२७ फेब्रु, २०११

मराठी भाषा दिवस - २७ फ़ेब्रुवारी २०११



आज आपण सर्व मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत.विविध कारणाने जगभरात विखुरलेले आपण सर्व मायबोलीकर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध माध्यमांचा उपयोग करुन सहजगत्या एकमेकांशी संपर्क साधत आहोत.असे असले तरी मायबोली मराठीत चार शब्द लिहीणे आणि ते आपल्या माणसां पर्यंत पोहचवणे हा आपल्या भावना अभिव्यक्त करण्याचा सर्वांत सुंदर मार्ग आहे असं माझं मत आहे. मराठीतले ई-भाष्य कट्टे (Blogs) देखिल हाच हेतु ठेवुन लिहीले जातात. त्या कट्ट्यांवर व्यक्त केलेल्या मनमोकळ्या भावना व विचारांना तशीच दिलखुलास दाद मिळते कारण आपल्यातला समान धागा आहे तो मराठी भाषेच्या अभिमानाचा.अश्या आपल्या मायबोली मराठी बद्दल संत ज्ञानेश्वर म्ह्णतात," माझा मराठाचि बोलु कौतुके।अमृतातेही पैजा जिंके।".ईतकं सर्मपक वर्णन आणि ते ही मोजक्या शब्दात त्यांच्या शिवाय दुसरं कोणालाही करता येणार नाही.
आपल्या वर आलेलं संकट दुर व्हावं किंवा आपल्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात या साठी प्रत्येकानं देवाला काही ना काही मागणं घातलं आहे.देवाला घातलेलं आपलं मागणही आपल्या स्वत: पुरतच असतं. पण ज्ञानेश्वरांनी देवाला मागणं घातल ते सर्वांसाठी.त्या मुळेच ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागीतलेले ’पसायदान’ ही जगातली सर्वोत्कृष्ठ वैश्विक प्रार्थना ठरते आणि तिही आहे आपल्या मराठीत.तेव्हा तिच प्रार्थना आपण सर्वांनी आजच्या दिवशी म्हणणं उचित ठरेल नाही का?

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें।
येणें वाग्‌यज्ञें तोषावें।
तोषोनी मज द्यावें।
पसायदान हें॥

जें खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मीं रती वाढो।
भूतां परस्परें पडो।
मैत्र जीवाचें॥

दुरिताचें तिमिर जावो।
विश्व स्वधर्मसूर्यें पाहो।
जो जे वांछील तो तें लाहो।
प्राणिजात॥

वर्षत सकळमंडळी।
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी।
भेटतु भूतां॥

चलां कल्पतरुंचे आरव।
चेतनाचिंतामणीचें गांव।
बोलते जे अर्णव।
पीयूषाचे॥

चंद्रमे जे अलांछान।
मार्तंड जे तापहीन।
ते सर्वाही सदा सज्जन।
सोयरे होतु॥

किंबहुना सर्वसुखीं।
पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।
भजिजो आदिपुरुषीं।
अखंडित॥

आणि ग्रंथोपजीविये।
विशेषीं लोकीं इयें।
दृष्टादृष्ट्विजयें।
होआवें जी॥

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो।
हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो।
सुखिया जाला॥

