२९ जून, २०१०

आम्ही वीजग्रस्त

                                                                  आम्ही वीजग्रस्त
    नेमिच येतो पावसाळा त्या प्रमाणे एप्रील महिना येताच वर्तमानपत्रात वीज टंचाईच्या व अपुर्‍या पाणी साठयाच्या बातम्या येवू लागतात. या वर्षी देखिल वेगळ काही घडल नाही. बातम्या आल्या आणि त्या पाठोपाठ डोंबीवली मधल्या " लोडशेडींग"च टाईमटेबल जाहिर झाल. लोडशेडींग मुळे पाठोपाठ उपस्थीत होणारा पाण्याचा प्रश्न डोळ्या पुढे उभा राहीला आणि डोळ्यात पाणीच आलं. चष्मा काढला आणि डोळ्यातल पाणी पुसू लागलो.पाण्याने भरलेल्या माझ्या धुरकट डोळ्यांपुढे ते जुने दिवस उभे राहिले.
    मार्च १९८४ मध्ये आम्ही डोंबीवली मध्ये राहायला आलो. त्या पुर्वी  डोंबीवली बद्दल विषेश अशी माहिती नव्हती. खर सांगायच तर काहीच नव्हती कारण वडील त्यांच्या रेल्वेतल्या नोकरी निमित्याने सतत मुंबई बाहेरच होते. पण वडीलांच्या सेवानिवृत्तीची वर्षे जवळ येउ लागल्याने तसच  दोघा भावांचे भवितव्य लक्षात घेउन व आमचे सर्वच नातेवाईक मुंबईत स्थायीक असल्याने त्यांनी मुंबईत स्थायीक होण्याचा निर्णय घेतला.मग सुरु झाली जागा शोधण्याची धडपड.बाबांच्या बजेट मध्ये बसणारी व रेल्वे स्टेशन जवळ असलेली जागा डोंबीवलीत आहे अस त्यांना त्यांच्या डोंबीवलीत पुर्वी पासुन स्थायीक असलेल्या मित्राकडुन  कळालं.  जागा स्टेशन जवळ आहे हे समजल्यावर मनातुन ती घेण्याच निश्चित करुनच आम्ही जागा बघायला गेलो. आणि अश्या रितीने आम्ही डोंबीवलीकर झालो.  
    नविन जागा व शेजारी पाजारी दोघेही चांगले होते. आजुबाजुची सगळीच कुटुंब मध्यमवर्गीय असल्याने ब्लॉक असले तरी चाळीतल्या सारखे सगळ्यांचे दरवाजे सताड उघडे असायचे. त्या मुळे आम्ही लवकरच नविन जागेत रुळलो. पण म्हणतात ना काही गोष्टी राहायला आल्यावरच कळतात. जागा घेताना बिल्डरच्या माणसाने चोवीस तास नळाला पाणी असल्याच सांगीतल होत. नुसतच सांगीतलच होत नव्हे तर आम्ही ब्लॉक बघत असताना त्याने नळ सोडून त्याला पाणी येत असलेल दाखवलेल देखिल होत.नंतर कळल की जो ब्लॉक दाखवायचा असेल त्या विंगच पाणी बिल्डरचा माणुस अगोदरच जावुन सोडायचा जेणेकरुन खरेदी करणार्‍याला चोवीस तास नळाला पाणी असल्या्ची खात्री पटायची.
     डोंबिवलीला राहायला येवुन १०-१५ दिवस झाले होते. तोच वर्तमानपत्रात बातमी आली ती दर शुक्रवारच्या लोडशेडींगची. या लोडशेडींगच गांभिर्य सुरुवातीला लक्षात आल नाही. पण शहरांमध्ये इमारती बहूमजली असल्याने वरच्या टाक्यांमध्ये पाणी पोहचवण्या साठी पंप ही आवश्यक गोष्ट असते आणि त्या साठी वीज लागते.यथावकाश शुक्रवार आला, त्या दिवशी महानगर पालिकेतून पाणी येण्याच्या वेळेसच ५ ते ६ तास वीज नसल्याने पाणी येवुनही  वरच्या टाकीत  ते पंपाद्वारे चढवता आल नाही. शनिवारी सकाळी सकाळी सेक्रेटरी काकांनी ही आनंदाची बातमी बिल्डींग मधल्या सर्वांना सांगीतली आणि पाणी हवेच असेल तर तळमजल्या वरच्या टाकीत शिल्लक असलेल्या थोड्याश्या पाण्यातून  भराव लागेल याची कल्पना दिली.
