२२ एप्रि, २०१५

माझी आभासी विपश्यना


या सर्वाला नक्की कधी सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. पण दोन वर्षा पेक्षा जास्त काळ नक्कीच झाला असावा.सुरूवातीला हे सर्व करण्याची इच्छा वारंवार होत नव्हती तो पर्यन्त जाणवल नाही. पण पाहता पाहाता या सर्वांची इतकी सवय झाली की दारू नियमितपणे पिण्यार्‍या माणसाला वेळेवर दारू मिळाली नाही की तो जसा बैचेन होतो तस व्हायला लागलं.
त्यातच मार्च एंड झाला अन कामाच्या ताणातून काहीसा relief मिळाला.  तेव्हा  तर  या सगळ्यांची जास्तच जास्त आठवण व्हायला लागली. रिकाम मन सैतानाच घर म्हणतात ते खरच आहे. सकाळी उठल्यावर, ट्रेनची वाट पाहताना , गाडीत बसायला मिळाल्यावर , ऑफिस मध्ये सकाळचा चहा घेताना, लंच टाइम मध्ये , ऑफिस मधून बाहेर पडण्या पूर्वी , परत परतीच्या ट्रेनची वाट पाहताना, ट्रेन मध्ये उभ असताना , सुदैवाने बसायला मिळालच तर बसल्यावर, घरी पोहचल्यावर , जेवताना , मालिका पाहताना अन झोपण्या पूर्वी अगदी शेवटचं अस ठरवून परत ऐकदा  असा एकच चाळा तो म्हणजे ............
WhatsApp वरचे मेसेज पाहणं अन त्यावर comments करण.....
अन त्यातही अजून वेळ मिळाला तर Facebook, yahoo अन google सोबतीला होतच की..............
आजूबाजूला पाहिल अन थोड घरात लक्ष देवून पाहिलं तर माझ्या सारखीच बहुतेक सर्वांची अवस्था..
    पूर्वी ही   yahoo , Hotmail इत्यादि messengers वा email चा वापर होत नव्हता अस नाही. पण त्या साठी cyber cafe वा घरी internet connection आवश्यक असल्याने या सगळ्या गोष्टी वापरण्यावर काहीश्या मर्यादा होत्या.
    पण android phone आल्या नंतर आभासी ( Virtual) जगाशी  सहजतेने connect होण जास्त सोप होऊन गेल आहे.
    WhatsApp ने तर कहरच झाला आहे. अत्यंत सुलभतेने message forward करता येवू लागले आहेच. नवीन फोन च्या touch screen मुळे एका वेळी एका पेक्षा अधिक जणांना तसेच अनेक message एकाच  वेळी forward म्हणजे ऐका “टिचकीचा” खेळ झाला आहे.
    त्यातच WhatsApp वरचे group म्हणजे सहन होत नाही अन सांगता येत नाही ही अवस्था. एखादा group create करताना काही चांगला हेतु ठेवून ते केले जातात. त्या मध्ये  समान परिस्थितीतल्या वा  विचारांच्या लोकांनी एकत्र येवून “मनकी बाते” share करावी ही रास्त अपेक्षा असते. पण forwarded message forward करणे या पेक्षा अधिक काही होत नाही हा माझ्या सारखाच अनेकांचा अनुभव असेल .  त्यातही बहुतेक message  इतके repeated असतात की ते वाचण्याची तसदी घेण्याचा प्रश्नच नसतो.
    Group create होतो. Admin अर्थात group स्थापक मोठ्या उत्साहाने members add करत जातो. त्यामुळे काही कारणास्तव संपर्कात नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्याशी संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध होत . सुरुवातीच्या उत्साहात संवाद सुरू होतोही पण नंतर नंतर बरेच members inactive होत जातात. वाद झाला म्हणून तस होत असेल तर समजू शकतो. पण तस नसल तरीही 100 जणांच्या group मधले फक्त 10 ते 12 members active अन  दोन तीन hyper active असतात असाच माझा अनुभव आहे .. कोणाचा वेगळा अनुभव असेल तर आश्चर्यच म्हणावं लागेल. हे Hyper active members इतका forwarded messages चा भडिमार करतात की त्यांना सांगवस वाटत की “जानी, हम भी बहोत सारे WhatsApp group मे रहते है”.
    Members inactive होतात याच महत्वाच कारण म्हणजे संपर्कात नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्या priorities बदललेल्या असतात आणि interest देखील बदललेले असतात हेच असाव. पण आपल्या मनात मात्र त्यांच्या बद्दल प्रत्यक्षाहून मनातली प्रतिमा उत्कट अशीच काहीशी चुकीची कल्पना असते. जुन्या मित्र-मैत्रिणी यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने होत .
    या सर्वांची मला गेले काही काळ जाणीव होत होती तस जाणवलं की मादक पदार्थांची सवय लागावी तशीच WhatsApp सारख्या आभासी जगाची मला सवय लागली आहे. Addiction म्हणजे दुसर काय असत. मग रविवारि रात्री विचार केला की किमान दोन या आभासी जगा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करूया.
    आज बुधवार आहे .ठरवल्या प्रमाणे दोन दिवस मी आभासी जगापासून पूर्ण दूर आहे. प्रामाणिक पणे सांगतो हे दोन दिवस मला फार कठीण गेले. सारखा फोन कडे हात जायचा अन net pack open करून WhatsApp वरचे messages वाचायची प्रबळ इच्छा व्हायची. दारू पिणार्‍याची दारू न मिळाल्याने होणारी तगमग  अन आभासी जगा पासून दूर राहिल्याने  माझी झालेली  तगमग यात काहीच फरक नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली................
    तेव्हा सत्या पासून दूर पाळण्यासाठी मादक पदार्थांचा वापर करण अन आभासी जगात रमण यात फरक तो काय?. हा या दोन दिवसांच्या आभासी विपश्यनेतून  मिळालेला हा आत्मबोधच म्हणायला हवा.
    असो ....विपश्यना संपली.... परत एकदा net pack open करणार आहे या सुखद कल्पनेनेच हाताला कंप सुटला आहे. हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.
    आहा....झाला झाला net pack open झाला.
   सुविचारांचे messages वाचून मला स्वत:ला परत charge करणार आहे.......
    राजकारणावर, धर्मावर अन अर्थकारणावर आपली मौलिक ? अन अभ्यासू ???? मत हिरारीन अन त्वेषान मांडणार आहे
    कविता , वैचारिक लेख अन बरच काही  forward करून माझ्या अस्तित्वाची परत एकदा जाणीव करून देणार आहे.
    अन तिने forward केलेले प्रेम संदेश वाचून परत एकदा बेदुंध होणार आहे.
    
