३० ऑग, २०१०

दहीहंडी- एक दुसरी बाजु

                                         दहीहंडी- एक दुसरी बाजु


         गेल्याच आठवड्यात २-४ दिवसांच्या अंतराने "दहीहंडी" बाबत दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी अशी होती की मुंबईतल्या जुन्या व नामवंत दहीहंडी मंडळांनी या वर्षी थर लावण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.तर दुसरी बातमी अशी होती की,उपनगरातल्या दहीहंडी मंडळांच्या संख्येत वाढ झाली असुन त्यातील एक मंडळ या वर्षी थरांचा नविन विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे.एकीकडे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेत असताना नव्याने तयार झालेली दहीहंडी मंडळे अधिक अधिक थर लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत हा विरोधाभास दिसुन येत आहे.दहीहंडी मध्ये भाग घेणारी बहुतांश कार्यकर्ते मंडळी मराठीच मग शहरातल्या व उपनगरातल्या मंडळांच्या दृष्टीकोनात व विचारात विरोधाभास का बर दिसुन येत असावा?
              मुंबईतला दहीहंडी उत्सव अनेक वर्षां पासून साजरा होत आहे. तथापी गेल्या ८-१० वर्षात तो साजरा करण्याच्या पध्दती मध्ये जाणवण्याजोगा फ़रक झालेला आहे.८-१० वर्षांपुर्वी दहीहंडीत भाग घेणे यात निव्वळ हौस व रग होती तर आता मात्र यात स्पर्धा व व्यवसायीकपणा आला आहे.जुन्या काळी ४-५ थर रचणे यात गंमत होती तर आता ७-८-९ थर लावण्यात एक थरार निश्चित तर आहेच पण त्याही पेक्षा मंडळा मंडळा मधिल जाणवणारी सुप्त स्पर्धा आहे.पाण्याच्या टंचाईमुळॆ म्हणा किंवा चाळीचाळीतुन राहाणारा मराठी कामगार वर्ग व पांढरपेशा समाज आता शहरामधुन उपनगरांमध्ये स्थलांतरीत झालेला आहे म्हणुन म्हणा,दहीहंडीतल्या गोपाळांवर पाणी टाकणॆ किंवा गॅलरीत सहकुटुंब उभे राहुन थर रचणार्‍यांच कौतुक करण हे आताशा दिसत नाही. एकंदरीतच काय हा उत्सव सामान्यांचा राहीलेला नाही.आता दहीहंडी उत्सव म्हणजे राजकीय पक्षांनी व नेत्यांनी प्रायोजीत केलेला उत्सव ( इव्हेंट) झालेला आहे. एखाद्या क्षेत्रात राजकीय मंडळी आली की जे काही बरेवाईट त्याच्या बरोबर येत ते सर्व या उत्सवात आलेल आहे.सर्वसामान्यांचा हा उत्सव हा आता पुर्णत: व्यावसायीक झाला आहे. दोन वर्षापुर्वी मंडळा मंडळातील याच स्पर्धेतुन ठाण्या मध्ये दोन मंडळांच्या तरुणांमध्ये मारामारी झाली होती.अर्थात या मागे स्पर्धे बरोबरच पारितोषीकाची भरभक्कम रक्कम हेही एक कारण होतच. असे प्रकार घडण म्हणजे दहीहंडी उत्सवाला गालबोट लावण्या सारखच आहे.
वास्तवीक पाहाता दहीहंडी असो वा गणेशोत्सव या मधुन सर्वांनी एकत्र याव आणि एकमेकांच्या सहकार्याने काही विधायक कार्यक्रम हाती घ्यावेत ही अपेक्षा आहे.पण आज होत काय आहे की या मधुन मराठी माणुस एक होण्याऎवजी एकमेकांचीच डोकी फ़ोडू लागला आहे.
त्यातच गिरणी कामगारांच्या संपा नंतर संपुर्ण कामगार वर्गच शहरातुन पार नाहीसा झालेला आहे तर पांढरपेशा मराठी समाज परिस्थीतीच्या रेट्यापुढे हतबल होवुन प्रथमत: उपनगरां मध्ये आणि हळूहळू बोरीवली-ठाण्या पलीकडे फ़ेकला जात आहे.हे सर्व असच चालू राहील तर अजुन ८-१० वर्षांनी पालघर-बदलापुर किंबहूना त्या पेक्षाही पुढेच दहीहंडी साजरी होईल अशीच बिकट परिस्थीती दिसते आहे.मोठ्या प्रमाणात मुंबईतुन बाहेर फ़ेकल्या जाणार्‍या मराठी माणसांच वास्तव हे कटू असल तरी नाकारता येणार नाही.जशी जशी ही मराठी माणस दुरदुर फेकली जातील तस तस दहीहंडी-गणेशोत्सव हे मराठमोळे सण मुंबईत साजरे हॊण कमी कमी होत जाणार आहे.त्या मुळे शहरातली जुनी नामांकीत दहीहंडी मंडळे जेव्हा थरांच्या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतात त्यावेळी तो त्यांनी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेपोटी घेतलेला निर्णय नसुन कार्यकर्त्यांच्या अभावी घेतला गेलेला आहे की काय अशी रास्त शंका मनात उभी राहाते.
हे सगळ पाहील की भविष्या मध्ये मुंबई शहरात मराठी माणसांना भवितव्य व जागा राहील की नाही याच काहुर मनात उमटत.तेव्हा देव न करो अन मराठी माणसांच्या अभावी दहीहंडी व गणेशोत्सव हे उत्सव मुंबईत बंद न पडोत अशी येत्या गणेशोत्सवात श्री गणराया पुढे मन:पुर्वक प्रार्थना करण्या शिवाय दुसर आपल्या हाती तरी काय़?