*** संत ज्ञानेश्वर महाराज***

२४ फेब्रु, २०११

माझा ’संकुचित’ दृष्टीकोन


माझा दृष्टीकोन संकुचित आहे हे कबुल करायला मला आता अजिबात लाज वाटत नाही.अर्थात माझा दृष्टीकोन ’संकुचित’ आहे अस म्ह्णाल्याने कोणी लगेचच तसं समजु लागेल असा भ्रम मला नाही कारण मराठी माणसं चिकीत्सक फार हे मी जाणुन आहे.तेव्हा माझ्या संकुचितपणाचे पुरावेच तुमच्या समोर मांडतो.
  • मी बाजारात गेल्यावर कटाक्षाने मराठीत बोलतो.बरेचशे भाजीवाले मराठी नसतात याची कल्पना असुनही.
  • मला समोरच्या भाजीवाल्याने मराठीत उत्तर दिलं नाही तर मी पुढच्या भाजीवाल्या कडे जातो.
  • फळवाला तर बहुदा भैयाच असतो. मग स्वत:ची तंगडतोड करुन मराठी फळवाला शोधण्याचे कष्ट घेतो.त्या मराठी फळवाल्याने मग्रुरी केली तरी मलाच गरज असल्या सारखा केवीलवाणा चेहरा करुन त्याच्या कडुनच फळं घेतो.
  • समोरच्या माणसाने " कितना बजा" असं हिंदीत विचारल तरी मराठीतुनच वेळ सांगतो. बहुतेक वेळा विचारणारी माणसं मराठीच असतात आणि नसली तरी वेळ समजल्या सारखा चेहरा करुन निघुन जातात.
  • पान खाण्याची आवड आहे पण मराठी पानवाला सापडणं दुर्मिळच.पानाशिवाय पान हालत नसल्याने त्यातल्या त्यात मराठीतुन उत्तर देवु शकणारा पानवाला शोधतो.
  • टॅक्सीवाले-रिक्षावाले पण बहुदा परप्रांतीयच असतात पण तरीही त्यांच्याशी मराठीतुनच बोलण्याचा माझा अट्टाहास असतो.
माझ्या या संकुचित वागण्याने माझी बायको वैतागते कारण ती ’ग्लोबल’ विचारांची आहे. तिचही चुक नाही म्हणा कारण माझ्या अश्या वागण्याने बरेच वेळा तिची कुचंबणा व वेळेचा अपव्यय होतो. त्या मुळे आता माझा संकुचित पणा दिवसेन दिवस वेडेपणा कडे झुकत चाललाय याची तिला आता खात्रीच पटली आहे.
या रविवारचीच गोष्ट घ्याना. आम्ही दोघ बाजारात निघालो असताना मुलीने ’द्राक्ष’ आणायला सांगितली. सध्या द्राक्ष बाजारात मुबलक असल्याने ती सहज आणू असा बायकोचा समज. बाजारात गेल्यावर पहीले भाजी वैगरे घेतली. आता ’द्राक्ष’ घेवुया म्हणुन मी पहील्याच फळवाल्याला विचारलं," द्राक्ष कशी देणार." तो बोलला," साब,अंगुर तो पच्चीस रुपय्या पाव है. मगर चालीस को आधा लेलो." त्याने सांगतलेला भाव तसा वाजवीच होता.त्या मुळे बायकॊ त्याच्या कडुन खरेदी करणार होतीच. तेव्हड्यात मी तिला आडवलं.
मी म्हणालो," थांब जरा अजुन एक दोघांना विचारु."
मी भाजी घेताना जास्त चिकीत्सकपणा करत नाही हा तिचा नेहमीचा अनुभव. त्या मुळे तिला माझ्या म्हणण्याच जरा आश्चर्यच वाटल.पण ती काही बोलली नाही.मग आम्ही दुसर्‍या फळवाल्या कडे वळलो. पुन्हा तेच . मी द्राक्ष मागतोय तर तो मात्र अंगुर बेचतोय. मग मी पण पेटलोच... मराठी माणुस आहे पेटण्या शिवाय दुसरं काय करु शकतो?.मग मी एका मागे एक 'अंगुर'वाल्यांना नाकारण्याचा सपाटाच लावला आणि बायकॊ हाताशपणे माझ्या मागे मागे " अरे ऎक,अरे ऎक." म्हणत चालत होती. एका क्षणी मात्र मला तिनं आडवलचं.
मी म्हणालो, "काय झालं".
ती म्हणाली," अरे बाजारातले जवळपास सगळे फळवाले आता विचारुन झाले."
"मग"
"मग काय.अंगुर घ्यायचे नाहीत का?"
"अंगुर काय म्हणतेस. द्राक्ष म्हण द्राक्ष."
"तेच ते."
"तेच ते काय.अं "
"बरं बाबा द्राक्ष. घ्यायची आहेत ना नक्की आपल्याला."
"मग. तुला द्राक्षवाला दिसला की घेवुया."
मग तिच्या लक्षात आल की मी का द्राक्ष घेत नाही ते.
" अरे पण .... "
" पण बिण काही नाही. जो पर्यंत द्राक्षवाला भेटणार नाही तो पर्यंत ती खरेदी करायची नाहीत."
" म्हणजे आज द्राक्ष न घेताच घरी जायचा विचार दिसतोय बहुदा."
" मिळतील गं. जरा धिर धर."
" लेक घरी वाट पाहातेय. बाबा द्राक्ष आणणार याची"
बायकोन अगदी माझ्या भावनेलाच हात घातला.मग मी विचारात पडलो.तरी उसनं आवसान आणुन म्हणालो," द्राक्ष घेवुनच घरी जायचं".
यावर बायकोन असा काही चेहरा केला की मी पण मनातुन नर्व्हसच झालो.तेव्हड्यात समोर एक फळवाला दिसला. मनातल्या मनात देवाचं नावं घेवुन हळुच त्याला विचारलं,"द्राक्ष कशी".


