलेला विशिष्ट बाक ज्या मुळेच माझ वजन जास्त असुनही ती मला सहज बाहेर काढु शकली होती.तिच्या एकंदरीत वागण्या पुढे माझ वागण किती चुकीच होत ते माझ्या लक्षात आल.
चुक कबुल करण्याची आजुनही वेळ गेली नव्हती.मी मनापासुन म्हणालो,"मी तेव्हा खुप घाबरलो होतो.बर का".त्यावर ती ईतकच म्हणाली," होत रे अस कधीकधी".त्या नंतर मग परतीची वाट त्यांच्या सोबत मी पार पाडली.त्या प्रवासात मग मी तिचे ट्रेकींगचे अनुभव ऎकले.शेवटी एकदाचा ट्रेक संपला.निरॊप घेताना आम्ही एकमेकांचे पत्ते घेतले आणि परत भेटण्याचे वायदे ही केले.
पण खर सांगतो त्या नंतर आम्ही कोणीच एकमेकांना भेटलेलो नाही.पण आजही पाऊस पडत असला आणि मनात पावसाची भटकण्य़ाची उर्मी आली की मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी तिची आठवण येतेच.

१ ऑग, २०१०

चरवैती चरवैती

                     श्रीमती इरावती कर्वे या माझ्या आवडत्या लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत.अभ्यासातून आलेला परखडपणा व त्यातुन जाणवणारे विचारातील वेगळेपण हे मला जाणवलेले त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट.अर्थात एव्हड्या मोठ्या लेखिकेच्या लेखना बद्दल मी अधिक काही लिहीणे लहान तोंडी मोठा घास होईल हे मी जाणतो.
                  या लेखिकेचा एक धडा आम्हाला शालेय क्रमिक पुस्तकात होता.त्या लेखाचा आशय आज तितकासा आता आठवत नाही पण त्याचा शेवट मात्र आठवतो.त्या लिहीतात पक्षि प्रतिवर्षी नित्यनेमाने स्थलांतर करतात आणि परत आपल्या मुळ स्थानी परत जातात. त्यातुन पक्षि मानवाला संदेश देतात, तो म्हणजे ’चरवैती चरवैती ’. याचाच अर्थ चालत रहा चालत रहा. स्थलांतराच्या या प्रक्रियेत पक्षि आपल्या जीवलगांना व सोबत्यांना गमावत असतात पण तरीही ते आपला दरवर्षीचा मार्ग सोडत नाहीत.माणसाच्या जीवनातही असच घडत असत.आपण देखिल आपल्या जीवनात जीवलगांना व सोबत्यांना गमावतो. कधी काळाच्या दैवगतीमुळे तर कधी काही वैयक्तीक कारणांमुळे. अर्थात त्यामुळे आपल्याला पण आपल चालण थांबवता येत नाही.
                 तेव्हा पशु-पक्षांच असो की माणसांच ,जीवन हे असच आहे. त्याच्या प्रत्येक वळणावळणावर अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. काहींशी मनाचे सुर जुळतात तर काहींशी नाही.अस असल तरी भॆटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही बरे वाईट अनुभव देवून जात असते.त्या पैकी सोडून गेलेल्यांच दुख: विसरलो आहे अस वाटत न वाटत तोच एखादी घटना त्या जखमेवरची खपली बाजूला करते अन ते दुख: परत भळाभळा वाहायला सुरु होत.ज्या प्रमाणे दुख:द घटनांच्या आठवणी त्रास देतात तसच कधिकाळी काही काळ आपल्या बरोबर चार पावल चाललेल्या अनेकांची आठवण मनाला सुखावून जाते.
                असे असल तरी आजच्या युगाचा मंत्र आहे " काहीही करा , कसही करा पण यशस्वी व्हा.".त्या मुळे नैतीकतेच्या परंपरा या आपल्याला जोखड वाटु लागल्या आहेत. आमचे आदर्श आता छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज नाहीत तर धीरुभाई अंबानी आहेत.अश्या परिस्थितीत प्रियजनांची आठवण काढायला किंवा त्यांच्या सुखदुखा:त सामील व्हायला वेळ कोणाला आहे.यशस्वी होण्याच्या आकांक्षे पुढे जीवनातले छोटेमोठे आनंद घेण आपण विसरुनच गेलो आहोत.
                    तरी सुद्धा एकट असताना मनाच्या आत दडुन बसलेल्या या आठवणी उफ़ाळून वर येतातच. अश्याच काही आठवणींचा घेतलेला धुंडोळा म्हणजेच ’चरवैती चरवैती’