                                                    जय महाराष्ट्र जय मराठी

२ ऑग, २०१०

ट्रेकवाली

                                                                    ट्रेकवाली


सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात,तिही मुंबई सारख्या धावपळीच्या जीवनातली.त्या मुळे घरातून ऑफ़ीससाठी बाहेर पडताना जिवावर आल होत. त्यातच बाहेर रपारपा पाऊस पडत हॊता. पाउस असा अंगावर झेपावत असताना कामावर जाव अस मनाला पटत नव्हत. म्हणुन नेहमीच्या मित्रांना फ़ोन केले.म्हटल ऑफ़ीसला दांडी मारुन जाऊया भिजायला कोठेतरी.पण कोणीच तयार नव्हत म्हणुन चरफ़डत गाडी पकडली.मन मात्र बैचैन होत.छान पाऊस पडत असताना मला ऑफ़ीसला जाव लागतय याच दुख:होत होत. नेहमीप्रमाणे खिडकीत बसायला जागा मिळूनही मुड नसल्याने गप्पा न मारता डोळॆ मिटून स्वस्थ बसलो.आजुबाजुला मित्रांची भंकस चालू असली तरी मन दुसरीकडेच होत.मिटलेल्या डोळ्यांसमोर अचानक तिची आठवण आली.............
तो ८७ सालचा जुलै महिना होता.त्या दिवशी सकाळ पासुनच पावसाने चांगलाच जोर पकडला होता.मधला वार असल्याने ऑफ़ीस होत.पण वय तरुण असल्याने मनासारखे वागायचेच ते दिवस होते.तेव्हा ऑफ़िसला दांडी मारुन पावसात भिजायला जाव अस ठरवल.सॅक भरली आणि निघालो.आईला माझ्या अश्या वागण्याची सवयच होती त्यामूळे तिलाही त्याच काहीच वाटल नाही. "संभाळुन जा रे" ईतकच ती म्हणाली.
कल्याणहून लोकल,मग कर्जतहून बस अस करत राजमाचीचा ट्रेक करण्यासाठी कोंडीवड्याला गेलो.एकटयाने जात असलोतरी ट्रेक दरम्यान एखादा ग्रुप नक्कीच भेटेल अशी खात्री होती.झालही तसच.अगदी माझ्याच बसमधुन ती दोघ उतरली होती.या स्टॉपवर उतरली होती म्हणजे ती दोघही नक्कीच राजमाचीला जाणार होती यात शंकाच नव्हती. म्हणुन थोड थांबून त्यांच्या मागेमागे जाण्याचा निर्णय घेवून टाकला.विचार केला तेव्हडीच सोबत होईल.
हळूहळू गाव मागे पडल. सुरुवातीला ती जोडी बरोबर चालत होती. नंतर त्यांच्यात काहीतरी बोलाचाली झाली व तिला सोडुन तो झपाझप चालत पुढे निघुन गेला. मी मात्र थोडस अंतर राखुन तिच्याच गतीने शांतपणॆ मागेमागे चालत होतो.त्या निरव शांततेत काही वेळाने तिलाही मी मागे आहे याची जाणिव नक्कीच झाली होती. पण तिही एकटी असल्याने माझी सोबत तिला हवीशी वाटत असावी. पावसाळ्यातला राजमाची ट्रेक मनाला भु्लवणारा असतो. त्या निवांत आणि नैसर्गीक वातावरणात मन शांत होत असल तरी काही वेळाने दुसर्‍या कोणाशी बोलून मन व्यक्त करण्याची अनिवार उर्मी मनात येतेच. तिलाही माझ्या सारखच वाटत असाव.पण ही अबोल्याची कोंडी कशी दुर करावी हे मला कळत नव्हत.