आता पर्यंतचे अनुभव पचवुन माझाही धीर सुटायला लागला होताच की.
तो म्हणाला," तीस रुपये पाव साहेब."
" इतना महंगा क्युं. बाकी सब तो पच्चीस रुपया पाव विक रहा है"
" नाशिकची द्राक्ष आहेत साहेब"
माझ धेडगुजरी हिंदी ऎकुन त्याला गिर्‍हाईक मराठी असल्याच समजल असावं बहुदा.
तो चक्क द्राक्ष म्ह्णला... की मलाच भास झाला हे कळेनाच. माझा झालेला गोंधळ एव्हना बायकोच्या लक्षात आला होता.
मग तिनेच विचारलं" अर्धा किलो घेणार. पन्नासला दे."
" परवडत नाही. तेव्हडी खरेदीच नाही साहेब". त्याला समोरच्या दोघां पैकी आपलं गिर्‍हाईक(?) कोण कळलं होत.
आता द्राक्ष समोर होती पण बायको मुळे व्यवहार फ़िस्कटणार याची चिन्ह दिसत होती.मीच मध्ये पडलो.
" अगं घेवुन टाक. आपल्या नाशिकची द्राक्ष आहेत. छान गोड असतात."
" अहो पण....."
" जावु दे. द्राक्ष आहेत ना मग बस झालं"
मी द्राक्ष या शब्दावर ईतका जोर दिला की बायकोला मला काय म्हणायच ते चटकन ध्यानात आल. मग तिनेही जास्त खळखळ न करता द्राक्ष घेतली.
या प्रसंगा वरुन माझ्या संकुचित दृष्टीकोनाची तुम्हाला आता खात्री पटली असेलच.आज हे सगळं तुम्हाला आवर्जुन सांगायच कारण म्हणजे आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधली एक बातमी. बातमी आहे " मराठी इन्फोलाइन " या वेबसाइटला एक वर्ष पुर्ण झाल्याची. मराठी उद्योजकांना ’ग्लोबल’ व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी डोंबिवलीतल्या दोन मराठी मुलांनी ही वेबसाइट तयार केली असुन सध्या साडेचार हजार मराठी उद्योजक या साइटला नोंदीत झाले आहेत.किमान एक लाख मराठी उद्योजकांना या साइटवर नोंदीत करायच उद्दीष्ट या वेबसाइटच आहे.ही वेबसाइट सुरु करण्याची कल्पना कुणाल गडहिरे व दीपक उमरेडकर या दोन डोंबिवलीकर तरुणांना कशी आली ते समजुन घेण्या सारखं आहे. या दोघांना एकदा चहा पिण्याची तल्लफ आली असताना त्यातील एकाने मराठी माणसाच्याच टपरीवर चहा पिण्याचा हट्ट धरला. त्या साठी टपरीचा शोध घेता घेता त्यांना शेवटी मराठी माणसाची टपरी तर सापडलीच पण मनात एक अभिनव कल्पना देखिल सुचली. त्यातुन जन्म झाला " मराठी इन्फोलाइन " या वेबसाइटचा.
हे वाचल्यावर संकुचित दृष्टिकोनातुन किती मोठी कल्पना न ध्येय निर्माण होत हे मला जाणवलं.म्हणुन मला माझ्या ’संकुचित’ दॄष्टीकोनाची लाज आता वाटत नाही कारण याच संकुचित दृष्टीकोनातुन न जाणो पुढे कधितरी एखादी भव्य कल्पना सुचेलही.
तुर्त "मराठी इन्फोलाइन"  वेबसाइटची माहीती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना करुन द्यावी ही ई-भाष्य कट्ट्यावरील समस्त मायबोलीकरांना विनंती.