डे फ़्रेंडशिपचा

मित्रा,

आज डे फ़्रेंडशिपचा आहे

एसएमएस,ग्रिटींगस आणि गिफ़्ट्स

देण्याचा म्हणॆ रिवाज आहे

तरिही नकोत आज मजला

तुझ्या कडुन यातील काहीच गोष्टी

देणे-घेणे हा उपचार नुसता

तो व्यवहार वेड्या आपल्यात नाही

मनात आहे विश्वास माझ्या

येशील तु धावूनी माझ्या सादे सरशी

असो वा नको गरज मजला

आहेस तु माझा सदा सखा सोबती

जुळल्या आपल्या या भावना मनीच्या

म्हणुनच फ़ुलला की रे मळा आपुल्या मैत्रीचा


२९ जून, २०१०

आम्ही वीजग्रस्त

                                                                  आम्ही वीजग्रस्त
    नेमिच येतो पावसाळा त्या प्रमाणे एप्रील महिना येताच वर्तमानपत्रात वीज टंचाईच्या व अपुर्‍या पाणी साठयाच्या बातम्या येवू लागतात. या वर्षी देखिल वेगळ काही घडल नाही. बातम्या आल्या आणि त्या पाठोपाठ डोंबीवली मधल्या " लोडशेडींग"च टाईमटेबल जाहिर झाल. लोडशेडींग मुळे पाठोपाठ उपस्थीत होणारा पाण्याचा प्रश्न डोळ्या पुढे उभा राहीला आणि डोळ्यात पाणीच आलं. चष्मा काढला आणि डोळ्यातल पाणी पुसू लागलो.पाण्याने भरलेल्या माझ्या धुरकट डोळ्यांपुढे ते जुने दिवस उभे राहिले.
    मार्च १९८४ मध्ये आम्ही डोंबीवली मध्ये राहायला आलो. त्या पुर्वी  डोंबीवली बद्दल विषेश अशी माहिती नव्हती. खर सांगायच तर काहीच नव्हती कारण वडील त्यांच्या रेल्वेतल्या नोकरी निमित्याने सतत मुंबई बाहेरच होते. पण वडीलांच्या सेवानिवृत्तीची वर्षे जवळ येउ लागल्याने तसच  दोघा भावांचे भवितव्य लक्षात घेउन व आमचे सर्वच नातेवाईक मुंबईत स्थायीक असल्याने त्यांनी मुंबईत स्थायीक होण्याचा निर्णय घेतला.मग सुरु झाली जागा शोधण्याची धडपड.बाबांच्या बजेट मध्ये बसणारी व रेल्वे स्टेशन जवळ असलेली जागा डोंबीवलीत आहे अस त्यांना त्यांच्या डोंबीवलीत पुर्वी पासुन स्थायीक असलेल्या मित्राकडुन  कळालं.  जागा स्टेशन जवळ आहे हे समजल्यावर मनातुन ती घेण्याच निश्चित करुनच आम्ही जागा बघायला गेलो. आणि अश्या रितीने आम्ही डोंबीवलीकर झालो.  