        ……………………………………

    अरे हो आत्मबोधाच काही तरी म्हणताय तुम्ही……..
    कुठला आत्मबोध
    अरे खड्ड्यात गेला तो आत्मबोध ........
   
**** कोणीतरी म्हटलच आहे की .......
खरे ते  एकची message कर्म
Messages forward करत राहावे
Message तोच  फिरून आल्यास
न चुकता forward च करावा
ऐसा जो पाळील आभासी धर्म
तोच WhatsApp वर नेहमी लोकप्रिय





४ मार्च, २०१३

असमानतेचं जागतिकीकरण- श्री. गिरीश कुबेर.



एक शनिवार आड असे पंधरा दिवसांनी एकदा  "बुक-अप" हे सदर लोकसत्ता या दैनिकात प्रकाशित होते. या मध्ये इंग्रजी भाषेतील उत्तम आणि वैचारिक दृष्टिकोन असलेल्या पुस्तकांचा परिचय श्री. गिरीश कुबेर हे करुन देतात. या वेळच्या २ मार्च २०१३ च्या शनिवारच्या ’लोकसत्ता’ मध्ये श्री. गिरीश कुबेर यांनी "GLOBALIZATION AND ITS DISCONTENTS" आणि "THE PRICE OF INEQUALITY" या दोन पुस्तकांचा परिचय करुन दिला आहे. या पुस्तकांचे लेखक आहेत "Joseph E. Stiglitz".
श्री. गिरीश कुबेर यांना याच दोन पुस्तकांचा आवर्जुन परिचय करुन देण्यासाठी  कारण ठरले ते आपले अर्थमंत्री चिदंबरम. अर्थमंत्र्यांनी त्यांचे या वर्षीचे अंदाजपत्रक (Budget) मांडताना," विकास सातत्यपुर्ण आणि सर्वसमावेशक हवा असेल तर समानतेचा आग्रह धरले जाणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही देशासाठी सर्वाधिक मोलाची साधनसंपत्ती असते ती त्या देशातील मनुष्यबळ." हे वाक्य़ उद्‌धृत केले होते. हे खरेतर श्री. जोसेफ स्टिगलिटस यांच जागतीकीकरणामुळे होणार्‍या विपरीत परीणामाच्या अनुषंगाने केलेले भाष्य आहे. श्री. जोसेफ कोणी सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही. ते अर्थतज्ञ असुन त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे प्रमुख सल्लागार म्हणुन आणि त्या नंतर जागतिक बॅंकेत मोठ्या पदावर काम केलेले आहे.
याच श्री. जोसेफ स्टिगलिटस यांनी आपल्या सरकारच्या किराणा क्षेत्रातील परदेशी  (FDI) धार्जिण्या धोरणावर टीका केली होती. भारताने किराणा क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीस अजिबात परवानगी देवू नये हे त्यांच मत लक्षात घेता आपल्या अर्थमंत्रांनी वरील वाक्य़ उच्चारणे यातील विरोधाभास सहजच ध्यानी येतो.
दुसरं महायुद्ध संपता संपता बड्या देशांनी दोन महत्वाच्या संस्था जन्माला घातल्या. जागतीक बँक  आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. श्री. स्टिगलिटस हे या दोन्ही संस्थांच्या विरॊधातील कडवे टीकाकार आहेत. या दोन्ही संस्था आणि अमेरिका हे तिघेही बंधमुक्त जागतिकीकरणाच्या बाजुने आहेत. त्यातच जागतीक बँक ही अमेरिकेच्या हातातील बाहुली आहे हे लक्षात घेतल तर आपल्या देशात बंधमुक्त जागतिकीकरणाचे समर्थन करणारे तथाकथित विचारवंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कोणाच्या बाजुने ढोल पिटत आहेत हे लक्षात येत.