आपला
मैत्रेय१९६४




२० फेब्रु, २०११

इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा

मराठी ई-भाष्य कट्ट्यांवर वेळ मिळेल तशी भटकंती मी करत असतो. ही भटकंती स्वैर असते. अस असल तरी काही कट्टे असे आहेत की ते टाळता येत नाहीत. त्या पैकी एक म्हणजे netbhet. त्या कट्ट्यावर गेलो असताना मला " आगळं ! वेगळं !!!" या कट्ट्यावरच्या नविन चर्चापिठाची ( Forum) माहीती मिळाली. विषय आहे " इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा ". " अमृताते पैजा जिंकी " असे ज्ञानेश्वर माऊलींनी जीचं वर्णन केल आहे ती आपुली माय मराठी संपुर्ण जगाची बोली भाषा, व्यवहार भाषा, संपर्क भाषा व्हावी असं स्वप्न आपण सर्वच पाहात असतो. हे होण्यासाठी भाषा नविन नविन शब्दांनी समृध्द व्हावी याचे जाणिवपुर्वक प्रयत्न व्हायला पाहीजेत. स्वप्नांना प्रयत्नांची साथ असेल तर आपली मराठी भाषा विश्वभाषा निश्चीत होईल. त्या मुळे " आगळं ! वेगळं !!!" या कट्ट्यावरच्या चर्चापिठाची सर्वांना माहिती व्हावी व जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवले जावेत असं मला मना पासुन वाटतं. माझ्या कडुन मी ब्लॉगला / Blog Spot ला " ई-भाष्य कट्टा " हा मराठी शब्द सुचवला आहे.

तेव्हा तुम्ही पण या चर्चापिठाच्या खालील दुव्याला (Link) जरुर भेट द्याव असं आवाह्न करीत आहे.

http://nathtel.blogspot.com/2011/02/blog-post_19.html

आपला
मैत्रेय१९६४

१९ फेब्रु, २०११

शिवजयंती २०११


श्री छत्रपती शिवाजी महाराज



आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणा स्थान. त्यांना त्रिवार वंदन करताना त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र व महाराष्ट्र धर्म आज अस्तित्वात आहे का याचा विचार मनात यायलाच हवा....आणि अर्थातच तसा विचार आपण सर्व मायबोलीकर आपल्या आपल्या परीने निश्वितच करत असालच.
आपल्या महाराष्ट्र राज्याची सध्याची आर्थिक, सामाजीक , भाषीक आणि त्याहुन महत्वाची म्हणजे राजकीय परिस्थिती पाहुन छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म आपण विसरत चाललो आहोत की काय अशी शंका माझ्या मनात येते.त्या मुळे मी माझे महाराष्ट्र धर्मा बद्दलचे विचार खरं म्हणायच माझ्या भावना आपणा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा हा प्रयत्न आपण समजुन ( आणि सहन करुन.... ) घ्याल अशी खात्री असल्यानेच हे धाडस.

जय महाराष्ट्र जय मराठी

आपला
मैत्रेय१९६४.

*************************************

महाराष्ट्र धर्म आठवावा
वन्ही मनी चेतवावा
एल्गार पुन्हा करावा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

बलीदान ते पुर्वजांचे
नित्यस्मरुनी मनामनाते
शिवराजधर्म तो जाणावा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

जातपात पंथ विसरुनी
जाणावी अस्मिता महाराष्ट्राची
आण घ्यावी मायबोलीची
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

लढलो देश रक्षणासाठी
नाही कोणत्या स्वार्थासाठी
सांगावे हे अभिमानाने
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

आठवावे बलिदान ते
बाजी मुरार अन तानाजीचे
धर्मनिष्ठ शंभुराजांचे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

गवतालाही फुटले भाले
फक्त याच मातीमध्ये
लक्षात नेहमीच ठेवावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

आण आम्हाला शिवरायांची
वारकर्‍यांच्या भक्तीमार्गाची
याचे भान असो द्यावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

रोहीडेश्वराशी संकल्प केला
स्थापण्या राज्य मरहट्ट्यांचा
हेतु जाणावा महाराजांचा
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