    नविन जागा व शेजारी पाजारी दोघेही चांगले होते. आजुबाजुची सगळीच कुटुंब मध्यमवर्गीय असल्याने ब्लॉक असले तरी चाळीतल्या सारखे सगळ्यांचे दरवाजे सताड उघडे असायचे. त्या मुळे आम्ही लवकरच नविन जागेत रुळलो. पण म्हणतात ना काही गोष्टी राहायला आल्यावरच कळतात. जागा घेताना बिल्डरच्या माणसाने चोवीस तास नळाला पाणी असल्याच सांगीतल होत. नुसतच सांगीतलच होत नव्हे तर आम्ही ब्लॉक बघत असताना त्याने नळ सोडून त्याला पाणी येत असलेल दाखवलेल देखिल होत.नंतर कळल की जो ब्लॉक दाखवायचा असेल त्या विंगच पाणी बिल्डरचा माणुस अगोदरच जावुन सोडायचा जेणेकरुन खरेदी करणार्‍याला चोवीस तास नळाला पाणी असल्या्ची खात्री पटायची.
     डोंबिवलीला राहायला येवुन १०-१५ दिवस झाले होते. तोच वर्तमानपत्रात बातमी आली ती दर शुक्रवारच्या लोडशेडींगची. या लोडशेडींगच गांभिर्य सुरुवातीला लक्षात आल नाही. पण शहरांमध्ये इमारती बहूमजली असल्याने वरच्या टाक्यांमध्ये पाणी पोहचवण्या साठी पंप ही आवश्यक गोष्ट असते आणि त्या साठी वीज लागते.यथावकाश शुक्रवार आला, त्या दिवशी महानगर पालिकेतून पाणी येण्याच्या वेळेसच ५ ते ६ तास वीज नसल्याने पाणी येवुनही  वरच्या टाकीत  ते पंपाद्वारे चढवता आल नाही. शनिवारी सकाळी सकाळी सेक्रेटरी काकांनी ही आनंदाची बातमी बिल्डींग मधल्या सर्वांना सांगीतली आणि पाणी हवेच असेल तर तळमजल्या वरच्या टाकीत शिल्लक असलेल्या थोड्याश्या पाण्यातून  भराव लागेल याची कल्पना दिली.
    मग काय त्यानंतर आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी तळमजल्यातल्या टाकीतून बादलीमध्ये पाणी भरायच आणि ते दुसर्‍या मजल्या वरील आमच्या ब्लॉकमध्ये नेणं हा छान व्यायाम सुरु झाला. पाणी भरायच हे कष्टाच काम बहुतेक घ्ररातून तरुण मुलां-मुलींवर सोपवण्यात आल होत.त्यामुळे शनिवारची सकाळ म्हणजे बिल्डींग मधल्या तरुण मंडळींचा "पाणीकट्टा"च झाला होता. याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला पाणी भरायला कुरकुर करणारी ही मंडळी हळूहळू शनिवार सकाळची आतुरतेने वाट पाहू लागली. का म्हणून काय विचारता?. अहो पाणी भरण्याच्या निमित्त्याने तरुणांना  बिल्डींग मधल्या तरुणींना भेटण्याच-बोलण्याच एक हक्काच ठिकाण मिळल होत ना .त्यातच पाणी भरता भरता एखादीचा  पडणारा प्रेमळ  तिरपा कटाक्ष पाणी भरण्याचे सगळे सगळे कष्ट विसरायला लावत होता. मग तिच्या छोट्या छोट्या बादलीत पाणी भरुन देण आणी सहज म्हणता म्हणता तिला घरा पर्यंत पाणी न्यायला मदत करण माझ्या काही मित्रांच्या इतक्या सहजपणे अंगवळणी पडल की ते त्यांच्याही लक्षात आल नाही. अर्थात त्यांच्या भले हे लक्षात आल नसेल पण इतरांच्या चांगलच लक्षात  आल होत. त्यातुन कोण कोणाला पाणी भराय़ला मदत करतोय हे शोधण्याचा  एक नविन छंद इतरांना लागला होता.
