१५ फेब्रु, २०१०




छत्रपति शिवाजी महाराज

१४ फेब्रु, २०१०

गझल



गझल



माकड हसलं आणि त्या क्षणीच माणसात त्याच रुपांतर झाल अस म्हणतात.तसच काहीस मिशी फ़ुटली की ममाज बॉयच पुरुषात रुपांतर झाल अस समजायला हरकत नसावी.पुरुषांच्या बाबतीत मिशी फ़ुटण आणि "प्रेमात " पडण हे बहुतेक वेळा एकाच वेळी होत असतं. प्रेमात पडण यातच त्या पहिल्या वाहिल्या प्रेमाच पुढे काय होणार ते उमजुन येत असलं तरी त्या प्रेमाचा अनुभव न घेतलेला करंटाच म्हणायला हवा. पहिल्या प्रेमात आपण कधि पडलो ,कसे पडलो हे कदाचीत आठवणार नाही पण ते मनाच्या कोपर्यात शेवट पर्यंत जिवंत असतं

पहिल्या प्रेमाची एक गंमत असते ती म्हणजे जगाला जे दिसत असत त्याच्या एकदम उलट प्रेमात पडलेल्या त्या दोघांना दिसत असत.तिच साध्या साध्या गोष्टींवर उगाचच हसण इतरांना भलेही बालिश वाटो पण त्याला मात्र त्यातून तिचा हसरा स्वभाव दिसत असतो.तिचा सावळा खरंतर काळ्यापेक्षा थोडासाच उजवा असलेला रंग त्याच्या नजरेला मात्र गोर्यापान व पाढंर्या पालीसारख्या (?) असलेल्या मुलींपेक्षा तजेलदार दिसत असतो. तिची तिरकी नजर मित्रांना भलेही "चकणी" वाटत असेल पण त्याला तो प्रेमाचा हळुवार कटाक्ष वाटत असतो. तसचं त्याचा अतिरेकी फ़टकळ स्वभाव लोकांना भलेही उर्मट वाटत असला तरी ती मात्र त्याच्या स्पष्ट्वक्तेपणावर बेहद खुश असते.त्याच्या निरर्थक व अनावश्यक कॉमेंट्स लोकांना भलेही पाचकळ वाटू देत पण तिला मात्र त्यातून त्याचा हजरजबाबी स्वभाव दिसत असतो. तसच भर उन्हात वेड्या सारख फ़िरताना इतरांना जाणवणार ऊन त्या दोघांना मात्र चांदण्याची जाणीव करुन देत असत. गर्दीमध्ये त्या दोघांना एकमेकां शिवाय इतर जगाची जाणि्व सुद्धा होत नाही. खरचं पहिल्या प्रेमात किती गंमत असते नाही ?

असेच काहीसे दिवस माझ्या ही आयुष्यात कधिकाळी आले होते.कालपरवा पर्यंत शेजारच्या पाजारच्या मुलींनी आम्हा मित्रांच्या खेळामध्ये केलेली लुडबुड मला अजिबात आवडत नव्हती. पण अचानक पणे आमच्या खेळामध्ये तीने केलेली लुडबुड मला मात्र आताश्या खटकत नव्हती. तिच लहानपणा पासून गळणार शेंबड नाक अचानकपणे गळायच कस काय थांबल होत काय जाणे. पण तस झाल होत खरं. माझ्याशी कमरेवर हात ठेवून भांडणारी ती अचानक पणे माझ्याशी न भांडता माझी बाजू घ्यायला लागली होती. आणि मी .....................

माझ्या जिवन कंठ्श्य मित्र पश्याने तिला शेंबडी म्हटलेलं मला आताशा का कोण जाणे आवडत नव्हत .चिंचा पाडताना होणारी तिची त्रेधातिरपीट पाहून मी अनाहुत पणॆ तिला चिंचा पाडायला मदत करायला लागलो होतो. सुरुवाती सुरुवातीला जाणवल नाही पण लक्षात यायला लागल होत की लपाछपी खेळताना मी जिथे लपायचो तिथेच ती मागोमाग येउन लपायची.माझ्यावर राज्य असेल तर मला सहज दिसेल अश्या ठिकाणी ती मुद्दाहूनच लपायची .खोट कशाला सांगू मी पण माझ्यावर राज्य असेल तर ती समोर दिसली तरी न दिसल्य़ा सारख करुन दुसर्यालाच शोधायचो .खरचं पहिल्या प्रेमात किती गंमत असते नाही ?