महाराजांचे करण्या स्मरण
नाही उत्सवा्चे प्रयोजन
नित्य करावे शिव-चिंतन
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

मावळे आम्ही महाराजांचे
जाणीव असावी मनामध्ये
सावध चित्ती सदा असावे
शिवरायांच्या मरहट्ट्यांनी ॥

***************************




६ फेब्रु, २०११

आवरण



                                मुळ लेखक    : डॉ. एस.एल.भैरप्पा
                                अनुवाद         : उमा कुळकर्णी
                                प्रकाशक        : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

अनेक वेळा वाचण्याचं व्यसन म्हणुन भारंभार वाचण्याची सवय जशी मला आहे तशीच माझ्या सारख्या तुम्हा वाचनवेड्या मायबोलीकरांना देखिल आहे. पण काही पुस्तक अशी असतात ती मनाला अस्वस्थ आणि अंतर्मुख करतात. अश्या मनावर प्रभाव टाकणार्‍या पुस्तकांचा वयानुसार व काळानुसार होणारा परिणाम कमी-जास्त असतो. तरुणपणी ज्या पुस्तकांनी भारवुन टाकलेलं असतं ती पुस्तक काही वर्षानंतर तितकीशी आवडत नाहीत. त्या मुळे मला असं वाटु लागलयं की योग्य वयात योग्य पुस्तक वाचायला मिळणं हे वाचक म्हणून आणि व्यक्ति म्हणुन अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हे सगळं लिहीण्याच कारण म्हणजे "आवरण" ही कादंबरी जर २५-३० वर्षां पुर्वी जर मी वाचायला घेतली असती तर कदाचित कंटाळवाणी आहे म्हणुन अर्धवट वाचुन बाजुला ठेवुन दिली असती. कादंबरीची एकंदरीत मांडणी पाहीली तर रुढार्थाने ’आवरण’ ही कादंबरी आहे असं म्हणता येणार नाही. कारण या कादंबरीच्या निमित्याने डॉ. भैरप्पा यांनी केलेले वाचन, मनन लक्षात घेतलं की लेखकाने त्याच्या अभ्यासातुन तुम्हा आम्हां वाचकांशी केलेला हा संवाद आहे हे लक्षात येतं.या कादंबरीच्या कन्नड मध्ये २२ आवृत्या आता पर्यंत प्रकाशीत झालेल्या आहेत.त्यामुळे अभ्यासातुन केलेला संवाद असेल तर त्याला वाचकांची व समाजाची दाद मिळतेच.
"आवरण"च दुसरं वैशिष्ट म्हणजे मराठी समाजाने संपुर्ण हिंदुस्तानासाठी व हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाची या कादंबरीत डॉ. भैरप्पा यांनी आवर्जुन दखल घेतलेली आहे. तेव्हा आपल्या इतिहासा बद्दल अभिमान बाळगणं काहीच गैर नाही याची पुन्हा पुन्हा खात्री पटते.सध्या मराठी माणसांना संकुचित व प्रादेशिकवादी म्हणुन हिणवण्यात अनेक विचारवंत व विषेशत:  इंग्रजी वर्तमानपत्र आघाडीवर आहेत.त्याच बरोबर सहिष्णु अश्या हिंदु धर्मावर वेगवेगळ्या मार्गाने टिका केली जात आहे. या सातत्याने होणार्‍या खोट्या प्रचाराचा हिंदु समाजावर तसेच सर्वसामान्य माणसांवर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम व त्यातील धोका ही कादंबरी वाचल्यावर जाणवतो.