    मग काय त्यानंतर आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी तळमजल्यातल्या टाकीतून बादलीमध्ये पाणी भरायच आणि ते दुसर्‍या मजल्या वरील आमच्या ब्लॉकमध्ये नेणं हा छान व्यायाम सुरु झाला. पाणी भरायच हे कष्टाच काम बहुतेक घ्ररातून तरुण मुलां-मुलींवर सोपवण्यात आल होत.त्यामुळे शनिवारची सकाळ म्हणजे बिल्डींग मधल्या तरुण मंडळींचा "पाणीकट्टा"च झाला होता. याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला पाणी भरायला कुरकुर करणारी ही मंडळी हळूहळू शनिवार सकाळची आतुरतेने वाट पाहू लागली. का म्हणून काय विचारता?. अहो पाणी भरण्याच्या निमित्त्याने तरुणांना  बिल्डींग मधल्या तरुणींना भेटण्याच-बोलण्याच एक हक्काच ठिकाण मिळल होत ना .त्यातच पाणी भरता भरता एखादीचा  पडणारा प्रेमळ  तिरपा कटाक्ष पाणी भरण्याचे सगळे सगळे कष्ट विसरायला लावत होता. मग तिच्या छोट्या छोट्या बादलीत पाणी भरुन देण आणी सहज म्हणता म्हणता तिला घरा पर्यंत पाणी न्यायला मदत करण माझ्या काही मित्रांच्या इतक्या सहजपणे अंगवळणी पडल की ते त्यांच्याही लक्षात आल नाही. अर्थात त्यांच्या भले हे लक्षात आल नसेल पण इतरांच्या चांगलच लक्षात  आल होत. त्यातुन कोण कोणाला पाणी भराय़ला मदत करतोय हे शोधण्याचा  एक नविन छंद इतरांना लागला होता.
    बघा ना लोडशेडींगचा मुळ प्रश्न. त्यामुळे निर्माण पाण्याचा उपप्रश्न या मुळे अनेक चांगल्या गोष्टी कळत नकळत घडू लागल्य़ा होत्या.या मुळेच तर तरुण मंडळी चक्क सकाळी लवकर उठू लागली होती. इतर वेळी घरातल्यांना वेळ नाही अस सांगणारी हीच मंडळी पाणी भरण्या साठी मात्र त्यांचा महत्वाचा वेळ काढू लागली होती.यातुनच शेजार्‍यापाजार्‍यांना मदत करण्याची व त्यांच्यावर प्रेम करण्याची भावना निर्माण होऊ लागली होती .तसच समाजात घडणार्‍या घटनांकडे डोळस पणे पाहाण्याची शोधक दृष्टी देखिल निर्माण झाली होती. पाणी भरण्यातुन निर्माण झालेले हे नविन स्नेहसबंध अधिक वाढावेत या साठी बिल्डींग मध्ये नवरात्रोत्सव साजरा करुया अस सर्व तरुण मंडळींनी ठरवल. त्या प्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होऊ लागला.त्यातुन तरुणां मध्ये धार्मिक भावना जागृत  झाली. तसच गरबा खेळण्यामूळे व्यायाम होऊन त्यांच्या अंगी लवचीकता आली. बघा बघा किती सकारात्मक गोष्टी या लोडशेडींग मुळे झाल्या होत्या. त्या मुळे या लोडशेडींगचे किमान तरुणांनी तरी आभार मानले पाहीजेत नाही का?
    आता परत एप्रील महिना आला आला आहे. लोडशेडींग नेहमी प्रमाणे सुरु झाले आहे. तसच पाण्याचाही प्रॉब्लेम सुरु झाला आहे. पण आता आम्ही तरुण राहीलेलो नाही. त्यामु्ळे पाणी भरण्यातली ती गंमत राहीलेली नाही. आताशा लाईट गेले की चिडचिड होते. परवाच रात्री १०.३० वाजता अचानक लाइट गेले होते. त्यामुळे वैतागलो होतो.तेव्हड्यात मोबाईलवर एक एसएमएस आला . काय एसएमएस आहे ते वाचण्यासाठी मेणबात्तीच्या प्रकाशात धडपडत जाऊन धापणी शोधली.एसएमएस वाचला आणि चक्क हसुच आल. तो एसएमएस असा होता:-
    जन्माला येताच बाळाने नर्सला विचारल" लाइट आहेत का?"
    नर्स म्हणाली " नाही.लोडशेडींग आहे अजुन दोन तासाने येतील"
    मग बाळाने विचारल " आज पाणी तरी आल आहे का?"
    नर्स म्हणाली " आज शुक्रवार. आज आणि उद्या अख्खा दिवस पाणी नसत"
    बाळ वैतागुन म्हणाल " च्यायला परत डोंबिवलीतच जन्म घेतला वाटल"
    मला डोंबिवली आवडते याच महत्वाच कारण म्हणजे डोंबिवलीकर कुठल्याही अडचणीं मधुन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मार्ग काढत असतात.