असेच दिवस चालले होते आणि अचानकपणे मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं. आई-बाबा आणि घरापासून दुर अस पहिल्यांदाच राहात होतो.त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीला एकटेपणा जाणवत असायचा. पण हळूहळू हॉस्टेलमध्ये मित्र मिळाले . मग मात्र धमाल सुरु झाली. पार्ट्या, पिकनिक्स आणि अचानक पणे मिळालेल्या स्वात्रंत्र्यामुळे अंगात जणु वारं संचारल होत. माझ घर रेल्वेने फ़क्त दोन -अडीच तासांच्या अंतरावर असल्यामुळे सुरुवाती सुरुवातीला आठवड्यात किमान एकदा आवर्जुन घरी जायचो. पण जशी जशी मित्रांची मैफ़ील जमत गेली तस तस आठवड्याला घरी जाणारा मी ,काही दिवसांनी महिन्याने-दीड महिन्याने जावू लागलो होतो. त्यामुळे आताश्या तिच्या भेटी पण क्वचीतच होऊ लागल्या होत्या. खर सांगायच म्हणजे हॉस्टेलच्या रंगीबेरंगी दिवसात मित्रां शिवाय दुसर कोणीच दिसत नव्हत.

असाच एकदा खुप दिवसांनी घरी गेलो होतो.नेहमीप्रमाणे बाहेरच्या अंगणात खूर्ची टाकून बसलो होतो. ती माझ्या घरी आली होती. बहुदा माझ्या आईने तिला बोलावल असाव. मला समोर पाहुन ती गोंधळली . मी भेटेन अशी तिला अपेक्षा नसावी. सारखी बडबडणारी आणि छोट्या छोट्या गोष्टींवर हसणारी ती खुप शांत वाटली. तिच्यातला हा बदल इतर कॊणाला नसेल पण मला फ़ारच जाणवला. ती काहीच बोलत नाही म्ह्टल्यावर मीच बोलत सुटलो. ती फ़क्त ऎकत होती. शेवटी ती हळूच इतकच म्हणाली, " जाऊऊऊ.. काकू वाट पाहात असतील ". सालं एव्हड बोलतोय याच काहीच वाटत नाही. मी वैतागलो,म्हटलं, "जा". ती जाता जाता फ़क्त हसली. नौटंकी साली.

दोन दिवसांनी नेहमीप्रमाणे मी हॉस्टेलला परत गेलो.त्याच दिवशी मित्रांनी कोजागरीची पार्टी ठरवली होती. कधी नव्हे तो सोमरसा ऎवजी चक्क दुध्द्पानाचा बेत होता. त्या मुळे काही केल्या पार्टीला रंग चढत नव्हता.त्यामुळे कधी एकदा बारा वाजतात आणि दुध पिवून झोपी जातो अस झाल होत . अचानक एका मित्राने कॅसेट लावली. कॅसेट तरी धमाल असेल अशी आम्हा सर्वांची अपेक्षा होती. पण त्या ऎवजी संथ सुरावटींनी कॅसेट्ची सुरुवात झाल्याने सर्वच त्या मित्रावर वैतागलो.सुरावट संपली न संपली तोच मखमली आवाज कानावर आला. या पुर्वी तो आवाज कधि ऎकला नव्हता . पण हळुहळु त्या गाण्यातले शब्द प्रथम कानात आणि नंतर मनात अलगत उतरत गेले.सगळेच मग बोलायचे बंद झाले. हॉस्टेलची गच्ची, वातारणातली रात्रीची निरव शांतता ,पोर्णिमेच्या चंद्राचा शांत प्रकाश या मुळे सैलावत गेलेलं मन .....

या सर्वामुळे घरापासून दुर असलेले आम्ही सर्व हळवे झालो होतो.शब्द आणि तो आवाज यानी आमच्या मनावर जणू गारुडच करुन टाकल होतं. कधी न ऎकलेल अस काही मनावर उमटत होत.

आणि अचानक मला तीची आठवण आली.सगळ आजुबाजुच जग जणू धुक्यातच हरवून गेल्यासारख झाल. तिच दिसण,तिची नजर, ..... तिच आणि तिचच अस्तीत्व या शिवाय दुसर काही नाही.