    बघा ना लोडशेडींगचा मुळ प्रश्न. त्यामुळे निर्माण पाण्याचा उपप्रश्न या मुळे अनेक चांगल्या गोष्टी कळत नकळत घडू लागल्य़ा होत्या.या मुळेच तर तरुण मंडळी चक्क सकाळी लवकर उठू लागली होती. इतर वेळी घरातल्यांना वेळ नाही अस सांगणारी हीच मंडळी पाणी भरण्या साठी मात्र त्यांचा महत्वाचा वेळ काढू लागली होती.यातुनच शेजार्‍यापाजार्‍यांना मदत करण्याची व त्यांच्यावर प्रेम करण्याची भावना निर्माण होऊ लागली होती .तसच समाजात घडणार्‍या घटनांकडे डोळस पणे पाहाण्याची शोधक दृष्टी देखिल निर्माण झाली होती. पाणी भरण्यातुन निर्माण झालेले हे नविन स्नेहसबंध अधिक वाढावेत या साठी बिल्डींग मध्ये नवरात्रोत्सव साजरा करुया अस सर्व तरुण मंडळींनी ठरवल. त्या प्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला.त्यातुन तरुणां मध्ये धार्मिक भावना जागृत  झाली. तसच गरबा खेळण्यामूळे व्यायाम होऊन त्यांच्या अंगी लवचीकता आली. बघा बघा किती सकारात्मक गोष्टी या लोडशेडींग मुळे झाल्या होत्या. त्या मुळे या लोडशेडींगचे किमान तरुणांनी तरी आभार मानले पाहीजेत नाही का?
    आता परत एप्रील महिना आला आला आहे. लोडशेडींग नेहमी प्रमाणे सुरु झाले आहे. तसच पाण्याचाही प्रॉब्लेम सुरु झाला आहे. पण आता आम्ही तरुण राहीलेलो नाही. त्यामु्ळे पाणी भरण्यातली ती गंमत राहीलेली नाही. आताशा लाईट गेले की चिडचिड होते. परवाच रात्री १०.३० वाजता अचानक लाइट गेले होते. त्यामुळे वैतागलो होतो.तेव्हड्यात मोबाईलवर एक एसएमएस आला . काय एसएमएस आहे ते वाचण्यासाठी मेणबात्तीच्या प्रकाशात धडपडत जाऊन धापणी शोधली.एसएमएस वाचला आणि चक्क हसुच आल. तो एसएमएस असा होता:-
    जन्माला येताच बाळाने नर्सला विचारल" लाइट आहेत का?"
    नर्स म्हणाली " नाही.लोडशेडींग आहे अजुन दोन तासाने येतील"
    मग बाळाने विचारल " आज पाणी तरी आल आहे का?"
    नर्स म्हणाली " आज शुक्रवार. आज आणि उद्या अख्खा दिवस पाणी नसत"
    बाळ वैतागुन म्हणाल " च्यायला परत डोंबिवलीतच जन्म घेतला वाटल"
    मला डोंबिवली आवडते याच महत्वाच कारण म्हणजे डोंबिवलीकर कुठल्याही अडचणीं मधुन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मार्ग काढत असतात.