२१ जून, २०१०

युनिकोड गीता

                 ॥ युनिकोड गीता ॥
                                                            अर्थात
 संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )
                                               लेखक: श्री. माधव शिरवळकर

                  सन १९९६ सालची गोष्ट. महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांना संगणक शिकणे नुकतेच अनिवार्य केले होते.त्यामुळे मी देखिल संगणक प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीचे ते दिवस आठवले की आज गंमत वाटते. त्या वेळी मी संगणक ऑन-ऑफ़ करायला सुध्दा घाबरत होतो. एखाद अ‍ॅप्लीकेशन चुकीने अचानक पणे बंद झाल तर संगणक बिघडणार तर नाही ना अशी कुशंका मनात यायची. यथावकाश प्रशिक्षण पुर्ण झाल. त्या नंतर सरावासाठी घरी संगणक घेतला. त्या मुळे हळूहळू भीड चेपत गेली. त्यातूनच पुढे मित्रांशी चॅट आणि ई-मेल सुरु झाल. इंग्रजीवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने मी मिंग्लिश म्हणजे मराठी शब्द इंग्लीश मुळाक्षरांच्या आधारे लिहायचो. उदा. मला आनंद झाला हे वाक्य मी maala aanand jhala असं लिहायचो.अश्या कसरती कराव्या लागत असल्यातरी नव्याची नवलाई असल्याने मी बरेच मोठ मोठे मेल लिहीत असे. त्यामुळे माझ्या मित्रांना ते मेल वाचण्याचा आनंद होण्या ऎवजी कष्टच जास्त व्हायचे
                 दिवस जात राहीले, वर्षेही गेली. मिंग्लिश मधुन चॅट आणि ई-मेल सुरुच होते. दुर गेलेले जिवलग त्यातुन भेटत राहीले आणि तुटले असते असे संबंध टीकून राहीले. पण का कोण जाणे संगणका विषयी आपुलकी तरीही वाटत नव्हती.. आपल्या माणसांशी संवाद साधताना मराठीतून लिहीता येत नसल्याने मनाला समाधान वाटत नसे.त्यातून संगणकावर मराठीतून कसे लिहीता येईल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग मित्रांकडुन काही मराठी फ़ॉंट मिळवले. ते वापरुन ई-मेल पाठवले पण ते ज्याला पाठवले त्याला वाचताच आले नाहीत कारण तो मराठी फ़ॉंट त्याच्या संगणका मध्ये नव्हता. एकंदरीत संगणकावरून मराठीत संवाद साधता येण काहीस अशक्यच वाटत होत.
                     वर्षे ही उलटतच हॊती पण संगणक काही आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी भाषेला स्विकारायला तयार होत नव्हता आणि त्यामुळे माझ्या सारख्या अनेकांना तो आपलासा वाटत नहता. याच दरम्यान मधे मधे कधीतरी कोणा कडुन "युनिकोड" बद्द्ल कानावर पडत होत.पण युनिकोड बद्द्लची माहिती देणार अस कोणीच नव्हत. लिहीण्याची तिव्र इच्छा मराठीतूनच लिहाव अशीच असल्याने मनात रुखरुख सतत असायची. याच दरम्यान काही वर्तमानपत्रात ब्लॉग बद्दल वाचायला मिळालं. त्यातूनच अनेक लोक ब्लॉग लिहीताना मराठीचा वापर करतात अशी माहीती पण मिळाली.माझ्या एका मैत्रीणीने तिने मराठीतून ब्लॉग लिहायला सुरुवात केली असल्याच चॅट करताना सांगीतल. सुरुवातीला विश्वास वाटला नाही .पण नंतर ती खरोखरच मराठीतुन ब्लॉग लिहीत आहे अशी तिचा ब्लॉग पाहील्यावर खात्रीच पटली. त्यातुन मग मलाही मराठीतुन ब्लॉग लिहावा अस वाटायला लागल. मग तिच्या कडुनच काही टीप्स घेतल्या आणि ब्लॉग लिहायला मी पण सुरुवात केली.
               ब्लॉगवरचे माझे लेख मी बराहा मध्ये लिहुन ते कॉपी-पेस्ट द्वारे ब्लॉगवर टाकत असताना मला एक मेसेज नेहमी यायचा. त्या मध्ये माझा लेख UNICODE-UTF8 मध्ये रुपांतरीत करायचा का अशी विचारणा केली जायची..त्या मुळे माझ्या लक्षात यायला लागल की माझ्या लेखातील फ़ॉंट्स UNICODE मधे रुपांतरीत करण खुप गरजेच आहे. त्यातुन UNICODE बद्दलची उत्सुकता वाढतच गेली..आणि अचानक हाती आल "ते" पुस्तक. श्री. माधव शिरवळकर लिखीत " संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )"
            महाभारताच्या रणांगणावरील अर्जुनाला पडलेल्या अनेक प्रश्नांच निरसन जस भगवान श्रीकॄष्णाने "भगवत गीता" सांगुन केल तसच या पुस्तकाने माझ्या मनातील युनिकोड विषयीच्या सर्व प्रश्नांच निरसन केल आहे. या पुस्तकात युनिकोड विषयीची माहिती ईतकी सविस्तर दिली आहे की, ती इतरांना सांगुन IMPRESS करता य़ेइल. या पुस्तकात आहे युनिकोडची चळवळ व इतिहास,तिची वाटचाल , भारतीय भाषा व देवनागरी लिपी यातील तिच योगदान, तिचा भविष्यकाळ आणि बरच काही. त्या मुळे हे पुस्तक म्हणजे माझ्या दॄष्टीने "युनिकोड गीता"च आहे. तेव्हा हे पुस्तक संगणकावर मराठीतून लिहु पाहाणार्‍या सर्वांनी जरुर वाचाव आणि आपल्या माय मराठीतून खुप खुप लिहुन मराठीचा झेंडा संगणका विश्वात फ़डकवावा असे सर्वांना मी अवाहन करतो.