कॅसेट संपली तसे आम्ही सर्व भानावर आलो. कसली कॅसेट ,कुणाची कॅसेट वैगरे चौकशी सुरु झाली. तो मित्र म्हणाला" अरे ही जगजीतसिंगची गझलची कॅसेट आहे."

गझल.... गझलशी माझी ती पहिलीच ओळख होती. आणि गझलचीच का तीची पण मला अवचीत पटलेली पहिलीच ओळख होती.गझलनेच मला न कळलेली "ती " समजली होती.


म्हणुनच सांगतॊ, पहिल्या प्रेमात आपण नक्की कधी पडलो तो क्षण त सांगता येत नाही कारण ते प्रेम आहे तेच मुळी कळ्लेल नसत.पण त्या प्रेमाची ओळख ज्या क्षणी पटते तो क्षण काही केल्या विसरता येत नाही.

गझल आणि पहिल्या प्रेमचि पहिली ओळख एकाच वेळी मला झाली.त्यामुळे जस पहिल प्रेम मनात कायम राहाणार आहे तसच गझलच सुध्दा माझ्या जिवनात नेहमीच स्थान असणार आहे.

"गझल मुळेच मला अव्यक्त्ततेतून व्यक्त होणार्या तिच्या भावना समजल्या. आणि त्या नंतर माझ्या मनाला एकच चाळा लागला तो म्हणजे बोलल्या जाणार्या प्रत्येक शब्दांमधून व्यक्त होणार्या अर्थापेक्षा न बोलल्या गेलेल्या शब्दांमधून व्यक्त होणार्या भावना जाणुन घेण्याचा.ही सवय समोरच्याला अधिक उमजून घेण्यासाठी मला फ़ार उपयोगी पडली आहे. तुम्हीही असा प्रयत्न करुन पहा म्हणजे त्या मधुन तुम्हालाही अद्यापपावतो न कळलेली माणस कदाचीत कळतील.