या कादंबरीची नायिका मुस्लिम आहे जी पुर्वाश्रमीची हिंदु आहे. सेक्युलर विचारसरणीची ही स्त्री काही कारणाने जेव्हा भग्नावस्थेतील देवालयांच्या इतिहासाचा अभ्यास करते तेव्हा तिला जे सत्याच्ं दर्शन होतं त्याने ती भांबाहुन जाते. तिच्या या मनोवृत्तीच दर्शन घडवताना डॉ. भैरप्पा यांनी केलेली भाष्ये मुळातुनच वाचायला हवीत. असे असले तरी या कादंबरीतील काही भाष्ये आपणा साठी आवर्जुन सादर करत आहे.
  • ’ब्रिटीशांविरुध्द झगडणारा’ हे कारण पुढे करुन टिपूला राष्ट्र-नायक म्हणायचं असेल तर त्याच ब्रिटीशांविरुध्द लढणार्‍या मराठ्यांच हेच इतिहासकार आणि साहित्यीक उदात्तीकरण का करत नाहीत? आपल्या सगळ्या शत्रुंमध्ये मराठेच सर्वात बलवान आहेत हे ब्रिटीशांनी ओळखलं होतं.
  • मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतातील मुळ गावांची नाव बदलुन मुस्लिम नावं ठेवली.हिंदुंच पवित्र क्षेत्र असलेल्या प्रयागच अल्लाहबाद तर मथुरेच इस्लामाबाद हे नाव ठेवलं.
  • मलबार आणि कोडगु प्रांतात टिपूने हिंदुंच जबरदस्तीने धर्मांतर केलं.याच टिपूनं अफगाणचा राजा जमानशाहाला आणि तुर्कस्तानचा खलिफाला भारतावर आक्रमण करुन संपुर्ण देश इस्लाममय करा असं पत्र पाठवलं होत. तरी म्ह्णे टिपू धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णु.
  • हिंदुस्तान,खुरास्तान , सिकीयांन या सर्व प्रदेशां मधिल असलेली मुळ बौद्ध देवालयं मुसलमानांनी नष्ट केली असं ह्यु एन त्संगनं लिहुन ठेवलयं.
  • संपुर्ण काशी मह्णजे मी,असा भार वाहात उभी आहे ती ’ग्यानवापी मशिद’. मुळचं विश्वनाथ मंदिर औरंगजेब बादशाहान फोडलं,त्याचेच खांब -भिंती वापरुन त्याच जागी १६६९ साली ही मशिद बांधली आहे.
  • काशी हे सगळ्या पंथांच प्रमुख केंद्र.काशीमध्ये जेव्हडी देवळ बांधली गेली तेव्हडी देशातल्या इतर कुठल्याही शहरात बांधली गेली नाहीत. इतर धर्माची देवळ पाडणं म्हणजेच मुसलमान धर्म अस मानणारे शतकानुशतक या काशीबर राज्य करत राहीले. इतर सर्व धर्मांचा नामशेष करण या वृत्तीच्या इस्लामनं काशीमधिल इतर पंथांच्या मंदिरांचा नाश करुन,त्या जागी मशिदी उभ्या केल्या. या काशीत अनेक घाट आहेत त्यांची नाव हनुमान घाट,नारद घाट, बाजीरावानं बांधलेला मणिकर्णिका घाट ईत्यादी अशी आहेत.हे सगळे घाट मराठयांनी आणि मराठ्यांच्या काळात बांधले गेले आहेत. जर मराठ्यांचा उद्य झाला नसता , तर काशी मुस्लिमांच्या ताब्यात राहीली असती. मग काशीला तिचं काशी असणं आणि हिंदुंना पुनर्जिवन मिळालं असतं का ?