श्री. जोसेफ स्टिगलिटस हे म्हणतात," कोणत्याही बाजारच्या धोरणांमध्ये फायदा अनुस्युत असतो. जागतिकीकरण्याच्या बाजारपेठेत देखिल फायदा गृहीत आहे. या फायद्यामध्ये काही मुठभर लोकांचेच हितसंबंध असतात. एका अर्थाने या धोरणांतुन मागच्या दाराने मक्तेदारीचा शिरकाव होतो. त्यामुळे निर्माण होणार्‍या असमानतेमुळे विकासदर आणि कार्यक्षमता  या दोन्हीवर विपरीत परिणाम होतो. असमानतेमुळे अनेकांना संधी मिळत नाही आणि संधी नाकारणे म्हणजे राष्ट्रासाठी अमोल असलेल्या साधनसंपत्तीचा, म्हणजेच मनुष्यबळाचा अपव्यय."
श्री. जोसेफ स्टिगलिटस पुढे जे काही म्हणतात त्यावर आपल्या देशातील सर्वच संवेदनशील माणसांनी आणि बिगर राजकीय संघटनांनी मग त्या सामाजिक संघटना असोत वा कामगार संघटना असोत यांनी भविष्यातील धोके विचारात मनन केल पाहिजे अस मला वाटतं. ते म्हणतात," बंधमुक्त जागतिक बाजारपेठेत व्यवस्थेच्या उतरंडित असलेल्यांना संधिच मिळत नाही. कारण सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबुन नसलेले  मध्यमवर्गीय  आणि त्यावरचे श्रीमंत हे सरकारवर एकत्त्रितपणे दबाव आणतात आणि स्वत:च्या पोटाला चिमटा बसणार नाही अशीच कररचना ,अर्थधोरणे आणतात. त्यामुळे सरकारचा सार्वजनिक , सामाजिक सेवांवरील खर्च कमी होतो. परिणामी शिक्षण , दळणवळणाची  साधने अशी गरिबांसाठी  अत्यावश्यक असलेल्या बाबींसाठी पैसाच उपलब्ध होत नाही."
श्री. कुबेर या संदर्भात आपले मत मांडताना म्हणतात,"  या जागतिकरणामुळे निर्माण होणार्‍या आर्थिक समस्येला कोणतही एक उत्तर असु नये. चीन, मलेशिया,दक्षिण कोरिय़ा आदी देशांनी नव्या आर्थिक धोरणांच्या आधारे प्रगती करताना सब घोडे बारा टक्के या प्रमाणे नवा आर्थिक विचार स्विकारला नाही. तो आपल्यासाठी खास बेतुन घेतला. बाजारपेठेतील मनमुराद मॊकळेपणा कोणीही दिला नाही... अगदी अमेरिकेने देखिल नाही. तेव्हा श्री. जोसेफ स्टिगलिटस म्हणतात त्या प्रमाणे बाजारपेठीय मुक्त व्यवस्थेचा  पुरस्कार करणार्‍यांवर देखिल राजसत्तेच नियंत्रण हवं. अन्यथा या असमानतेच ही जागतिकीकरण होवु लागतं."
      तेव्हा या वेळच्या २ मार्चच्या सदरामध्ये , श्री. जोसेफ स्टिगलिटस यांनी त्यांच्या २ पुस्तकां मधुन मांडलेल्या अभ्यासपुर्ण विचारांचा परिचय करुन देण्याच्या निमित्याने श्री. कुबेर हे आपल्या देशातील सर्वसामान्य व असंघटीत जनतेस भविष्यात असलेल्या धोक्यांची सहजपणे जाणिव करुन देतात हेच त्यांच यश आहे हे निश्चित......