१८ मे, २०१०

वन फ़ॉर सॉरो

                                                     लेखिका : अनुराधा कुलकर्णी
                                                     प्रकाशक : ग्रंथाली

                    श्रीमती अनुराधा कुलकर्णी यांनी लिहीलेल हे पुस्तक मनाला अस्वस्थ करुन सोडत. कॅप्टन अभय कुलकर्णी यांच्या सारख्या सैनिकी पेशातील उमद्या तरुणाशी लेखिकेने समजुन उमजुन लग्न केल. लेखिकेच हे सर्वसामान्य तरुणींपेक्षा असलेल वेगळेपण त्यांच्या लिखाणामधुन पण दिसुन येत. सैनिकी पेशाबद्दल आपल्या सारख्या नागरी जिवनातील लोकांमध्ये किती अज्ञान आहे याची जाणिव त्यांच्या लिखाणा मधुन आपल्याला प्रकर्षाने होते.सैनिकांना अनेक वस्तु सवलतीच्या दरात मिळतात याचा जरुरीपेक्षा जास्त उहापोह केला जातो या बद्दलच्या लेखिकेच्या मनातील विषादाशी सहमत होण्यापेक्षा दुसरा पर्याय हे पुस्तक वाचल्यावर आपल्या मनात येवूच शकणार नाही.आपल्या सारखे नागरी जीवनातले सारे स्थौर्य व सुख अनुभवणारे लोक शांततेच्या काळात सैनिकांना पारच विसरुन जातो याची जाणीव आपल्याला नसतेच हे लेखिकेच स्वानुभवाने झालेल मत कटू वाटले तरी त्यातील सत्यता नाकारता येईल का?. शांततेच्या काळात सुद्धा देशाच्या सिमेवर आघोषीत युध्द सुरुच असल्याने त्या काळात देखिल सैनिकांच जिवन जोखमीच आणि तणावग्रस्त असत याची जाणीवच आपल्याला नसते.

