२७ जाने, २०११

अस्वस्थ करणारे प्रश्न


काल २६ जानेवारीला माझ्या एका मित्राचा मला एसएमएस आलाय.
एसएमएस असा आहे की :

- मायक्रोसॉफ़्टच्या एकुण कर्मचार्‍या पैकी ३४% भारतीय आहेत.
- इंटेलच्या एकुण कर्मचार्‍या पैकी १७% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल डॉक्टरां पैकी ३८% भारतीय आहेत.
- यु.एस.ए मधिल शास्त्रज्ञां पैकी १२% भारतीय आहेत.
- नासा मधिल शास्त्रज्ञां पैकी ३६% भारतीय आहेत.

याचाच अर्थ भारतीय महान आहेत पण भारत नाही ..............
कारण या बुद्धीवान भारतीयांनी केलेल्या मुर्खपणा मुळेच.
जर या बुद्धीवान भारतीयांनी भारतासाठी आपली बुद्धी वापरली असती तर आपला भारत पण महान झाला असता.

या एसएमएसच्या शेवटी भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पण हा एसएमएस वाचल्यावर मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थीत होतात..................

भारत सोडुन परदेशात गेलेल्या आपल्याच माणसांना दोष देण खरच योग्य आहे का?
ते ईथेच राहीले असते तर त्यांच्या बुद्धीमत्तेला खरच वाव मिळाला असता का?
या देशात आपली प्रगती होणार नाही अशी भावना निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?
भारतीय तरुणांना या वर विचार करण्याचे आवाहन करणार्‍यां पैकी किती जण संधी मिळाली तरी परदेशात, विशेषत: यु.एस.ए ला जाणार नाहीत?
जात पात धर्म या पलीकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व आणि समाज ख्ररच या देशात आहे?

असे एक ना अनेक प्रश्न मनात उभे राहीले आहेत.
मला आज तरी या विषयी मत व्यक्त करावसे वाटत नाही. पण तरीही यावर विचार व्हायला हवा या विषयी दुमत नसाव.

काय वाटत तुम्हाला?






१५ जाने, २०११

हेडहंटर

पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात गेलो असताना "हेडहंटर" हे पुस्तक नजरेस पडल.पुस्तकाच्या नावातच काहीस वेगळेपण जाणवल्याने मनात उत्सुकता जागी झाली व ते पुस्तक घेवुन घरी आलो. जस जस हे पुस्तक वाचत गेलो तशी तशी चढत्या श्रेणीने ती उत्सुकता वाढतच गेली आणि पुस्तक वाचुन होईपर्यंत ती तशीच कायम होती. राजहंस प्रकाशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशीत केल आहे. या पुस्तकाचे नायक आहेत श्री.गिरिश टिळक जे हेडहंटींगच काम करतात.त्यांच्या या कामामधिल अनुभवांच श्री. सुमेध वडवाला (रिसबुड) यांनी या पुस्तकात शैलीदार शब्दांकन केलेल आहे.
माझ्या सारखीच आपल्या पैकी अनेकांना हेडहंटर म्हणजे काय याची पुस्तकाच्या नावावरुन कल्पना नसेल.पण उमेदीच्या काळात चांगल्या नोकरीच्या शोधात असताना किंवा अधिक चांगल्या नविन संधीच्या अपेक्षेने आपल्या पैकी अनेकांनी कुठल्या ना कुठल्या प्लेसमेंट कन्सल्टन्सी मध्ये नक्कीच नाव नोंदवल असेलच. त्याच प्रमाणे आपले ’रिझ्युमे’ सुध्दा बर्‍याच ठिकाणी पाठवलेले असतील. त्या पैकी काही प्लेसमेंट कन्सल्टन्सी मधुन चांगल्या संधीही तुम्हाला उपलब्ध झाल्या असतील.
अश्या प्रकारच्या बहुतांश प्लेसमेंट कन्सल्टन्सीज काम करतात ते कंपनांना त्यांच्या गरजे नुसार मनुष्यबळ शोधुन देण्याच. पण हेडहंटरच काम हे त्याहुन फार वेगळ असत. कारण कंपन्याना मुळातच माणस लागतात ती दोन प्रकारची.एक दिलेल्या आज्ञेनुसार काम करणारी आणि दुसरी म्ह्णजे पहिल्या प्रकारच्या माणसांन करुन काम करवुन घेणारी.ही दुसर्‍या प्रकारची माणस कंपन्यांच्या दृष्टीने फारच महत्वाची असतात. कारण ही माणस असतात त्या त्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व विचारपुर्वक काम करणारी मंडळी ज्यांना कंपनीतले टॉप बॉसेस किंवा डिसीजन मेकर्स अस संबोधल जात. ते जर अचानक कंपनी सोडुन गेले किंवा त्यांनी घेतलेले निर्णय चुकले तर कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहु शकतो. त्या मुळे कंपनी अश्या महत्वाच्या जागांवर तिच्या कार्यक्षेत्रातील अनुभवी किंवा तज्ञ व्यक्ती नेमण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते.कंपन्यांना त्यांना हव्या असणार्‍या योग्य व्यक्ती शोधुन देण्याच काम जे करतात त्यांना हेडहंटर अस म्हणतात.
अश्याच एका प्लेसमेंट कन्सल्टन्सी मधुन काम करता करता श्री. गिरिश टिळक यांच्यातील यशस्वी हेडहंटर कसा घडत गेला याच प्रवाही शब्दांकन म्हणजे हे पुस्तक. पुस्तक वाचल्यावर एक लक्षात येत ते म्हणजे हाती घेतलेल्या कामात झोकुन देण , त्याचा अभ्यास करण आणि त्याहुन महत्वाच म्हणजे जगात वावरताना वेगवेगळ्या व्यक्तींशी आलेले संबंध टिकवुन ठेवण ही श्री.गिरिश टिळक यांची वृत्ती अंगी बाळगण हा साधा सरळमार्गही आजच्या गळेकापु जगात यशाचा महामंत्र ठरु शकतो.
तेव्हा हेडहंटर म्हणजे काय व तो कसा घडतो हे मुळापासुन समजुन घ्यायच असेल तर हे पुस्तक संपुर्णपणे वाचण्या शिवाय दुसरा शॉर्टकट नाही.



















