१४ मे, २०११

सांगावंसं वाटलं म्हणुन

काहीतरी पाहीलं की ...
काहीतरी वाचलं की ...
सांगावसं वाटतं ... वाटतं ना?
कुणाला तरी ... कधीतरी ...

आदिशक्ती देवीची साडेतिन शक्तिपिठं विख्यात आहेत.तद्‌वत मराठी सारस्वताची तिन जगमान्य संस्कृतीपिठं आहेत. ती म्हणजे पार्ले, डोंबिवली आणि तिसरं ... सांगायलाच हवं का, अहो पुणं. अश्या मराठी सारस्वताच्या पार्ले या संस्कृतीपिठातील काही मायबोलीकरांनी एक चांगला कार्यक्रम, खरतरं उपक्रम हाती घेतला आहे. ज्याच पहिल सादरीकरण दि. १५ एप्रिल २०११ रोजी त्यांनी डोंबिवलीत केल. या कार्यक्रमाच नाव आहे "सांगावंसं वाटलं म्हणुन" आणि निर्मिती आहे "चैत्र" यांची. हा कार्यक्रम आहे मराठी साहित्यातल्या दर्जेदार पुस्तकातील काही वेचक उतार्‍यांच अभिवाचन रसिकांपुढे सादर करण्याचा. हा कार्यक्रम सादर करणारी कोणी हौशीगवशी मंडळी नसु्न त्यातील बहुतेक जण मराठी नाट्यक्षेत्रातील तसेच दुरचित्रवाणीवरील नावाजलेली कलाकार मंडळी आहेत.ही सर्व मंडळी त्यांच्या व्यस्त व्यावसायीक दिनक्रमातुन मराठी साहित्याच्या निखळ प्रेमापोटी वेळ काढुन हा कार्यक्रम करणार आहेत.त्या मुळे हा कार्यक्रम म्हणजे फ़ावल्या वेळातला टाईमपास नसुन अतिशय गांभिर्याने व एक निश्चीत भुमिका घेवुन केलेला प्रयोग आहे हे आपण सर्वांनी आवर्जुन ध्यानात घ्यायला हवं.
"सांगावंसं वाटलं म्हणुन" हा कार्यक्रमाचा उद्देश आहे तो मराठी साहित्यावर प्रेम करणार्‍या तुमच्या आमच्या सारख्यांच वाचनवेड वाढव व त्याचबरोबर दर्जेदार पुस्तकांची आपल्याला ओळख व्हावी. त्या साठी मराठी भाषेतल्या दर्जेदार पुस्तकातल्या काही वेचक उतार्‍यांच अभिवाचन रसिकांपुढे सादर करुन मराठी साहीत्यातले काही अमृतकण मांडण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.कलावंत हे जात्याच अधिक संवेदनाशिल असतात. त्या मुळे त्यांची उत्तम साहित्याची निवड व निकष जाणुन घेण्याची उत्सुकता तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात बर्‍याच वेळा असते.अन्‌ त्याच उत्सुकते पोटी हा कार्यक्रम पाहाण्यास खरतरं मी गेलो होतो. पण अभिवाचन ऎकल्या नंतर माझ्या जाणिवा तर बदलल्याच पण त्याच बरोबर मराठी साहित्यातल दर्जेदार अस बरच काही वाचायच राहुन गेलयं हे ही लक्षात आलं. या पहिल्याच कार्यक्रमात ज्या ८ पुस्तकातील वेधक उतार्‍यांच अभिवाचन सादर केलं गेलं ती पुस्तकं म्हणजे, ३२ हार्टबीट्‍स (लेखक- प्रकाश वेलणकर), आहे मनोहर तरी (लेखिका- सुनिता देशपांडे),भोगले जे दु:ख्ख त्याला ... (लेखिका- आशा आपराद) ,गार्गी अजुन जिवंत आहे (लेखिका- मंगला आठलेकर), हे सर्व कोठुन येते (लेखक- विजय तेंडुलकर) ,किरण पाणी (लेखक- महावीर जोंधळे), माणसं (लेखक- अनिल अवचट),ऋतुचक्र (लेखिका-दुर्गा भागवत). प्रामाणिकपणे सांगायचंच झाल तर या ८ पुस्तकांपैकी अनिल अवचट यांच " माणसं " हे पुस्तक वगळता इतर कोणतही पुस्तक मी अद्याप वाचलेल नाही. पण या ८ पुस्तकांतील वेचक उतार्‍यांचे अभिवाचन ऐकल्या नंतर निवडलेलं प्रत्येक पुस्तक किती आगळ-वेगळ आणि वैशिष्टपुर्ण आहे याची कल्पना आली.त्याचबरोबर खुप चांगल आणि मनाच्या जाणिवा बदलु शकणार बरंच काही अद्यापही वाचलेलं नाही याची खंतही निश्चितच वाटली.या पुस्तकांपैकी "गार्गी अजुन जिवंत आहे "हे पुस्तक आहे गंगा किनारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या स्त्रीचं तर "३२ हार्टबीट्‍स" हे पुस्तक आहे अश्या माणसाच ज्याच्या हृद्याचे प्रती मिनीट फक्त ३२ ठोके पडतात.अस असुनही हा माणुस तुमच्या आमच्या सारखंच त्याच नित्य जीवन सहजपणे जगतो आहे...पुढच्या क्षणाची खात्री नसताना.या दोन पुस्तकांवरुन अभिवाचनाच्या निवडलेल्या पुस्तकांचा दर्जा लक्षात येईल.
तेव्हा या कार्यक्रमाद्वारे वाचनवेड्या रसिकांच्या अधिक जवळ जाण्याचा व मराठी भाषेतल्या दर्जेदार साहित्याची ओळख करुन देण्याचा प्रयत्न त्युस्त तर आहेच पण त्यातुनच उद्याचे चांगल्या कार्यक्रमांना व उपक्रमांना दाद देणारे रसिक घडणार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळेच मराठी भाषेच्या निखळ प्रेमापोटी सकारात्मक विचारातुन सादर केलेल्या या कार्यक्रमाची ओळख जास्तीत जास्त मराठी माणसांना माहिती करुन देण्याचा माझा हा एक प्रामाणीक प्रयत्न.या व अश्याच प्रकारच्या इतर प्रयोगशिल कार्यक्रमांची-उपक्रमांची माहित करुन देण्याचा माझ्या सारखाच सर्व ई-भाष्य कट्ट्य़ावरील मायबोलीकरांचा प्रयत्न व हेतु असला पाहीजे अस मला वाटतं.
कारण, आपण ई-भाष्य कट्टेकरी देखिल आपापल्या ब्लॉगवर लिहीतो ते मनातल काहीतरी "सांगावंसं वाटलं म्हणुन".च ना?