                  तिनही युध्दांमधुन सुखरुप परत आलेल्या कॅप्टन अभय कुलकर्णी यांच निधन मिलिटरी हॉस्पीटल मध्ये योग्य वेळी उपचार न मिळाल्याने होते याची हळहळ आपल्याला देखिल वाटल्या शिवाय राहात नाही.त्यांच्या पश्चात लेखिकेने केवळ आपल्या पतीच्या आठवणींच्या जोरावर कश्या प्रकारे जीवन व्यथीत केल आणि मुलांच संगोपन केल हे वाचल की सैनिकांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती समाज किती असंवेदनशील आहे याची बोचरी जाणीव मनाला होते.लेखिकेने उण्यापुर्‍रा दहा-अकरा वर्षाच्या पतीसोबत घालवलेल्या सहवासाच्या स्मृतींमधुन सैनिकांच जगणे व त्यांची जिवना कडे बघण्याची दॄष्टी कशी असतॆ याचा यथार्थ परिचय करुन दिला आहे.त्या वरुन जिवनातील छोट्या छोट्या अडचणीचा आपण उगाचच बाऊ करतॊ हे लक्षात येत.

                     थोडक्यात काय, सैनिक हे सदैव मातृभुमीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मरणाला सामोरे जातच असतात व अश्या सैनिकां प्रती नागरी समाजाचा दृष्टीकॊन कसा असंवेदशील असतो याची जाणिव सरळ सोप्या भाषेत करुन देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. त्या मुळे लेखिका जणू वाचकांशी संवाद साधते आहे असच वाटत.

मैत्रेय१९६४

१२ मे, २०१०

सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)

                      ग्रंथाली प्रकाशनाने नुकतेच जानेवारी २०१० मध्ये डॉ. उज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)" हे पुस्तक प्रकाशीत केलं आहे.या पुस्तकाला डॉ. स्नेहलता देशमुख यांची सर्मपक प्रस्तावना लाभली आहे.त्याच प्रमाणे स्वत: लेखिकेने " गुज मनीचे "या मनोगतात हे पुस्तक लिहीण्या मागचे गुज मांडले आहे.डॉ. स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना आणि लेखिकेचे " गुज मनीचे "हे मनोगत वाचल्या नंतर या पुस्तकाबद्दल वेगळ्या शब्दात काही लिहाव अस काही शिल्लकच राहात नाही.

                     मॊकळे पणाने व सोप्या शब्दात डॉ. उज्वला दळवी यांनी त्यांचे सौदी अरेबितातील मांडले आहेत की त्या मुळे हे पुस्तक वाचनीय झाल आहे. मराठी माणसाची, विशेषत: मध्यमवर्गीय मराठी माणसाची एक वेगळीच मानसीकता आहे. अतिशय संवेदनशील आणि चांगल्या गोष्टींचा तत्परतेने स्विकार असा खुल्या मनाचा हा समाज आहे.जात्याच संवेदनशील असणारी ही माणसे आजुबाजूच्या घडण्यार्‍या घटनांकडे अलिप्तपणे पाहूच शकत नसल्याने चटकन दुखावली जातात.डॉ. दळवी या देखिल मध्यमवर्गीय मराठी समाजातील असल्याने सौदी अरेबिया सारख्या कर्मठ मुस्लीम राष्ट्रातील अनेक अनुभवांनी त्यांना वेळोवेळी ठसके आले. महत्वाच म्हणजे ते सर्व अनुभव त्यांनी प्रामाणीकपणे व्यक्त केले आहेत. मध्यमवर्गीय मराठी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण गेली अनेक वर्ष विविध देशात गेले आहेत व आजही जात आहेत.त्या पैकी अनेक जणांनी त्यांचे परदेशातील अनुभव पुस्तकां मधुन मांडलेले देखिल आहेत. पण बहुतेकांचे अनुभव हे त्यांनी परदेशात कसे कष्ट केले व ते यशस्वी कसे झाले या बद्दलच लिहीलेले आहेत. डॉ. दळवी यांच्या प्रमाणेच १५ ते २० वर्षापुर्वी परदेशात गेलेल्यांपैकी अनेकांना कटु अनुभव आलेही असतील पण ते त्यांनी तितकेसे मांडलेले नाहीत. कदाचीत " मान सांगावा जनात , अपमान ठेवावा मनात" हे संस्कार असल्याने तसे झाले असावे.