१३ जाने, २०११

शौर्यस्मरण अर्थात पानिपत दि. १४ जानेवारी १७६१


महाराष्ट्राचा इतिहास हा पानिपतचा रणसंग्राम वगळुन लिहीताच येणार नाही. किंबहुना जास्त योग्य शब्दात म्हणायच तर समजुन घेताच येणार नाही.येत्या १४ जानेवारीला या रणसंग्रामाला २५० वर्षे पुर्ण होत आहेत पण त्याचे सुप्त परिणाम मराठी मनात व सामाजीक वर्तणुकीत आजही दिसतात. मग ते म्हणींमध्ये असो की दिल्लीच्या राजकारणात न्युनगंडाने वावरायची राजकीय मनोवृत्ती असो या मध्ये पानिपतच्या यशापशयाच प्रतिबिंब दिसुन येत अस मला वाटत. अश्या महत्वाच्या घटनेची पाहीजे तशी नोंद मराठी समाजाने घेतलेली दिसत नाही.पानिपतचे स्मरण म्हणजे जणु काही एखाद्या अप्रिय घटनेचे स्मरण अशीच काहीशी मनोभावना असल्याने हे होत असेल ही शक्यता असु शकते. त्या मुळेच या लढाईला २५० वर्षे पुर्ण होत असताना महाराष्ट्रात येत्या १४ जानेवारीला काहीच समारंभ वैगरे होताना दिसत नाहीत.पण याची दखल पानिपत ज्या राज्यात आहे त्या हरियाणा राज्याने मात्र आवर्जुन घेतलेली आहे.आणि त्याच श्रेय जात ते श्री.अजित जोशी,जिल्हाधिकारी, सोनपत ( हरियाणा) यांना. पानिपतच्या लढाईत तात्कालीन मराठी समाजाने दाखवलेल्या शौर्याचे , केलेल्या पराक्रमाचे व दिलेल्या हौतात्माचे स्मरण व्हावे या करीता त्यांनी " पानिपत प्रतिष्ठान " ची स्थापना केली. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन युद्धामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. शुरांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्याची ही स्तुत्य पध्दत म्हणायला हवी. पानिपतच्या लढाईत अब्दालीशी लढलेल्या हिंदुस्तानातील एकमेव समाजाला,आपल्या मराठी समाजाला या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आदरांजली वाहाण्याचा प्रयत्न हरियाणा राज्य करते त्या बद्दल त्या राज्याचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत.
अश्या पानीपतच्या लढाईच आणि तीच्या प्रयोजनाच विश्लेषण कराव असा माझा अभ्यास नाही. पण मराठ्यांच्या इतिहासाचा पराकोटीचा अभिमान असलेला एक इतिहास प्रेमी म्हणुन या संदर्भात जे जे काही आवर्जुन वाचल त्यावरुन माझी खात्री झाली की,"पानिपतचा रणसंग्राम हे मराठयांच्या गौरवशाली इतिहासातल सोनेरी पान आहे."
या लढाईच्या बाबत अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तक आहे ते श्री.त्रं.शं.शेजवलकर यांच "पानिपत १७६१" .तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने मनातील पुर्वग्रह नाहीशे व्हावेत या साठी श्री.त्रं.शं. शेजवलकर यांच "पानिपत १७६१" (प्रकाशक - राजहंस प्रकाशन) जरुर जरुर वाचाव.त्या शिवाय साप्ताहीक विवेकचा १२ डिसेंबरचा २०१० चा " पानिपत रणसंग्राम- महाराष्ट्राची शौर्यगाथा" हा पानिपत विषेषांक  तसेच  लोकसत्ता रविवार दि. ९ जानेवारी २०११ ची लोकरंग पुरवणी या मध्ये या घटने बद्दल अत्यंत अभ्यासपुर्ण माहिती आलेली आहे. ती देखिल शक्य असल्यास मिळवुन जरुर वाचावी. 
"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्‍या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले."
मला वाटत हीच गोष्ट प्रत्येक मराठी माणसाने पानिपतच्या लढाईचे स्मरण करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे न की लढाईत झालेला पराभव. आपल्या पुर्वजांचा हा उद्दात दृष्टिकोन एकदा जर का कळला की मराठी माणसांच पानिपत होत नाही तर पानिपत करणारी आपण माणस आहोत ही मराठी अस्मिता निर्माण झाल्याशिवाय राहाणार नाही.
तेव्हा २५० वर्षांपुर्वी,१४ जानेवारी १७६१ या दिवशी हिंदुस्तानचे राज्यकर्ते व रक्षणकर्ते म्हणुन धारातिर्थी पडलेल्या शुरविरांना वंदन करत असतानाच मराठी रणरागीणींनी आपल्या सौभाग्याच दान पानिपतच्या रणसंग्रामात संक्रातीच वाण म्हणुन हसत हसत लुटल होत याची देखिल आठवण १४ जानेवारी २०११ रोजी ठेवुन आपल्या पुर्वजांना त्यांनी केलेल्या बलिदाना बद्दल आदरांजली वाहुया.

जय महाराष्ट्र, जय मराठी.