ती निसर्गवेडी होती हे तिच्या छोट्या छोट्या हालचालीतून दिसत होत.रस्त्यात मधोमध फ़ुललेली रानफ़ुल असोत की मधे मधे येण्यार्‍या फ़ांद्या-झुडुपांना ती चालताना टाळत होती वा हळुवार पणे बाजुला सारत होती.चालता चालता मधेच एका झाडावर फ़ुललेल गर्द जांभळ्या रंगाच रानफ़ूल तिला दिसल.ते तोडुन घेण्याचा स्त्रि सुलभ मोह तिलाही आवरला नाही.पण दोन-चार उड्या मारुनही ते काही तिला जमल नाही.तेव्हा निराशेने तिने मागे वळुन माझ्याकडे पाहील.ती नजर ईतकी बोलकी होती की मी झटकन पुढे झालो अन तिला ते फ़ुल तोडुन दिल.त्या क्षणी पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकमेकांकडे निरखुन पाहील. रुढार्थाने सुंदर म्हणावी अशी ती नक्कीच नव्ह्ती . पण तरीही कोणाचही लक्ष वेधुन घेतील तिचे डॊळे जरुर होते. ती ह्ळूच थॅंक्स म्हणाली आणि चालू लागली. मी पण मग मुकाट्याने तिच्या मागोमाग चालू लागलो.सोबत असण्याचा आधार दोघांनाही वाटत होता.निसर्ग कितीही सुंदर असला तरी एकटेपणात तो अंगावर येतो.त्याचा पुर्णपणे अनुभव घ्यायचा असेल तर सोबत ही हवीच.
थोड्या वेळाने तिच्या मागोमाग चालण्याचा मला कंटाळा आला.म्हणुन संधी साधुन मी एका वळणावर तिला ओलांडुन पुढे चालू लागलॊ.तिला ते जाणवल की नाही कोण जाणे पण ती ईतकच बोलली " संभाळुन रे. आता पुढे ओढे आहेत बर कां". मग मात्र माझ्या पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचली. मनात म्हटल " आली मोठी ट्रेकवाली.स्वत:ला काय समजते कोण जाणे.".
असच काही वेळ चालल्यावर खरच एक ओढा आला.डोंगरात पावसाळ्यात तयार झालेल्या ओढयांना नैसर्गीक उतार असल्याने ओढ ही असतेच. त्या मुळे हा ओढा ओलांडताना तिला माझी मदत मागावी लागणार असा मी अंदाज केला.ट्रेकवालीची गंमत करण्यासाठी एकट्याने ओढा ओलांडायचा मी ठरवल. त्या प्रमाणे मी पटकन पुढे जाऊन ओढ्यात पाय टाकला.पण पाण्याच्या तिव्र ओढीने माझा पाय सटकला आणि पाण्यात आडवा झालो.अचानक काय झाल ते माझ मलाच कळलच नाही.पाण्याला अपेक्षेपेक्षा चांगलीच जास्त ओढ होती जीचा अंदाज काठावरुन पाहाताना जाणवला नव्हता.त्या मुळे मी स्वत:ला सावरायच्या आत सात-आठ फ़ुट खाली घसरलो.घसरता घसरता माझ्या हाताला एक कपार लागली.तिला पकडुन मी स्वत;ला थोडस सावरल.पण माझ्या दुसर्‍याच क्षणी लक्षात आल हे काही खर नाहीपाण्याला ओढ ईतकी जास्त होती की हा आधार जास्त वेळ मला पुरणार नव्हता.उतार असल्याने मान वर ठेवण्याचा प्रयत्न करुनही नाकातोंडात पाणी जातच होत.काय कराव तेच समजत नव्हत. तेव्हड्यात एक हात समोर आला. ती म्हणाली" अरे, पटकन हात पकड.". मी विचार केला की ही एव्हडी किरकोळ. माझ वजन पेलवेल का हीला. मी हात पकडायला का घुटमळतो आहे हे तिच्याही लक्षात आलं.ती म्हणाली,"माझी काळजी करु नकोस. पटकन हात पकड."  