  • मुळची काशी आता नाही.आजच्या काशीमधिल बहुसंख्य देवालय्ं,घाट ,स्मशानं मराठयांनी बांधली आहेत. मुसलमानांच्या प्रभावा खालुन काशीची सुटका करुन , देवालयांच्या जागी त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने उभारलेल्या मशिदींच्या जागी पुन्हा देवळं बांधायचा प्रयत्न प्रत्येक मराठी राज्यकर्त्यांनी आणि अधिकार्‍यांनी केला आहे.त्या साठी त्यांनी साम ,दाम ,दंडाचाही वापर केला.पण एकदा ताब्यात घेतलेली मंदिराची जागा परत द्यायला कुठल्याही मुस्लिम राज्यकर्त्याने मान्यता दिलेली नाही.
  • बनारस इंग्रजांच्या ताब्यात गेलं. इंग्रजांना हवा तेवढा पैसा आणि ईतर ठिकाणी त्यांना सैनिकी साहाय्य देवुन विश्वनाथ मंदिराची मुळची जागा मिळवण्याचा मराठयांनी खुप प्रयत्न केला. पण हिंदु आणि मुस्लिम यांच्या मध्ये सतत तेढ ठेवुन स्वत:च रक्षण करणं हे धोरण असलेल्या इंग्रजांनी हे नाकारलं. पहिल्या बाजीरावाचा हेतु तर केवळ ग्यानवापी मशिद पाडुन तिथे मंदिर उभारणं, हाच होता.
  • बाजीरावानं रामजी शिंदे यांना १७५९ मध्ये लिहीलेल्या पत्रात लिहीलयं,"शुजाउद्दौलाशी दोन-तिन गोष्टी ठरवल्या पाहीजेत. त्याच्या कडुन बनारस , अलाहाबाद , आणि अयोध्या काढुन घे. त्यानं माझ्या वडिलांना बनारस आणि अयोध्या देईन असा शब्द दिला होता.अलाहाबादेवर अजुनही चर्चा चालु आहे.त्याही बाबतीत सहजासहजी तडजोड होत असेल तर कर."
  • अकबराचा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक मुसलमान राज्यकर्त्यानं हिंदु यात्रेकरुं कडुन कर वसुल केलेला आहे. औरंगजेबाने हा कर असह्य होईल अशा पातळी पर्यंत वाढवला. त्याच्या मृत्युनंतरही तिथे आलेल्या सुभेदार, बादशहा, नवाबांनीही हे कर कमी केले नाहीत. काहीतरी करुन काशी, अलाहाबाद आणि प्रयाग आपल्या ताब्यात घेवुन हिंदुंची यात्रा सुकर करुन द्यावी म्हणून मराठे सतत प्रयत्न करत राहीले. युद्धात जिंकुन किंवा विकत घेवुन, पण ग्यानवापी मशिदीच्या जागी पुन्हा विश्वनाथ देवालय उभं करण्याचे खुप प्रयत्न मराठयांनी केले पण मुसलमानांनी ते कधिच शक्य होवु दिलं नाही.पाठोपाठ आलेल्या इंग्रजांनी मुसलमानांची बाजु घेतली. विश्वनाथ मंदिर देणार असाल तर टिपू सुलताना विरुद्धच्या युद्धात मदत करु . अशी नाना फडणविसांनी अट घातली होती. पण ती इंग्रजांनी मान्य केली नाही. त्यामुळे इंग्रज- मराठ्यांत वितुष्ट निर्माण झालं.
  • १६६९ साली औरंगजेबानं नष्ट केल्या पासुन १७७५ पर्यंत विश्वनाथ मंदिर उरलंच नव्हत.आज ग्यानवापी मशिद शेजारी असलेला छोटासा ’मंदिर’ म्हणवला जाणारा मंडप १७७५ च्या सुमारास अहिल्याबाईनी उभारला.
        (टीप : असे असुनही आपण मराठी माणसं संकुचितवादी.... शेम शेम शेम)