१३ फेब्रु, २०१०

जाणीव


जाणीव

नेहमी प्रमाणे रेल्वे ब्रिजवरुन चाललो होतो .आज फ़रक इतकाच होता की ,सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी कमी होती. चालता चालता माझ लक्ष त्या दोघांकडे अचानकपणे गेलं. एक ८-९ वर्षाचा छोटासा गोड मुलगा त्याच्या आजोबांकडे काहीतरी हट्ट करत होता.आजोबांनी त्या छोट्याच्या हट्टापुढे बहुदा मान तुकवली असावी कारण तो छानस खुदकन हसला.त्याच्या निरागस चेहर्यावरच वरच ते हसु इतक लोभसवाणं होत की मला त्या आजोबा-नातवा मधली गंमत जाणून घेण्याची तीव्र ईच्छा झाली. सुट्टीचा दिवस असल्याने मलाही घाई नव्हतीच. त्यांना कळणार नाही अश्या रितीने त्यांच्या बाजूला जावून उभा राहीलो .
खर सांगायच तर लहान मुले आणि त्यांचे आजी - आजोबा यांच्या मधिल गोड नात्या बद्दल मला नेहमीच कौतुक आणि कुतूहल वाटत असत.एक धडपडणार बाल्य तर दुसरं थरथरणार व्रूद्धत्व.आजोबा आणि नातू यांना एकमेकांचे हात घट्ट धरुन रस्त्याने चालताना माझ्या प्रमाणे आपणही कित्येक वेळा पाहिल असेल. त्या वेळी नक्की कळत नाही की , कोण कोणाला आधार देतोय ते ?. चालताना बर्याच वेळा नातू पुढे पुढे पळण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आजोबा त्याला कसेबसे थोपवत असतात.हे सर्व पाहिल की असं वाटत की अतिरेकी उत्साहाला अनुभवान आलेल शहाणपण जणू थोपवत आहे. असो .
त्या आजोबांनी खिश्यातून हळूच एक नाण काढल आणि ते नातवाच्या हातावर ठेवल.नातवाने ते थोड्याच अंतरावर वजनकाटा घेवून बसलेल्या म्हातारबाबांना दिलं नंतर तो वजन करण्यासाठी काट्यावर उभा राहीला.तितक्यात त्या छोट्या मुलाचे आई-बाबा तिथे आले.त्यां छोट्याच्या आईच्या चेहर्या वरच्या आठ्यां वरुन आजोबांच आणि छोट्याच वागण तिला अजिबात पसंत पडलेल नाही हे स्पष्ट्च दिसून येत होत.बायकोची नाराजी पाहून मुलगा आजोबांना हळूच काहीतरी बोलला. त्या वर आजोबा ठामपणे म्हणाले " अरे, पण माझी या बाबतची जाणीव काही वेगळीच आहे."
हे वाक्य ऎकल आणि मी चमकलोच.नेहमी पेक्षा काहीतरी वेगळ असं ते आजोबा बोलले होते नक्कीच.मी अजूनच कान टवकारले.बायकॊच्या चेहर्यावरच्या आठ्या जास्तच आक्रसलेल्या पाहून ,मुलगा थोडा अस्वस्थ होत म्हणाला," ते सर्व ठिक आहे .पण ईथे आत्त्ताच वजन करायच काय़ अडल होत का?."
आजोबा : " जरा ऎकशीक का माझं ?"
मुलगा : " काय ऎकू. तुमच नेहमीच काहीतरी जगावेगळ असत"
आजोबा : " अरे, मनूचा छोटासा हट्ट पुरवायचा नाही का ?"
मुलगा : " म्हणून काय इथे रस्त्यावर........"
आजोबा : " मनूला त्याच काट्यावर वजन करायच होत. मग मी विचार केला की त्याचा हट्ट तर पुरवला जाईलच पण त्याच बरोबर त्या म्हातारबाबांना मदत देखिल होईल."
आजोबांचे हे विचार मुलाला आणि त्याच्या बायकोला हे पटलेले नाहीत हे कळत होतच.पण हे ऎकल्यावर मला मात्र जाणवला ,दोन विभिन्न वयातल्या व्यक्तींच्या द्रुष्टीकोनातील फ़रक.त्या छोट्याच्या आई-बाबांना त्यांच्या मुलाने असे रस्त्यावर वजन करणे कमी पणाचे वाटले होते. तर आजोबांना ...........
त्यांना १ रुपयामध्ये आपल्या नातवाच्या चेहर्यावरचा आनंद तर पाहायला मिळालाच होता पण त्यातून त्या म्हातारबाबांना त्यांचा स्वाभिमान न दुखावता केलेली मदत जास्त समाधान देवून गेली होती . ते म्हातारबाबा परिस्थीतीच्या अगतीकतेमुळे या वयात सुध्दा कमवायला मेहनत करत होते.हे करत असताना त्यांना कोणाच्या दयेची अपेक्षा नसल्याने भीक मागण्याचा सरळधोप मार्ग सोडून स्वाभिमान जपत वजनकाट्याव्दारे चार पैसे पोटा साठी कमवू पाहात होते.हे सगळं त्या आजोबांच्या जाणीवा जाग्रुत असल्याने त्यांना कळल पण त्या तरुण जोडप्याला ... ?