अर्थात मलाही दुसरा पर्याय नव्हताच.कारण एकट्याने मला बाहेर पडता येणार याची मलाही एव्हाना कल्पना आली होतीच.मग काय बुडत्याला काडीचा आधार.मी तिचा हात पकडला.तिच्या अंगात माझ वजन पेलण्याच बळ असेल का ही माझी शंका लवकरच दुर झाली.तिने शांतपणे पण हळुहळु मला ओढत बाहेर खेचुन काढल.बाहेर पडल्यावर मी पण तिला म्हणालो"थॅंक्स".ती फ़क्त हसली आणि बाकीच सर्व बोलले ते डोळे. त्यात फ़क्त होती काळजी ना कुठला अभिमान वा कुचेष्टा.
पाण्याच्या आवाजा वरुन ओढ्याच पाणी जवळच कुठेतरी खुप खाली पडत असल्याच माझ्या लक्षात आल होत.संकटातुन बाहेर पडल्यावर आपल्या वरच संकट नक्की किती मोठ होत हे जाणुन घ्यावस मला वाटल.मी त्या आवाजाच्या दिशेने उतरु लागलो.ती पण काही न बोलता माझ्या मागे मागे चालत होती. चाळीस- पन्नास पाऊल आम्ही खाली उतारलो असेल ना असेल आणि समोरच ते दृश्य पाहुन मला छातीत धडकीच बसली. ते पाणी तेथून प्रचंड वेगाने दरीत कोसळत होत. मी जर ओढ्यात आजुन पाच-सहा मीटर खाली घसरलो असतो तर.................
मग मात्र आम्ही दोघही काहीच न बोलता वर परत आलो.खर म्हणजे मला मनातून खुप काही सांगायच होत पण तोंडातून शब्दच फ़ुटत नव्हते.समोर मरण पाहील्यावर दुसर काय होणार म्हणा.नंतरचा ट्रेक मात्र व्यवस्थित पार पडला.राजमाची खालच्या गावात तिचा मित्र वाट पाहातच होता.एव्हना दोघां मधला तणाव कमी झाला होता.बोलता बोलता त्याच्या बोलण्यातून तिने हिमालयीन माऊंटरींग असोशियनचा अ‍ॅडव्हान्स माऊंटरींग कोर्स केल्याची माहीती तर मिळाचीच पण त्याच बरोबर तिने आत्ता पर्यंत राजमाचीचे बावीस ट्रेक केल्याच पण कळल.
मग माझ्या लक्षात एक एक गोष्टी यायला लागल्या.त्या ओढ्याची कल्पना असल्याने तीच संभाळुन जा अस आपुलकीने सांगण.तसच माऊंटरींगच्या प्रशिक्षणातून आलेला आत्मविश्वास.मला ओढ्यातुन बाहेर काढताना तिने स्वत:च्या शरिराला दिलेला विशिष्ट बाक ज्या मुळेच माझ वजन जास्त असुनही ती मला सहज बाहेर काढु शकली होती.तिच्या एकंदरीत वागण्या पुढे माझ वागण किती चुकीच होत ते माझ्या लक्षात आल.
चुक कबुल करण्याची आजुनही वेळ गेली नव्हती.मी मनापासुन म्हणालो,"मी तेव्हा खुप घाबरलो होतो.बर का".त्यावर ती ईतकच म्हणाली," होत रे अस कधीकधी".त्या नंतर मग परतीची वाट त्यांच्या सोबत मी पार पाडली.त्या प्रवासात मग मी तिचे ट्रेकींगचे अनुभव ऎकले.शेवटी एकदाचा ट्रेक संपला.निरॊप घेताना आम्ही एकमेकांचे पत्ते घेतले आणि परत भेटण्याचे वायदे ही केले.
पण खर सांगतो त्या नंतर आम्ही कोणीच एकमेकांना भेटलेलो नाही.पण आजही पाऊस पडत असला आणि मनात पावसाची भटकण्य़ाची उर्मी आली की मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी तिची आठवण येतेच.