                      याच पार्श्वभुमीवर डॉ. उज्वला दळवी यांचे पुस्तक वेगळे ठरते. त्यांच्या लिखाणामधुन परदेशात कामासाठी गेलेल्या लोकांना कसे वाइट अनुभव येवू शक्तत याची कल्पना येते.हे अनुभव बर्‍या वाईट प्रमाणात परदेशी गेलेल्यांच्या पहिल्या पिढीला आले असल्यानेच त्यांच्या मनात " ने मजसी ने परत मातृभुमीला" ही भावना आढळून येत असावी अस मला वाटत. आता पुस्तका बद्द्ल जास्त काही लिहीत नाही कारण हे पुस्तक मुळापासून वाचाव असच आहे.

                     शेवटी डॉ. दळवी यांनी पुस्तकात नमुद केलेला एक प्रसंग त्यांच्याच शब्दात मांडत आहे. त्या लिहीतात-

                     मध्यम वयाची एक बाई आठवड्यातून एकदा तरी येउन मला कडाकडा शिव्याशाप देवून जाई. एक दिवस यथेच्छ शिव्या घालून झाल्यावर म्हणाली," मला घरी वैताग आला ना की तुझ्याकडे येते बघ. एकदा तुझ्याकडे अस मन मोकळ करुन टाकल की मी घरी आनंदात नांदते.माझ्याकडे दागदागीने, कपडेलत्ते पुष्कळ आहेत. घरात माणसांनाही तोटा नाही. पण अस माझ बोलण ऎकून घेणार मला तुझ्या खेरीज दुसर कोणीही नाही."

                  हा प्रसंग वाचल्यावर सौदी अरेबियातील मुस्लीम त्रीच्या मनाचा होणारा कोंडमारा तर जाणवतोच पण त्याच बरोबर नोकरी निमित्याने आलेल्या परदेशी माणसांकडॆ तुच्छतापुर्वक बघण्याचा त्या देशातील माणसांचा बेमुर्वतखोर दृष्टीकोन आपल्याही मनाला ठेच पोहचवतो.

                   पुस्तक वाचता वाचता डॉ. उज्वला दळवी यांना लागलेल्या ठेचा व आलेले ठसके यांच्याशी कसे समरस होतो हेच कळत नाही. मला वाटत हेच या पुस्तकाचे वैशिष्ट आहे

१ मे, २०१०

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

                 आज १ मे २०१० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस ५० वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त्याने महाराष्ट्र शासन तसेच राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांनी कार्यक्रम आयोजीत केले आहेत. तसेच गेल्या आठवडाभर दुरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रामधुन राजकीय नेते आणि विचारवंत यांनी महाराष्ट्राच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा मांडला आहे.या सर्वांनी मांडलेली मते आणि आपल्या राज्याची सांप्रत स्थीती या बद्दल निरक्षिरवृत्तीने विचार करण्यास आपण सगळे सक्षम आहातच.
                  तेव्हा ५० वर्षाच्या वाटचाली नंतर अपेक्षित असलेल महाराष्ट्र राज्याच चित्र आणि वास्तविकता याचा विचार आजच न करता अत्यंत आनंदाने आणि गौरवाने आपल्या राज्याचा ५० वा वाढदिवस घराघरात साजरा करुया.
                   माझ्यावतीने जगभरातील सर्व मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.


                                                                                         आपला
                                                                                      मैत्रेय१९६४.