हा प्रसंग माझ्या मनाला वेगळीच जाणीव करुन देणारा ठरला.अश्या प्रकारचे आपल्या जाणीवा जाग्रुत करणारे असे अनेक प्रसंग आपल्या आजुबाजुला घडत असतात जे टीपण्या साठी हव असतं आजोबां सारख संवेदनशील मन .पण ते झापडबंद विचारांमुळे आपल्याला जाणवत नाहीत.
दुसरा एक प्रसंग माझ्याच बाबतीत घडलेला आहे.कधी नव्हे ते भाजी घेण्यासाठी एकदा मी बाजारात गेलो होतो .त्या मुळे भाव वैगरे करायची सवय असण्याचा प्रश्नच नव्हता.त्या ब्रीजवरच्या प्रसंगा पासून मी शक्यतोवर म्हातार्या माणसांन कडुनच खरेदी करायचो .तेव्हडिच त्यांना मदत.तिथे एक आजीबाई भाज्या घेऊन बसलेल्या दिसल्या .मी त्यांच्या कडुन दोन भाज्या भाव न करताच घेतल्या.पैसे देण्या पुर्वी आजूबाजूला सहजच लक्ष गेलं.पाहिल की सगळेच भाव करत होते.ते पाहून पैसे देण्यापुर्वी सहजच विचारायच म्हणुन आजी बाईना म्हणालो , " आजी, एकदम दोन भाज्या घेतोय तेव्हा २ रुपये तरी कमी करा ना ." आजींनी माझ्याकडे चमकून पाहील . हे भोट गिर्हाईक असे काही विचारेल अशी त्यांना अपेक्षित नसावं . त्या म्हणाल्या, " बाळा, येक ईचारु.तुले राग नाय ना येणार ?" माझ्या सारख्या पस्तीशीतील्या पुरुषाला बाळा म्हणणार्या आजींना मी काय बरं बोलणार. त्याच पुढे म्हणाल्या," हॉटेलीत जातू ना रं". मी म्हणालो " जातो ना कधितरी." त्यानी विचारल ," तीथ वेटरले बक्षिसी बी द्येतो का रं?" मी फ़ुशारुन म्हणालो,"देतो की" हे मी म्हटल्यावर त्या नंतर आजी जे म्हणाल्या त्याने माझ्या डोळ्यात अंजनच घातलं. त्या म्हणाल्या " हॉटेलीत जातोस. तिथ पैका मोजतोस अन वेटरले बक्शीशी बी देतोस.मग या आज्येशी भाव करतो का रं?.या उमरमधी ही आज्ये गरमीमधं इथं बसत्येत त्याच तुला काय बी वाटत नाय रे ?".हे ऎकल्यावर मीच काय पण ज्या्च्या मनात थोडीतरी संवेदना शिल्लक आहे असा माणूस काय बरं बोलणार.
मी त्या आजीला ईतकच बोललो की,"आजी,तुमचं म्हणण मला एकदम पटल बघा.एक नक्की सांगतो या पुढे भाजी घेताना तुमच्याशीच काय दुसर्या कोण्याही आजीं बरोबर भाव करणार नाही." माझं बोलणे ऎकल्यावर आजी हसल्या. ते हसण निर्व्याज्य होत खिजवणार नव्हत. त्याच पुढे म्हणाल्या,"बाळा,पिशवी पुढं कर की जरा".मी नकळतच पिशवी पुढे केली. आजीने छोटीशी कोथींबीरीची जुडी पिशवीत टाकली.मी म्हणालो,"हे कशाला आजी".त्या म्हणाल्या,"अरं बाळा,तुन माझ म्हातारीच गुमान ऎकलस मग मी बी तुझं थोडस ऎकू नगं का रं.माज्याच परसातली हाय म्हणुन ही जुडी तुले देत्येय .आजी म्हंण्लास मग माजं ऎक अन ठिव ही गुमान". आजीच म्हणणं किती समर्पक होत नाही ?.त्या मुळे तो प्रसंग सुध्दा माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. त्यानंतर मी भाजी घेताना आजतागायत भाव केलेला नाही.
या दोन पसंगातून मी नक्कीच खुप काही शिकलो .आजोबांनी शिकवलं की दुसर्याला मदत करताना त्याचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहीजे.तर आजींनी शिकवल की व्यवहार करताना समोरच्या माणसाचा देखिल विचार केला पाहीजे.त्यांनी असही शिकवल की आपल म्हणण पटवताना दुसर्याच्या भावना देखिल कश्या प्रकारे जपायच्या असतात. त्या दोघांच्या अनुभवातुन त्यांच्या मतांच जाणिवेत रुपांतर झालेल होत कारण त्यांना दुसर्याच्या मतांचा विचार करता येत होता.
आपल्याला आलेल्या अनुभवातून आपली देखिल मतं तयार होतात.त्या मतांना उराशी धरुन आपण समोरच्या्शी वागत असतो.हे करत असताना समोरच्या्ची पण त्याच्या अनुभवातून मत तयार झालेली असतात याचा विचार आपण करत नाही.त्या मुळे मत मांडताना आपण एकमेकांना अनाहुतपणे दुखवतो .पण त्या आजी -आजोबां सारख आपण जेव्हा दुसर्याच्या मताचा विचार करायला शिकू तेव्हा आपल्या मतं देखिल जाणिवेत बदलतील हे नक्कीच.
तेव्हा आजुबाजुला घडणार्या घटना काहीतरि देत असतात हे लक्षात असु द्या.