  • साकी मुश्ताकखान यांन औरंगजेब बादशाहाचा इतिहास लिहिलेला आहे.त्या ग्रंथाच नाव ’मासिर-ई-आलमगीरी’. दरबारात असलेल्या पुराव्या शिवाय त्यानं एकही शब्द लिहीलेला नाही. बादशाहाच्या आज्ञेनुसार त्याच्या अधिकार्‍यांनी काशीचं विश्वनाथ देवालयं नष्ट केलं अशी नोंद त्यानं त्याच्या ग्रंथात केली आहे.
कादंबरीच्या शेवटी नायिकेच्या तोंडुन हिंदु- मुस्लिम ऎक्याबाबत डॉ. भैरप्पा यांनी केलेल भाष्य जसेच तस देण्याशिवाय मला राहावतच नाही.

  • "हिंदु- मुसलमानां मध्ये ऎक्य निर्माण करणं हा विचार निश्चितच उदात्त आणि स्वागतार्य आहे. त्याची आज नितांत गरजही आहे. पण असत्यावर समाज उभा करणं शक्य नाही. दर वर्षी किमान पंचविस लाख हिंदु यात्रेकरु काशीला जात असतात.ज्या अपेक्षेनं आणि श्रद्धेने आपण आलो ते काशी विश्वेश्वराचं मंदिरच अस्तित्वात नसुन तिथे एक अजस्त्र मशिद उभी असल्याचं पाहुन धक्क्याने ते कोलमडुन जातात.गावी परतल्यावर आपल्या जवळपासच्या सगळ्यांना या आघाताविषयी सांगतात.अशा प्रकारची भावना मनात असताना राष्ट्रीय भावना कशी निर्माण हॊणार?. आज शाळेत शिकणार्‍या विद्यार्थां पासुन तुम्ही हे सत्य दडवुन ठेवण्यात यशस्वीही व्हाल. हीच मुलं शैक्षणीक प्रवासा साठी जातील आणि सोबत असलेल्या अध्यापकांना या संबंधी प्रश्न विचारतील. त्यावेळी त्यांनी काय उत्तर द्यावं? ही केवळ काशी- मथुरा- अयोध्येची गोष्ट नाहीये. भारतात अशी किमान तिस हजार भग्न देवालयं आहेत! हा संशोधकांनी सांगीतलेला आकडा आहे. ही सगळी देवालयं रानटी प्राण्यांनी भग्न केली असं सांगायच काय? जैन, बौद्ध , शैव, वैष्णव या परस्परांनी देवळं पाडली म्हणुन कथा निर्माण करायच्या काय?.या पैकी कुणाच्याही धर्मग्रंथांनी इतरांची देवालयं पाडावी म्हणुन सांगितलेलं नाही.कुणी समाजकंटकाने असलं काही केलं तरी त्याला आपल्या धर्माने आदर्श मानलेलं नाही. उलट इतर धर्मियांची पुजास्थळं आणि मूर्ती फोडणं,हातात तलवार घेवुन धर्माचा प्रसार करणं. जिझीया लादणं, हरलेल्यांना हजारोंच्या संख्येने गुलाम करणं या सार्‍या गोष्टी स्वत: धर्मसंस्थापकांनी केलेल्या आहेत, त्यांनाच आदर्श मानण्यात आलं आहे. कधी काळी, असंस्कृत काळी, असंस्कृत देशात केलेली कृत्यं आणि सांगीतलेला उपदेश आजच्या काळातही अनुसरण्याची मनोभुमिका असे पर्यंत तुम्ही म्ह्णता ते ऎक्य कसं शक्य आहे.? मनुसारख्याच्या मनोभुमिकांना त्याज्य ठरवुन, सर्व जण समान आहेत, या तत्वाचा स्विकार करुन आपण आपल्या देशाचं संविधान लिहीलं आहे नाही कां?त्याचप्रमाणे परधर्माचा व्देष करत स्वत:च्या प्रेषितानं सांगितलेलाच धर्म श्रेष्ठ मानुन,आपल्या धर्मात न येणार्‍यांना ठार करा असं सांगणार्‍यांच्या मनोभावाचा तिरस्कार करुन ’एकं सतविप्रा: बहुदा वदंति’ हे तत्व सगळ्यांवर कठोरपणे लादल्या शिवाय आपण ऎक्याच्या गोष्टी केल्या, तर त्या पोकळ ठरणार नाहीत काय?
डॉ. भैरप्पा यांच हे भाष्य राष्ट्राच्या एका मोठ्या समस्ये वरील अभ्यासु व निर्भिड असं भाष्य आहे.राष्ट्रीय ऎक्याच्या तथाकथीत गोष्टी करणार्‍या विचारवंतांना विचार करण्यास प्रवृत्त करणारं हे भाष्य आहे. पण विचारवंतांना विचार करायला वेळ आहे का ? त्यांनी फक्त सांगायचं, विचार तर आपण सर्वसामान्य माणसांनी करायचा असतो नाही का?
पुस्तकाच्या शेवटी कथेच्या नायीकेनं पर्यायानेच डॉ.भैरप्पा यांनी अभ्यासलेल्य़ा विविध पुस्तकांची व ग्रंथांची सुची दिलेली आहे.त्या वरुन ही कादंबरी लिहीताना केलेला अभ्यास व त्या मधुन केलेला संवाद आपल्यालाही विचार करण्यास प्रवृत्त करतो ही निश्चित.
थोडक्यात काय हिंदु म्हणुन जन्म मिळणं ,हिंदु म्हणुन जगणं आणि हिंदु असणं यांच महत्व मनावर अधोरेखित करण्यात डॉ. भैरप्पा हे यशस्वी झाले आहेत.