१ ऑग, २०१०

चरवैती चरवैती

                     श्रीमती इरावती कर्वे या माझ्या आवडत्या लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत.अभ्यासातून आलेला परखडपणा व त्यातुन जाणवणारे विचारातील वेगळेपण हे मला जाणवलेले त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट.अर्थात एव्हड्या मोठ्या लेखिकेच्या लेखना बद्दल मी अधिक काही लिहीणे लहान तोंडी मोठा घास होईल हे मी जाणतो.
                  या लेखिकेचा एक धडा आम्हाला शालेय क्रमिक पुस्तकात होता.त्या लेखाचा आशय आज तितकासा आता आठवत नाही पण त्याचा शेवट मात्र आठवतो.त्या लिहीतात पक्षि प्रतिवर्षी नित्यनेमाने स्थलांतर करतात आणि परत आपल्या मुळ स्थानी परत जातात. त्यातुन पक्षि मानवाला संदेश देतात, तो म्हणजे ’चरवैती चरवैती ’. याचाच अर्थ चालत रहा चालत रहा. स्थलांतराच्या या प्रक्रियेत पक्षि आपल्या जीवलगांना व सोबत्यांना गमावत असतात पण तरीही ते आपला दरवर्षीचा मार्ग सोडत नाहीत.माणसाच्या जीवनातही असच घडत असत.आपण देखिल आपल्या जीवनात जीवलगांना व सोबत्यांना गमावतो. कधी काळाच्या दैवगतीमुळे तर कधी काही वैयक्तीक कारणांमुळे. अर्थात त्यामुळे आपल्याला पण आपल चालण थांबवता येत नाही.
                 तेव्हा पशु-पक्षांच असो की माणसांच ,जीवन हे असच आहे. त्याच्या प्रत्येक वळणावळणावर अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. काहींशी मनाचे सुर जुळतात तर काहींशी नाही.अस असल तरी भॆटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही बरे वाईट अनुभव देवून जात असते.त्या पैकी सोडून गेलेल्यांच दुख: विसरलो आहे अस वाटत न वाटत तोच एखादी घटना त्या जखमेवरची खपली बाजूला करते अन ते दुख: परत भळाभळा वाहायला सुरु होत.ज्या प्रमाणे दुख:द घटनांच्या आठवणी त्रास देतात तसच कधिकाळी काही काळ आपल्या बरोबर चार पावल चाललेल्या अनेकांची आठवण मनाला सुखावून जाते.
                असे असल तरी आजच्या युगाचा मंत्र आहे " काहीही करा , कसही करा पण यशस्वी व्हा.".त्या मुळे नैतीकतेच्या परंपरा या आपल्याला जोखड वाटु लागल्या आहेत. आमचे आदर्श आता छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज नाहीत तर धीरुभाई अंबानी आहेत.अश्या परिस्थितीत प्रियजनांची आठवण काढायला किंवा त्यांच्या सुखदुखा:त सामील व्हायला वेळ कोणाला आहे.यशस्वी होण्याच्या आकांक्षे पुढे जीवनातले छोटेमोठे आनंद घेण आपण विसरुनच गेलो आहोत.
                    तरी सुद्धा एकट असताना मनाच्या आत दडुन बसलेल्या या आठवणी उफ़ाळून वर येतातच. अश्याच काही आठवणींचा घेतलेला धुंडोळा म्हणजेच ’चरवैती चरवैती’

डे फ़्रेंडशिपचा

मित्रा,

आज डे फ़्रेंडशिपचा आहे

एसएमएस,ग्रिटींगस आणि गिफ़्ट्स

देण्याचा म्हणॆ रिवाज आहे

तरिही नकोत आज मजला

तुझ्या कडुन यातील काहीच गोष्टी

देणे-घेणे हा उपचार नुसता

तो व्यवहार वेड्या आपल्यात नाही

मनात आहे विश्वास माझ्या

येशील तु धावूनी माझ्या सादे सरशी

असो वा नको गरज मजला

आहेस तु माझा सदा सखा सोबती

जुळल्या आपल्या या भावना मनीच्या

म्हणुनच फ़ुलला की रे मळा आपुल्या मैत्रीचा