***आधार आणि श्रेय  : श्री. गिरीश कुबेर यांचं लोकसत्ता शनिवार दि. 2 मार्च 2013 मधील "बुक-अप" हे माहितीपूर्ण सदर.
*** मुळ लेखाचा दुवा (Link) : http://www.loksatta.com/sampadkiya-news/globalization-of-inequality-72442/
 

११ फेब्रु, २०१३

आपली मायबोली.... एक अभिजात भाषा.....




आपल्या मायबोली "मराठी" ला अभिजात भाषा म्हणुन मान्यता मिळावी या करीता  महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत केल्याची माहिती मी माझ्या या पुर्वीच्या लेखात दिली होती.जेष्ठ साहित्यीक श्री.रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षते खालील या समितीने त्यांचा संशोधनपर अहवाल तयार केला असुन तो माननीय मुख्यमंत्राकडे पुढील महिन्यात सादर केला जाणार आहे.
समितीने हा अहवाल तयार करताना सुमारे हजाराहुन अधिक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. या अभ्यासपुर्ण अहवालातले निष्कर्ष सप्रमाण सिद्ध करतात की.....
·       मराठी भाषा ही संस्कृतपासुन नव्हे तर वैदीकपुर्ण बोली भाषांपासुन निर्माण झाली आहे.
·       ती सातशे-आठशे वर्षे जुनी नव्हे तर २ हजार वर्षापासुनची भाषा आहे.
·       जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा असलेल्या मराठीच्या ५२ बोलीभाषा आहेत.
·       मराठी भाषा ७२ देशांमध्ये बोलली जाते.
·       सर्वसामान्यपणे ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र,विवेकसिंधु हे मराठीतले आद्यग्रंथ मानले जात असलेतरी ते आद्यग्रंथ नाहीत. ते मराठी भाषा समृद्ध करणारे श्रेष्ठ ग्रंथ आहेत.
·       पैठण येथील हाल या सातवाहन राजाने संपादीत केलेला गाथा सप्तशती हा मराठीतला आद्यग्रंथ असुन तो २ हजार वर्षांपुर्वीचा लिहीलेला आहे.
·       विनयपिटक या अडीच हजार वर्षापुर्वी उत्तर भारतात लिहिलेल्या बौद्ध धर्मग्रंथामध्ये महाराष्ट्र हा प्रदेशवाचक उल्लेख आहे.
·       श्रीलंकेत दिपवंश आणि महावंश हे दोन ग्रंथ सिंहली भाषेत २ हजार वर्षापुर्वी लिहीले गेले त्यात मराठी भाषकांचा उल्लेख आढळतो.
·        जुन्नरच्या नाणेघाटात प्राचिन शिलालेख आढळलेला आहे. तो ब्राम्ही लिपीत आणि महाराष्ट्री पाकृत मध्ये असुन, २२०० वर्षापुर्वीच्या या शिलालेखात मराठी बोलणार्‍यांचा उल्लेख ,’महारठीनो’ असा केलेला आहे.
·       विदर्भातील वाशिमच्या असलेल्या गुणाढ्य यांनी पंजाबमध्ये मध्ये जाउन २ हजार वर्षापुर्वी बृहत्कथा ग्रंथ लिहिला. पैशाची या प्राकृतभाषेत लिहीलेल्या या ग्रंथातील अनेक प्रकरणे ही मराठीत आहेत.
·       प्राकृत मराठी,महारठी,मरहट्टी, देशी,महाराष्ट्री आणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नामोल्लेख केले जात असले तरी ती एकच भाषा आहे.
      तेव्हा या अभ्यासपुर्ण अहवालातुन सिध्द होणारे निष्कर्ष पाहाता मायबोली मराठीला केन्द्र सरकारकडुन ’अभिजात भाषा’ म्हणुन निश्चितच मान्यता मिळेल अशी खात्री वाटते. या पुर्वीच अभिजात भाषा म्हणुन मान्यता मिळालेल्या भाषा फक्त चारच असुन त्या तमिळ,तेलगु, कन्नड आणि संस्कृत या आहेत. त्या मध्ये आपल्या मायबोलीचा समावेश होणार आहे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
      तरी या पुढे प्रत्येक मराठी भाषीकाने मायबोलीचा अभिमान बाळगणे आणि मराठी भाषिक म्हणुन जन्मास आलो हे अत्यंत भाग्याचे मानणे यात काहीच गैर नाही हे निश्चित....
जय महाराष्ट्र जय मराठी.  

*** आधार: लोकमत शनिवार दि. ९ फेब्रुवारी २०१३ मधिल बातमी.