२१ जून, २०१०

युनिकोड गीता

                 ॥ युनिकोड गीता ॥
                                                            अर्थात
 संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )
                                               लेखक: श्री. माधव शिरवळकर

                  सन १९९६ सालची गोष्ट. महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांना संगणक शिकणे नुकतेच अनिवार्य केले होते.त्यामुळे मी देखिल संगणक प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीचे ते दिवस आठवले की आज गंमत वाटते. त्या वेळी मी संगणक ऑन-ऑफ़ करायला सुध्दा घाबरत होतो. एखाद अ‍ॅप्लीकेशन चुकीने अचानक पणे बंद झाल तर संगणक बिघडणार तर नाही ना अशी कुशंका मनात यायची. यथावकाश प्रशिक्षण पुर्ण झाल. त्या नंतर सरावासाठी घरी संगणक घेतला. त्या मुळे हळूहळू भीड चेपत गेली. त्यातूनच पुढे मित्रांशी चॅट आणि ई-मेल सुरु झाल. इंग्रजीवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने मी मिंग्लिश म्हणजे मराठी शब्द इंग्लीश मुळाक्षरांच्या आधारे लिहायचो. उदा. मला आनंद झाला हे वाक्य मी maala aanand jhala असं लिहायचो.अश्या कसरती कराव्या लागत असल्यातरी नव्याची नवलाई असल्याने मी बरेच मोठ मोठे मेल लिहीत असे. त्यामुळे माझ्या मित्रांना ते मेल वाचण्याचा आनंद होण्या ऎवजी कष्टच जास्त व्हायचे
                 दिवस जात राहीले, वर्षेही गेली. मिंग्लिश मधुन चॅट आणि ई-मेल सुरुच होते. दुर गेलेले जिवलग त्यातुन भेटत राहीले आणि तुटले असते असे संबंध टीकून राहीले. पण का कोण जाणे संगणका विषयी आपुलकी तरीही वाटत नव्हती.. आपल्या माणसांशी संवाद साधताना मराठीतून लिहीता येत नसल्याने मनाला समाधान वाटत नसे.त्यातून संगणकावर मराठीतून कसे लिहीता येईल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग मित्रांकडुन काही मराठी फ़ॉंट मिळवले. ते वापरुन ई-मेल पाठवले पण ते ज्याला पाठवले त्याला वाचताच आले नाहीत कारण तो मराठी फ़ॉंट त्याच्या संगणका मध्ये नव्हता. एकंदरीत संगणकावरून मराठीत संवाद साधता येण काहीस अशक्यच वाटत होत.
                     वर्षे ही उलटतच हॊती पण संगणक काही आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी भाषेला स्विकारायला तयार होत नव्हता आणि त्यामुळे माझ्या सारख्या अनेकांना तो आपलासा वाटत नहता. याच दरम्यान मधे मधे कधीतरी कोणा कडुन "युनिकोड" बद्द्ल कानावर पडत होत.पण युनिकोड बद्द्लची माहिती देणार अस कोणीच नव्हत. लिहीण्याची तिव्र इच्छा मराठीतूनच लिहाव अशीच असल्याने मनात रुखरुख सतत असायची. याच दरम्यान काही वर्तमानपत्रात ब्लॉग बद्दल वाचायला मिळालं. त्यातूनच अनेक लोक ब्लॉग लिहीताना मराठीचा वापर करतात अशी माहीती पण मिळाली.माझ्या एका मैत्रीणीने तिने मराठीतून ब्लॉग लिहायला सुरुवात केली असल्याच चॅट करताना सांगीतल. सुरुवातीला विश्वास वाटला नाही .पण नंतर ती खरोखरच मराठीतुन ब्लॉग लिहीत आहे अशी तिचा ब्लॉग पाहील्यावर खात्रीच पटली. त्यातुन मग मलाही मराठीतुन ब्लॉग लिहावा अस वाटायला लागल. मग तिच्या कडुनच काही टीप्स घेतल्या आणि ब्लॉग लिहायला मी पण सुरुवात केली.
               ब्लॉगवरचे माझे लेख मी बराहा मध्ये लिहुन ते कॉपी-पेस्ट द्वारे ब्लॉगवर टाकत असताना मला एक मेसेज नेहमी यायचा. त्या मध्ये माझा लेख UNICODE-UTF8 मध्ये रुपांतरीत करायचा का अशी विचारणा केली जायची..त्या मुळे माझ्या लक्षात यायला लागल की माझ्या लेखातील फ़ॉंट्स UNICODE मधे रुपांतरीत करण खुप गरजेच आहे. त्यातुन UNICODE बद्दलची उत्सुकता वाढतच गेली..आणि अचानक हाती आल "ते" पुस्तक. श्री. माधव शिरवळकर लिखीत " संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )"
            महाभारताच्या रणांगणावरील अर्जुनाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन जस भगवान श्रीकॄष्णाने "भगवत गीता" सांगुन केल तसच या पुस्तकाने माझ्या मनातील युनिकोड विषयीच्या सर्व प्रश्नांच निरसन केल आहे. या पुस्तकात युनिकोड विषयीची माहिती ईतकी सविस्तर दिली आहे की, ती इतरांना सांगुन IMPRESS करता य़ेइल. या पुस्तकात आहे युनिकोडची चळवळ व इतिहास,तिची वाटचाल , भारतीय भाषा व देवनागरी लिपी यातील तिच योगदान, तिचा भविष्यकाळ आणि बरच काही. त्या मुळे हे पुस्तक म्हणजे माझ्या दॄष्टीने "युनिकोड गीता"च आहे. तेव्हा हे पुस्तक संगणकावर मराठीतून लिहु पाहाणार्‍या सर्वांनी जरुर वाचाव आणि आपल्या माय मराठीतून खुप खुप लिहुन मराठीचा झेंडा संगणका विश्वात फ़डकवावा असे सर्वांना मी अवाहन करतो.